Quantcast
Channel: श्रध्दा-संस्कृती – Prahaar.in
Viewing all 1081 articles
Browse latest View live

एकादशी

$
0
0

प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षांतील अकरावी तिथी एकादशी या नावाने संबोधिली जाते. विष्णूची अत्यंत प्रिय तिथी, अशी तिची प्रसिद्धी आहे. वैष्णव, शैव, सौर आदी सर्व हिंदूंना व विशेषत: सर्व विष्णुभक्तांना एकादशी हे व्रत करावयास सांगितले आहे. नित्य व काम्य असे हे उभयविध व्रत आहे. व्रतविषयक सामान्य नियम यालाही लागू आहेत. एकादशीच्या बाबतीत ‘स्मार्त’ व ‘भागवते’ असे दोन संप्रदाय आहेत. ही तिथी दिनद्वयव्यापिनी असल्यास द्वादशीविद्धा वैष्णवांकरिता विहित आहे. या संबंधीचे सूक्ष्म विवेचन निर्णयसिंधूत केलेले आहे.

प्रत्येक महिन्यात दोन याप्रमाणे वर्षातून २४ एकादशी येतात. शुक्ल पक्षातील एकादशींची नावे : कामदा, मोहिनी, निर्जला, शयनी, पुत्रदा, परिवर्तिनी, पाशांकुशा, प्रबोधिनी, मोक्षदा, पुत्रदा, जया व आमलकी. कृष्ण पक्षातील : वरुथिनी, अपरा, योगिनी, कामिका, अजा, इंदिरा, रमा, उत्पत्ती, सफला, षट्तिला, विजया व पापमोचनी. अधिक मासातील दोन्ही एकादशींना कमला असे नाव आहे.

रात्रंदिवस उपवास व रात्री जागरण करून संपूर्ण दिवस हरिकीर्तनात घालविणे, हे या दिवसाचे विशेष आहे. या दिवशी उपवास केला असता, सर्व कामना परिपूर्ण होतात व वैष्णवपदही प्राप्त होते.

आषाढ शु. एकादशीस महाएकादशी किंवा शयनी एकादशी म्हणतात. या दिवशी विष्णू शयन करतात म्हणून शयनी असे नाव पडले. कार्तिक शु. एकादशीस विष्णू जागे होतात म्हणून प्रबोधिनी असे नाव पडले. आषाढी व कार्तिकी या एकादशींना महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्ष शु. एकादशी हा दिवस ‘गीताजंयती’ म्हणून प्रसिद्ध आहे. प्रदेशपरत्वे एकादशीव्रत आचरण्याचे प्रकार भिन्न भिन्न आढळतात.


शक्तिपीठे

$
0
0

शक्तीच्या देवीच्या उपासनेची काही विशिष्ट स्थाने ही ‘शक्तिपीठे’ म्हणून ओळखली जातात. प्रत्येक शक्तिपीठाच्या ठिकाणी एक भैरव आणि एक शक्ती असते अशी श्रद्धा आहे. प्रत्येक ठिकाणच्या भैरवाचे आणि शक्तीचे नाव वेगळे असते. बहुतेक पुराणांत शक्तिपीठांची संख्या एकावन्न मानलेली असली, तरी काही ग्रंथातून ही संख्या वेगवेगळी – चार, सात, आठ, अठरा, बावन्न इ. दाखविण्यात आलेली आहे. देवी भागवतात एकशे आठ पीठांचा निर्देश असून, तेथे फक्त पीठस्थाने आणि त्याच्या अधिदेवता एवढेच तपशील दिले आहेत. तुळजापूर (भवानी), कोल्हापूर (अंबाबाई), माहुरझरी (रेणुका) आणि वणी (सप्तशृंगी देवी) ही महाराष्ट्रातील महत्त्वाची शक्तिपीठे मानली जातात.

या शक्तिपीठांचा उगम दोन पुराणकथांशी निगडित आहे. त्या कथा अशा : दक्ष प्रजापतीची मुलगी सती (पार्वती) ही शंकराला दिलेली होती. दक्ष प्रजापती आणि शंकर या दोघांत वितुष्ट होते. पुढे दक्ष प्रजापतीने बृहस्पतिसव नावाचा यज्ञ करावयाचे ठरविले. ह्या यज्ञाचे आमंत्रण शंकराला मात्र दिले नाही. तथापि सती मात्र पतीचा विरोध असताही हट्टाने त्या यज्ञप्रसंगी उपस्थित राहिली. त्यावेळी प्रत्यक्ष पित्याकडून झालेला अपमान असह्य होऊन सतीने यज्ञकुंडात उडी घेऊन स्वत:स जाळून घेतले. शंकराला हे समजल्यानंतर त्याने आपल्या जटेतून वीरभद्राला उत्पन्न केले व त्याच्याकडून दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करून दक्षालाही ठार मारले आणि दु:खावेगाने यज्ञस्थळी जाऊन शंकराने सतीचे निष्प्राण शरीर मस्तकावर घेऊन तांडव नृत्य सुरू केले. त्याला शांत करण्याच्या हेतूने विष्णूने सुदर्शन चक्राने सतीच्या पार्थिवाचे अवयव तोडण्यास प्रारंभ केला. सतीच्या मृतदेहाची अंग-प्रत्यंगे जेथे जेथे पडली, तेथे तेथे शक्तिपीठे निर्माण झाली.

