
प्रदीर्घ काळापासून मी दिंडोरीप्रणीत मार्गातील एक सामान्य सेवेकरी. सुरुवातीला सेवा कशी करायची हेच माहीत नव्हते, तर सेवामार्ग म्हणजे काय? ही तर फार अवघड गोष्ट होती, असो.
डोंबिवली शहरात ब्र. भु. प. पू. मोरे दादांची अनेक हितगुजं झाली, पण ती श्रवण करण्याचे भाग्य कधीच लाभले नाही. मी डोंबिवली (पश्चिम) येथील ज्ञानेश्वर मंगल कार्यालयाजवळील श्री दत्त मंदिरात दर गुरुवारी संध्याकाळी ७.३० वाजता आरतीला जात होतो. आरतीनंतर संबंधितांचे मार्गदर्शन व नंतर प्रसाद घेऊन मार्गस्थ होत असे.
एप्रिल १९८८मधील ही सत्य स्थिती, वार गुरुवार होता, संध्याकाळची नेहमीची आरती व त्यानंतर मार्गदर्शनाची वेळ व मार्गदर्शन करणारी व्यक्ती व केंद्रातील प्रत्येक व्यक्ती रडत होती. एकच हंबरडा होता,
‘‘मोरे दादांचे महानिर्वाण झाले व दादा सर्वाना सोडून गेले.’’
क्षणभर खूपच भांबावून गेलो, प्रसाद न घेताच घरी गेलो, रात्रभर झोप लागत नव्हती, कोण दादा? ही कोणी सामान्य व्यक्ती असूच शकत नाही व माझ्या आयुष्यात दादासाहेब कोण हा एकच ध्यास लागला. ‘‘तेजोनिधी’’ ग्रंथ हातात पडल्यावर दादा म्हणजे साक्षात श्री स्वामी समर्थाचे रूप होते हे लक्षात आले. परंतु त्यांचे दर्शनसुद्धा लाभले नाही याची खंत मनात होती.
हळूहळू कार्याचा अभ्यास व मागोवा घ्यायला सुरुवात केली. अचानक वीस वर्षानंतर प.पू. गुरुमाऊलींकडे जाण्याचा योग आला. तो म्हणजे नाशिकचे बाजीराव सोनावणे, पत्रकार यांच्यामुळेच. ध्यासापोटी व आंतरिक जिव्हाळ्याने डोंबिवलीत नवीन दोन साप्ताहिक सेवा केंद्रांच्या निर्मितीचे भाग्य लाभले व प. पू. गुरुमाऊलींकडे येणे- जाणे वरचेवर वाढीस लागले.
एक दिवस प. पू. गुरुमाऊलींकडे बसलो होतो. प.पू. गुरुमाऊलींनी मी काही न विचारताच, माझ्या अंत:करणातील विषयाला सुरुवात केली. ब्रह्मीभूत प.पू. मोरेदादा कोण होते व चर्चा करीत असताना डोंबिवलीचा विषय, दादासाहेबांचे डोंबिवलीवर खूप प्रेम होते व डोंबिवली म्हणजे दादासाहेबांची ओसरी होती. व प.पू. गुरुमाऊलींच्या डोळ्यातून अश्रू आले. ते अश्रू बरेच काही सांगून गेले.
त्या दिवसापासून एकच ध्यास होता, तो म्हणजे, डोंबिवलीत त्रिकाल आरती केंद्र व्हायलाच हवे. ब्रह्मीभूत प.पू. मोरेदादा, प.पू. गुरुमाऊली व मा. श्री. चंद्रकांतदादा ही सर्वच श्री स्वामी समर्थ महाराजांची विविध रूपे, फक्त पोषाख बदलला. प.पू. गुरुमाऊलींना पुनश्च डोंबिवलीत त्रिकाल आरती केंद्रासाठी विनंती केली, त्यावर प.पू. गुरुमाऊलींनी सांगितले, ‘‘कामाला लागा, अपमान सहन करण्याची ताकद ठेवा. जागा कोणीही देईल. काळजी करू नका.’’
१ मे २०१२ रोजी चंद्रकांतदादांचे हितगुज ठाकूर हॉल, डोंबिवली (पूर्व) येथे आयोजित केले होते. कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी नव्याने सुरू झालेल्या राजाजी पथ, डोंबिवली (पूर्व) सेवा केंद्राने घेतली होती. योगायोग म्हणजे दादासाहेबांच्या हातूनच त्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सहा फूट उंचीच्या फोटो प्रतिमेची पूजा व स्थापना राजाजी पथ सेवा केंद्रात झाली.
त्या दिवशी चंद्रकातदादांच्या मुखातून शब्द आले की, ‘‘आजपासून श्री स्वामी समर्थ महाराज पुनश्च डोंबिवलीतील राजाजी पथ सेवा केंद्रात स्थानापन्न झाले. हितगुजाचे वेळी, प.पू. मोरेदादांच्या आठवणीने आ. चंद्रकांतदादांना पण गहिवरून आले. रविवार २३ जून २०१३ रोजी वटपौर्णिमेच्या शुभदिनी शेवटच्या आरतीस प्रारंभ झाला व साप्ताहिक सेवा केंद्राचे त्रिकाल आरती सेवा केंद्रात रूपांतर झाले.
एका वर्षात साप्ताहिक सेवा केंद्राचे रूपांतर त्रिकाल आरती केंद्रात होणे ही किमया अर्थातच चंद्रकांतदादांचा चरणस्पर्श या वास्तूस झाल्यामुळेच घडून आली. योगायोग म्हणजे १९८८ ते २०१३ या तब्बल २५ वर्षापूर्वीचा सेवा केंद्राचा ध्यास पूर्ण झाला. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राची ही जागा म्हणजे श्री दत्त मंदिराची ओसरी, साक्षात दत्त महाराजांनी ब्र.भु.प.पू. मोरेदादांना त्यांची स्वत:ची ओसरी दिली.
प. पू. दादासाहेबांच्या ओसरीचे स्वप्न ध्यासातूनच साकार झाले. धन्य प. पू. गुरुमाऊली व आ. चंद्रकांतदादा. ‘‘अहंकाराचा वार न लागो मज’’ ही श्री स्वामी समर्थ चरणी त्रिवार प्रार्थना.
‘‘कर्ता आणि करविता तुज एक स्वामीनाथा, माझिया ठायी वार्ता मीपणाची नसो’’
श्री दत्त मंदिराच्या वास्तूचे मालक भगत परिवार व सर्व नवीन भाग्यवान सेवेकरी यांच्या सहकार्यानेच हे शक्य झाले.