शक्तिपीठांच्या निर्मितीसंदर्भात जी दुसरी पुराणकथा आहे ती अशी : विष्णुभक्त अंबरीष राजाच्या एकादशीच्या व्रताचा भंग करण्यासाठी दुर्वास मुनी आपल्या साठ हजार शिष्यांसह सकाळीच या राजाकडे आले. त्या दिवशी राजाच्या व्रताचे उद्यापन होते. दुर्वास ऋषी वेळेवर न परतल्याने त्यांच्यासारख्या थोर अतिथीला सोडून व्रताचे उद्यापन करायचे की, अतिथी आल्यावर जेवून व्रत मोडायचे, हा प्रश्न राजाला पडला. शेवटी राजाने तुळशीचे तीर्थ घेऊन उपवास सोडला आणि भोजनासाठी आलेल्या इतर लोकांना जेवू घातले. झाल्या प्रकाराने दुर्वास संतापले आणि त्यांनी राजाला शाप दिला की, या व्रताचे फळ तुला मिळणार नाही आणि तुला शंभर जन्म घ्यावे लागतील. मग विष्णूने अंबरिषाला त्या शापापासून अभय दिले आणि विष्णूसह सर्व देवांनी दुर्वासांच्या शापवाणीने अंबरिषाला मिळणारे शंभर जन्म आपसात वाटून घेतले. त्यापैकी एकावन्न जन्म देवीने स्वीकारले. त्यामुळे एकावन्न शक्तिपीठे निर्माण झाली.

जप

$
0
0

जप म्हणजे अक्षर, शब्द, नाम, वाक्य, श्लोक अथवा मंत्र मनापासून उच्चारणे. धार्मिक संदर्भात जप म्हणजे मोठय़ाने, हळू किंवा मनातल्या मनात मंत्राचा उच्चार करणे. जप तीन प्रकारचा : वाचिक, उपांशू व मानसिक. वाचिक म्हणजे वाणीने स्पष्ट म्हटलेला, दुस-यास ऐकू जाणारा. यापेक्षा अधिक पुण्यकारक उपांशू जप होय. जिव्हेने अगदी हळू उच्चारायचा तो उपांशू जप होय. मानसिक जप म्हणजे मनातल्या मनात म्हणायचा. हा सर्वात पुण्यकारक होय. वेदकालापासून यज्ञसंस्थेत होमादी कर्मकांड चालत असता काही विशिष्ट मंत्राचा किंवा मंत्रांचा जप करण्याची पद्धती पडली आहे. उपनयन संस्काराच्या वेळी आचार्याने सावित्री मंत्राचा उपदेश करावयाचा असतो. हा मंत्र बहुतेक गायत्री छंदात असतो, म्हणून त्यास गायत्री मंत्र म्हणतात. हिंदू, जैन, बौद्ध, शीख इ. भारतीय धर्मसंप्रदायांमध्ये संप्रदायाची दीक्षा ज्या व्यक्तीला देतात त्या व्यक्तीला इष्टदेवतेचा मंत्र जपण्याकरिता गुरूने द्यावयाचा असतो. यहुदी (ज्यू), ख्रिस्ती वा इस्लाम धर्मामध्ये मंत्र जपाची पद्धती आहे. मंत्रामध्ये देवाची एक किंवा अनेक नावे किंवा गुणवाचक शब्द असतात. जप हा हाताच्या बोटांनी किंवा माळेतील मण्यांनी किंवा सूत्रातील म्हणजे दोरीतील गाठींनी मोजून हृदयापासून हळूहळू अथवा मनातल्या मनात शुचिर्भूत होऊन एकाग्र चित्ताने उच्चारावयाचा असतो.

जगातील सर्व धर्मातील धार्मिक लोकांत जपमाला वापरण्याची पद्धती आहे. जपमालेत ३२, ९९, १०८ वा इतर संख्या असलेले मणी किंवा गाठी असतात. मणिसंख्या किंवा ग्रंथिसंख्या ही त्या त्या ठरावीक असते. कित्येकांच्या संप्रदायाप्रमाणे मणिसंख्या वैकल्पिक असते, म्हणजे ठरावीक निरनिराळ्या संख्येची असते. शैव, वैष्णव इत्यादिकांच्या जपमालेमध्ये साधारणपणे १०८ मणी असतात. शैव हे मुख्यत: रुद्राक्षांची माला करतात आणि वैष्णव तुळशीच्या लाकडाची माला करतात. कित्येकांच्या मालेमध्ये चंदनाच्या लाकडाचेही मणी असतात. प्रवाळ, मोती, विविध प्रकारची रत्ने यांच्याही जपमाला असतात. या जपमालेच्या द्वारे ॐ नम: शिवाय, ॐ नमो भगवते वासुदेवाय इ. विविध अक्षरसंख्येचे इष्टदेवतेचे मंत्र जपावयाचे असतात.

पातंजल योगसूत्रांमध्ये प्रणवाचा म्हणजे ओम काराचाच जप मुख्यत: करावयास सांगितला आहे. ॐ म्हणजे साक्षात परमेश्वर किंवा परब्रह्म होय. जप म्हणजे ईश्वराचे स्वरूप म्हणजेच प्रणवाचा अर्थ मनात सतत ठेवणे. जपाने पापक्षालन होते, इष्टदेवतेची कृपा होते, इष्टकामनेची सिद्धी होते, रोगनिवारण होते, अनिष्ठाचा निरास होतो अशा प्रकारची फलिते जपकर्माची सांगितली आहेत. जपमालेला स्मरणी ही म्हणतात. कित्येक साधक ही स्मरणी गोमुखी नावाच्या पिशवीत ठेवून त्यातच हात झाकून घेऊन जप करीत असतात.

जप हे मानसिक कर्म आहे. यज्ञ, पूजा, आराधना, होमहवन इ. कर्माचा जप हा एक प्रधान किंवा अंगभूत भाग असतो. काहींच्या मते संध्यावंदनातील जप हे प्रधान कर्म आहे. जप हे संध्यावंदनाशिवायही प्रधान कर्म असते. उदा., गायत्री पुरश्चरण. पूजा, स्तोत्र, होम इ. जपकर्माची अंगे म्हणून मानली जातात. इतर कोणतीही अंगे न आचरताच नुसता नामजपही चित्तशुद्धिकारक, पापनाशक, इशकृपेचा साधक मानला आहे. संतवाङ्मयात असाच नाममहिमा वर्णिला आहे. भगवद्गीतेत सर्व यज्ञामध्ये जपयज्ञ हा माझी म्हणजे भगवंताची विभूती होय, असे म्हटले आहे. मनस्मृतीत जप हा सिद्धीकारक मानला असून इतर कर्मे करा अथवा न करा, असे म्हटले आहे.

शांतादुर्गा

$
0
0

गोव्यातील एक प्रसिद्ध देवता. गोव्याच्या फोंडे महालातील कवळे ह्या गावी तिचे मंदिर आहे. जुने मंदिर जुवारी नदीकाठच्या केळोशी गावी होते. पोर्तुगीजांच्या जाचामुळे तेथील देवीची मूर्ती सध्याच्या ठिकाणी हलवण्यात आली.

ही देवता मूळ त्रिहोत्रपूर वा तिरहूत येथील असून काही ब्राह्मणांनी ती आपल्याबरोबर गोव्यात आणली, असे म्हटले जाते. मिथिला देशाच्या बारा नावांपैकी तैरभुक्ती हे एक असून त्याचा अपभ्रंश त्रिहोत्र असा झाला असावा, असे काही अभ्यासकांचे मत आहे. असेही म्हटले जाते की, पूर्वी कान्यकुब्ज देशातून रामेश्वरच्या यात्रेला गेलेले काही ब्राह्मण परतवाटेवर असताना गोव्यात त्यांना ईश्वरी साक्षात्कार झाला आणि ते तेथेच राहिले. देवशर्मा, लोकशर्मा आणि शिवशर्मा हे त्यांतील प्रमुख होते. कवळे येथील शांतादुर्गा मंदिराच्या खालच्या बाजूस शिवशर्मा ह्यांची एक छोटीशी घुमटी आहे.

देवीच्या शांतादुर्गा ह्या नावाचे स्पष्टीकरण तिची जन्मकथा सांगून दिले जाते, ते असे : एकदा शिव आणि विष्णू ह्यांच्यात युद्ध सुरू होऊन ते दीर्घकाळ चालू राहिले. त्यात कोणालाही विजय मिळण्याची शक्यता दिसेना. हे युद्ध थांबल्याखेरीज विश्वव्यवस्था सुरळीतपणे चालणार नाही, हे ध्यानी घेऊन ब्रह्मदेवाने आदिशक्ती जगदंबेला युद्धभूमीवर पाठवले. तिने या दोघांना उपदेश करून ते युद्ध थांबवले व शांतता प्रस्थापित केली, म्हणून ती शांतादुर्गा ह्या नावाने ओळखली जाऊ लागली. शैव-वैष्णवांमधील वाद मिटावा, ही दृष्टी ह्या कथेमागे दिसून येते.

शांतादुर्गेचे कवळे येथील मंदिर भव्य असून गाभा-यात देवीची सुंदर पंचलवी (पंचरसी) मूर्ती आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूंस मोठय़ा धर्मशाला आहेत. तेथील परिसरात परिवार देवता आणि एक उंच दीपमाळ आहे. देवीचा मुख्य उत्सव केळोशी येथील प्रथेप्रमाणेच माघ शुद्ध पंचमीस होतो.

रथयात्रा

$
0
0

देवतोत्सवाच्या विशिष्ट दिवशी देवतेच्या उत्सवमूर्तीस रथात विराजमान करून जी मिरवणूक काढली जाते, तिला रथयात्रा वा रथोत्सव म्हणतात. ‘रथ’ शब्दाचा दुसरा अर्थ ‘वीर’ वा ‘शूर’ असाही आहे. देवतांनी दैत्यांवर जे विजय मिळविले, त्या प्रीत्यर्थ लोकांनी त्यांच्या गौरवार्थ आनंदोत्सवपूर्वक मिरवणूक काढल्याचे निर्देश पुराणांत आढळतात. विजयी शूर-वीरांच्याही मिरवणुका रथांतून निघत असत. भविष्यपुराणात ब्रह्मदेवाच्या रथयात्रेची, तर देवीपुराणात दुर्गेच्या रथयात्रेची माहिती आली आहे. भविष्योत्तर पुराणात तयार करावयाचा रथ, उत्सवमूर्तीची त्यात स्थापना, मिरवणूक इत्यादींबाबतची माहिती आली आहे. वेदकाली देवांचे वाहन म्हणून रथास अनन्यसाधारण महत्त्व होते. अनेक अश्व जोडलेल्या इंद्राच्या रथाची वर्णनेही वैदिक वामयात आढळतात. आर्याच्या सेनेचे रथ हे एक अत्यंत महत्त्वाचे अंग होते. रथ तयार करणा-यांचा (रथकार) प्राचीन काळी एक व्यवसायात्मक स्वतंत्र वर्गच होता.

महायान बौद्धांनी बुद्धमूर्तीची पूजा-अर्चा सुरू केली व तिला राजोपचारही ते अर्पण करू लागले. विजयी राजांप्रमाणे रथातून विजययात्रा जशी काढत, तसेच उपचार बुद्धमूर्तीसही करण्यात येऊ लागले आणि यातून रथयात्रेचा उगम झाला असावा. जेथे जेथे महायान पंथाचा प्रसार झाला, तेथे तेथे सुवर्णाच्या बुद्धमूर्तीची रथयात्रा काढण्याची प्रथा पसरत गेली. वैशाखी अष्टमीस निघालेल्या पाटलीपुत्रनगरीतील बुद्धाच्या रथयात्रेचे तपशीलवार वर्णन फाहियान (पाचवे शतक) या चिनी प्रवाशाने लिहून ठेवले आहे. लोकांच्या आरोग्य व सुखासाठी मार्गशीर्ष शुक्लपक्षात सूर्याची रथयात्रा करावी, असे हे माद्रीच्या चतुर्वर्ग चिंतामणीत म्हटले आहे. माघ शुद्ध सप्तमीस सूर्याचे चित्र काढून रथाचे दान व पूजा करण्याचे व्रतही हिंदूंमध्ये आचरले जाते. या व्रतास रथसप्तमी, भानुसप्तमी, रथांकसप्तमी व रथांगसप्तमी अशी ही नावे आढळतात. कोनार्क येथील प्रख्यात सूर्यमंदिर हे भव्य रथाकारच आहे. तसेच महाबलीपूर येथील पांडवरथ म्हणून ओळखले जाणारे मंदिरही प्रसिद्ध आहे.

अनेक देवस्थानांतून देवस्थानाच्या स्थितीनुसार लहान-मोठे रथ तयार करून ठेवलेले असतात व त्या त्या देवतोत्सवाच्या प्रसंगी ते सजवून-श्रृंगारून त्यात उत्सवमूर्ती ठेवतात. भक्तगण स्वत: तो रथ ओढतात. अश्व, हत्ती वा बैल जोडूनही रथाची मिरवणूक काढतात. ज्या मार्गाने रथ जावयाचा असेल, तो मार्ग सडासंमार्जन करून, रांगोळ्या तसेच पताकादींनी सजवितात. या रथास बहुधा चार, आठ, बारा, सोळा अशी चाके असतात. रथाचा आकार मंदिराचे गर्भगृह व शिखर यांच्यासारखा असतो. रथ, ध्वजपताका, पुष्पमालादींनी सुशोभित करतात. तांबे, पितळ, सोने-रूपे या धातूंचाही त्याच्या अलंकरणात कमी-अधिक वापर केलेला असतो. बहुतेक ठिकाणी रथात उत्सवमूर्ती ठेवून रथाच्या पुढच्या बाजूस बांधलेल्या लांब दोरखंडाला धरून भक्तगण तो रथ ओढतात. रथापुढे ऐपतीनुसार व प्रथेनुसार वाजंत्री लावून, आतषबाजी करून मिरवणूक निघते. दक्षिण भारतात रथापुढे देवदासी नृत्य करतात. पुरोहित, वैदिक गण रथामागे मंत्रगान, भजनादी म्हणत चालतात. दक्षिणेत शिवाच्या रथयात्रेत शैव धर्मग्रंथ तेवारममधील निवडक भाग गातात. रथापुढे व चाकाखाली नारळ फोडतात, गुलाल-बुक्का उधळला जातो, देवतेचा मोठय़ाने जयजयकार करतात. संथगतीने ही रथयात्रा पुढे सरकते. मार्गात भाविक देवतेला पुष्पमाला, पूजाद्रव्य वाहतात. उत्सवप्रसंगी देवतेची यात्राही भरते. ठरावीक ठिकाणापर्यंत हा रथ नेऊन शेवटी तेथे उत्सवमूर्तीची विशेष पूजा-अर्चा-आरती वगैरे होऊन तो रथ पुन्हा मूळ देवस्थानात आणला जातो.

वैष्णवांमध्ये पुरी येथील जगन्नाथाची रथयात्रा सर्वात मोठी व प्रसिद्ध आहे. [जगन्नाथाचा रथ]. अक्रूराने कृष्णास व बलरामास गोकुळातून रथात बसवून मिरवत मथुरेत आणले. त्या दिवसापासून रथयात्रेची प्रथा सुरू झाली, अशी वैष्णवांची धारणा आहे. उत्सवप्रसंगी पालखीतून तसेच सरोवरातील जोडनौकेतून वा सुखासन इ. वाहनांतून काढण्यात येणा-या देवतेच्या मिरवणुकीचे प्रकारही रथयात्रेतूनच निघाले असावेत.

जोतिबा

$
0
0

दक्षिण महाराष्ट्रातील एक प्रख्यात दैवत. कोल्हापूरपासून वायव्येस सु. १४ किमी.वर पन्हाळा तालुक्यात पायथ्यापासून सु. ३०५ मी. उंचीचा जोतिबाचा डोंगर असून त्यावर जोतिबाचे ठाणे आहे. या डोंगराला ‘रत्नागिरी’ असेही नाव आहे. जोतिबाच्या मंदिराजवळ गुरवांची वस्ती असून ते जोतिबाचे पुजारी आहेत. ही गुरवांची वस्ती वाडी-रत्नागिरी म्हणून ओळखली जाते. प्राचीन काळापासून हा डोंगर एक पवित्र क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. वाडी-रत्नागिरी या खेडय़ात काही प्राचीन मंदिरांचा समूह असून त्यातील केदारलिंग, केदारेश्वर, रामलिंग आणि चर्पटांबा किंवा चोपडाई या देवतांची मंदिरे विशेष महत्त्वप्रू्ण आहेत. यातील केदारलिंगाचे किंवा जोतिबाचे मंदिर प्रमुख असून, मध्यभागी आहे. जोतिबा हा मूळचा ज्योतिर्लिग केदारनाथ मानला जातो. कोल्हापूरच्या अंबाबाईला किंवा महालक्ष्मीला कोल्हासुर, रत्नासुर. दैत्यांच्या संहारकार्यात मदत करण्यासाठी प्रत्यक्ष केदारनाथच हिमालयातून जोतिबा डोंगरावर येऊन राहिला आणि त्याने दैत्यसंहार करून तेथे आपल्या केदारलिंगाची स्थापना केली, अशी आख्यायिका आहे. अंगापूरकरविरचित मराठी केदार विजयात (सु. १७७९) ही कथा आलेली आहे. केदारेश्वर, केदारलिंगे, केदारनाथ, खळेश्वर अशी जोतिबाचीच नावे आहेत. जोतिबा हे उच्चारसुलभ लौकिक रूप ज्योतिर्लिग या शब्दापासूनच बनले असावे.

केदारलिंगाचे मूळ मंदिर प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार प्रथम किवळ या गावचा पाटील नावजी ससे (रावजी साया असाही उल्लेख आढळतो.) याने केल्याचे सांगतात. नंतर १७०३ मध्ये राणोजीराव शिंदे यांनी त्याचा पुन्हा जीर्णोद्धार करून सध्याचे मंदिर बांधले. सध्याची केदारेश्वर व रामलिंग ही मंदिरे अनुक्रमे दौलतराव शिंदे आणि मालजी निकम पन्हाळकर यांनी अनुक्रमे १८०८ आणि १७८० मध्ये बांधली. चोपडाईचे मंदिर प्रीतिराव चव्हाण हिंमतबहाद्दर यांनी १७५० मध्ये बांधले. केदारेश्वर मंदिरापुढे काळ्या पाषणाचे दोन नंदी आहेत. वाडीच्या बाहेर उत्तरेकडे थोडय़ा अंतरावर यमाईचे मंदिर असून, तेही राणोजीराव शिंद्यांनी बांधले. यमाईच्या मंदिरासमोरच दोन कुंडे वा तीर्थे असून त्यांतील एक तीर्थ जिजाबाईसाहेब यांनी १७४३ मध्ये बांधले असून, दुसरे जमदग्न्य तीर्थ राणोजीराव शिंद्यांनी बांधले आहे. डोंगरावर आणखीही काही तीर्थे व दोन पवित्र झरे आहेत. एक झरा कुशावर्त कुंडातून निघतो, तो गोडा म्हणून आणि दुसरा उत्तरेकडून येणारा व वारणेला मिळणारा झरा हैमवती नावाने ओळखला जातो. जोतिबा डोंगरावरील मंदिरे डोंगरावरच सापडणा-या निळसर रंगाच्या उत्तम दगडांनी बांधली असून, त्यांची रचना हिंदू पद्धतीची आहे.

येथील प्रमुख देव जोतिबा असून तो पौगंडद ऋषीचा मुलगा म्हटला जातो. परंपरेनुसार रत्नासुर नावाच्या दैत्याचा त्याने या ठिकाणी वध केल्यामुळे हे स्थान रत्नागिरी म्हणून ओळखले जाते. जोतिबामंदिरातील गाभारा पितळी पत्र्याने मढविलेला असून, जोतिबाच्या मागील कमान व त्याचे आसन चांदीचे आहे. जोतिबाची मूर्ती चतुर्भुज व काळ्या पाषाणाची असून ती १०६ मी. उंच आहे. हातात खड्ग, पानपात्र, त्रिशूळ व डमरू आहे. मस्तकावर गंगा असून वाहन अश्व आणि उपवाहन सर्प आहे. भैरव, खंडोबा व कोकणातील रवळनाथ यांच्याशी जोतिबाचे बरेच साम्य आहे. मंदिराच्या परिसरात अनेक दीपमाळा आहेत. जोतिबाची भार्या यमाई. तिची मूर्ती ओबडधोबड, दगडी व शेंदूर फासलेली आहे. चैत्री पौर्णिमेला जोतिबाची मोठी यात्रा भरते. यात्रेच्या वेळी जोतिबाची पितळी उत्सव मूर्ती पालखीत बसवून समारंभपूर्वक लग्नासाठी यमाईच्या मंदिराकडे नेतात. जोतिबा व यमाई यांच्या विवाह समारंभाचा एक भाग म्हणून त्यांच्यामध्ये शिक्काकटय़ार ठेवतात. जोतिबाच्या नावानं चांग भलं, अशा भाविकांच्या गजराने डोंगर दुमदुमून जातो. रा. चिं. ढेरे यांनी जोतिबा हे खंडोबाप्रमाणेच क्षेत्रपाळ दैवत असल्याचे मत मांडले आहे.

चैत्री पौर्णिमेला हा जोतिबाच्या वार्षिक यात्रेचा प्रमुख दिवस असला तरी, दर रविवारी, दर पौर्णिमेस तसेच श्रावण शुद्ध षष्टीसही तेथे लहान स्वरूपाच्या यात्रा भरतात. या दिवशी जोतिबाची मूर्ती पालखीत घालून तिची मोठय़ा समारंभपूर्वक मंदिराभोवती प्रदक्षिणा करवितात.

चैत्री पौर्णिमेच्या यात्रेची सुरुवात चैत्र शु. अष्टमीपासूनच होते. उत्तर भारतातून (ग्वाल्हेर परिसर) तसेच सर्व महाराष्ट्रातून दीड-पावणेदोन लाखांवर लोक यात्रेसाठी जमतात. जोतिबा हे जागृत आणि शक्तिशाली दैवत मानले जाते. जोतिबा हा नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. पुत्रप्राप्ती, रोगनिवारण, धनप्राप्ती संकटनिवारण. हेतूंनी जोतिबाला भक्त नवस बोलतात व फलप्राप्तीनंतर मोठय़ा श्रद्धेने ते फेडतात. बगाडाचीही प्रथा येथे पूर्वी होती. सोन्या-चांदीचे दागिने, सोन्या-चांदीच्या लहान अश्वप्रतिमा, सोन्या-चांदीचे हात, मिठाई, नारळ. ते जोतिबाला वाहतात. चैत्र शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत दररोज जोतिबाची पालखी निघते. पालखी निघाली म्हणजे भाविक लोक नारळ वाहतात व गुलाल-खोबरे उधळतात. महाराष्ट्रातील सर्व जाती-जमातींचे लोक जोतिबाचे उपासक असून अनेक कुटुंबांचे जोतिबा हे कुलदैवत आहे. ग्वाल्हेरच्या शिंद्यांचेही ते कुलदैवत आहे.

दासगणू

$
0
0

आधुनिक मराठी संतकवी. मूळ नाव गणेश दत्तात्रेय सहस्र्बुद्धे. नगर जिल्ह्यातील अकोळनेर या गावी जन्म. शालेय शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी काही दिवस नोकरी केली. वामनशास्त्री इस्लामपूरकर हे त्यांचे गुरू होते. त्यांचे पारमार्थिक गुरू शिर्डीचे साईबाबा हे होते. गुरुपदेशानंतर ते स्वत:ला ‘दासगणू’ नावाने संबोधू लागले.

दासगणू हे प्रथमत: लावण्या, पोवाडे करीत, पण गुरूच्या आज्ञेने त्यांनी कीर्तन व भक्तीपर वाङ्मय रचण्यास सुरुवात केली. त्यांची कीर्तने नावीन्यपूर्ण आहेत. दासगणूंची संतकवी म्हणून विशेष ख्याती आहे. ईशभक्ती, व्यावहारिक सूक्ष्म निरीक्षण व संतकाव्याचे दृढ संस्कार यांमुळे त्यांच्या काव्यास विविधता व उदात्तता प्राप्त झाली आहे.

महीपतीप्रमाणे त्यांनी संतांची ओवीबद्ध चरित्रे लिहिल्यामुळे त्यांना ‘आधुनिक महिपती’ म्हणतात. संतांची चरित्रे लिहिताना ते त्या संतांची ऐतिहासिक माहिती गोळा करीत, कागदपत्रांचा अभ्यास करीत. एकनाथ चरित्र, गजानन महाराज चरित्र, ही त्यांनी लिहिलेली चरित्रे प्रसिद्ध आहेत. भक्तिरसामृत, भक्तलीलामृत व संतकथामृत हे त्यांचे संतचरित्रात्मक ग्रंथ आहेत.

अमृतानुभव, भावार्थमंजरी, नारदभक्तिसूत्रबोधिनी, ईशावास्यबोधिनी हे त्यांचे प्रमुख ओवीबद्ध टीकाग्रंथ होत. या व्यतिरिक्त त्यांनी पौराणिक कथा, स्तोत्रे, अष्टके, सुभाषिते, प्रासंगिक स्फुट कविता, कीर्तनोपयोगी आख्याने इत्यादी वाङ्मय लिहून ईशभक्तीचा प्रसार व प्रचार केला. मराठीमध्ये इतकी प्रचंड रचना करणारा कवी अलीकडच्या काळात क्वचित झाला असेल.

ययाति

$
0
0

सोमवंशातील एक विख्यात सम्राट. हा नहुष व विरजा (वा अशोकसुंदरी) यांचा द्वितीय पुत्र आणि कौरव, पांडव, कृष्ण इत्यादींचा पूर्वज होता. प्रयागजवळील प्रतिष्ठान ही त्याची राजधानी होती. ऋग्वेदामध्ये नहुषपुत्र ययाती हा एक मंत्रद्रष्टा ऋषी असून ऋग्वेदातच इतर दोन ठिकाणी यज्ञकर्ता वगैरे रूपाने त्याचा उल्लेख आहे. महाभारत व पुराणांतून त्याची विस्तृत कथा आढळते. कौरव-पांडवांचा वैदिक कुलाशी संबंध जोडता यावा म्हणून वैदिक ययाती व महाभारतातील ययाती या भिन्न व्यक्तींना एकरूपत्व देण्यात आले असावे, असे काही अभ्यासकांचे मत आहे.

यती हा थोरला भाऊ विरक्त असल्यामुळे ययातीला राज्य प्राप्त झाले. असुरगुरू शुक्राचाऱ्यांची कन्या देवयानी ही त्याची प्रथम पत्नी होती. क्षत्रिय ययाती व ब्राह्मण देवयानी यांचा विवाह हे प्राचीन भारतातील प्रतिलोम विवाहाचे ठळक उदाहरण होय. देवयानीची दासी बनून आलेली असुरराज वृषपर्वा याची कन्या शर्मिष्ठा ही त्याची द्वितीय पत्नी होती. अश्रुबिंदुमती या त्याच्या तृतीय पत्नीचाही उल्लेख मिळतो. देवयानीपासून त्याला यदू व तुर्वसू आणि शर्मिष्ठेपासून अनू, द्रुह्यू व पूरू हे पुत्र झाले. त्याला माधवी नावाची कन्या असल्याची व वसुमन प्रतर्दन, शिबी व अष्टक हे तिचे पुत्र असल्याची कथा आढळते.

त्याचा कनिष्ठ पुत्र पुरू हा प्रतिष्ठानच्या गादीवर बसला व इतरांना वेगवेगळी राज्ये वाटून देण्यात आली. यदू व पूरू यांच्यापासून अनुक्रमे यादव व पौरव या विख्यात वंशशाखा प्रवर्तित झाल्या. यदू ते पूरू ही पाच नावे ऋग्वेदात राजांची वा जनसमूहांची नावे असून दाशराज्ञयुद्धा त सुदासाविरुद्ध लढणारांत त्यांचा अंतर्भाव होता. ऋग्वेदात त्यांचा ययातीशी संबंध नाही. वेदोत्तर काळातील ययातीने आपल्या मुलांना ही पाच वैदिक नावे दिली असावीत किंवा वेदोत्तर काळातील कथाकारांनी त्यांचा ययातीशी संबंध जोडला असावा, असे दिसते.

देवयानी व शर्मिष्ठा यांच्यातील वैर व मत्सर यांमुळे ययातीच्या जीवनात मोठा कौटुंबिक संघर्ष झाला होता. देवयानीच्या तक्रारीमुळे शुक्राचार्यानी त्याला अकाली वार्धक्य येण्याचा शाप आणि आपल्या वार्धक्याच्या बदली पुत्राचे तारुण्य मिळू शकेल, असा उ:शाप दिला होता. इतर पुत्रांनी त्याचे वार्धक्य घेण्यास नकार दिला; परंतु पुरूने ते घेतले. एक हजार वर्षे तारुण्याचे उपभोग घेऊनही तृप्ती न झाल्यामुळे ययातीने पुरूला तारुण्य परत दिले आणि वानप्रस्थाश्रम स्वीकारून तेथून स्वर्गाकडे प्रस्थान केले. अहंकारामुळे त्याचे स्वर्गातून पतन झाले. तेव्हा कन्या माधवी, तिचे चार पुत्र व गालव ऋषी यांनी आपल्या पुण्याईने त्याला पुन्हा स्वर्गात पाठविले. सार्वभौम, पृथ्वी जिंकणारा, काशीपती, शेकडो यज्ञ करणारा, दानशूर, शिवभक्त, यमसभेचा सदस्य इ. प्रकारे त्याचे वर्णन करण्यात आले आहे.

उपभोगांच्या मार्गाने वासनांची तृप्ती होत नाही, हे ययातीच्या चरित्रातून प्रतीकात्मकरीत्या सूचित झाले आहे. त्याच्या चरित्रातील या वैशिष्टय़ामुळे अनेक साहित्यिकांनी त्याच्या चरित्रावर विविध कलाकृती निर्माण केल्या आहेत. त्याच्या चरित्रावर आधारलेल्या ययाती या वि. स. खांडेकरांच्या कादंबरीस ज्ञानपीठ पुरस्कारही मिळाला आहे.


श्रीमद्भागवत गीतारहस्य

$
0
0

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी लिहिलेले गीतेवरील भाष्य. श्रीमद्भागवत् गीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र हे ह्या गंथाचे संपूर्ण नाव आहे. तथापि गीतारहस्ये या नावानेच हा गंथ सामान्यत: ओळखला जातो. ह्या गंथाची पहिली आवृत्ती १९१५ साली निघाली. केसरी प्रकाशनातर्फे ‘समग लोकमान्य टिळक’ ह्या योजनेतील एक ग्रंथ म्हणून हे गीतारहस्य १९७४ साली प्रसिद्ध झालेले आहे.

ह्या गंथाची पूर्वपीठिका थोडक्यात अशी : १९०८ साली टिळकांना राजद्रोहाच्या आरोपावरून कारावासाची शिक्षा होऊन ती भोगण्यासाठी त्यांना ब्रह्मदेशातील (म्यानमार) मंडाले येथील तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्यावेळी हा ग्रंथ लिहिण्यासाठी आवश्यक ती पुस्तकादी साधने पुण्याहून मंडाले येथे नेण्याची परवानगी तत्कालीन ब्रिटिश सरकारतर्फे मिळाल्याने ह्या ग्रंथाचा पहिला खर्डा टिळकांनी (१९१०-११च्या हिवाळ्यात) तुरुंगात लिहून काढला. पुढे वेळोवेळी सुचत गेल्याप्रमाणे त्यात सुधारणा केल्या. त्यातील काही सुधारणा तुरुंगातून मुक्त झाल्यानंतरही केल्या. ह्या ग्रंथाचा पहिला खर्डा शिसपेन्सिलीने केलेला होता. वयाच्या सोळाव्या वर्षी गीतेचा पहिल्यांदा संपर्क आल्यापासून टिळकांनी अनेक वर्षे केलेल्या गीता चिंतनाचे आणि त्याच्याशी संबंधित अशा अनेक ग्रंथांच्या त्यांनी केलेल्या अभ्यासाचे फळ म्हणजे गीता रहस्य हा ग्रंथ होय.

गीतेवर जी भाष्ये झाली, त्यात आद्य शंकराचार्याचे गीता भाष्य हे सर्वात प्राचीन होय. ह्या भाष्यात शंकराचार्यानी गीतेचा अर्थ निवृत्तीपर लावलेला आहे. तथापि शंकराचार्यापूर्वी ही गीतेवर भाष्ये आणि टीका झाल्या होत्या. गीतेवरील शांकरभाष्यातच ह्या टीकाकारांच्या मतांचा निर्देश आलेला आहे. ह्या टीकाकारांनी गीतेचा अर्थ प्रवृत्तिपर लावलेला होता. ज्ञानी माणसाने आमरणान्त स्वधर्मोक्त कर्म केले पाहिजे, अशी ह्या टीकाकारांची भूमिका होती. हा अर्थ शंकराचार्याना मान्य नसल्यामुळे तो खोडून काढून आपला निवृत्तीपर असा गीतार्थ प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी आपले भाष्य लिहिले, असा त्यांच्या भाष्याच्या उपोद्घातात स्पष्ट निर्देश आहे. वैदिक काळात प्रवृत्तीवाद प्रभावी होता; तथापि गौतम बुद्धाच्या उदयापासून आणि पुढे बौद्ध धर्माचा ऱ्हास झाल्यानंतरही शंकराचार्याच्या निवृत्तीपर गीता भाष्याच्या प्रभावामुळे निवृत्तीवाद, येथे बहुमान्य ठरला. ब्रह्म हीच सत्य वस्तू असून ऐहिक जग व जीवन हे मिथ्या, मायामय आहे. त्यामुळे चित्त शुद्ध होऊन ब्रह्म व आत्मा ह्यांच्या ऐक्याचे ज्ञान प्राप्त करून घेण्याची पात्रता अंगी येण्यासाठी स्मृतिगंथप्रणीत गृहस्थाश्रमाची कर्मे केली, तरी अखेरीस ती सर्व सोडून देऊन संन्यास घेतला पाहिजे, अन्यथा मोक्षप्राप्ती नाही, असा निवृत्तीमार्गी विचार आहे. टिळकांनी ह्या निवृत्तीवादाचे खंडन करून प्रवृत्तीमार्गाचा पुरस्कार केला.

निवृत्तीपर मोक्षमार्गाचे गीतेत मुळीच विवेचन नाही, असे टिळकांचे म्हणणे नाही; परंतु गीतेमधला हा मुख्य मुद्दा नाही. युद्ध करणे हा क्षत्रियाचा धर्म असला तरी, युद्धात कुलक्षयादी भयंकर पापे घडत असल्यामुळे हे युद्ध माझ्या आत्मकल्याणाचा नाश करील, अशा परिस्थितीत युद्घ करू का नको, अशा कर्तव्यमोहात पडलेल्या अर्जुनाला मोहमुक्त करण्यासाठी गीता सांगितली गेली. कर्मे ही कधीच सुटत नाहीत आणि ती सोडूही नयेत. ज्ञानमूलक व भक्तिप्रधान असा कर्मयोग आचरिल्यास, म्हणजे त्यानुसार कर्मे केल्यास कोणतेच पाप लागत नाही आणि मोक्षही मिळतो. ह्या कर्मयोगाचेच गीतेत प्रतिपादन आहे, असा टिळकांचा अभिप्राय आहे.

टिळकांच्या गीतारहस्याची एकूण पंधरा प्रकरणे असून गीतेचे बहिरंग परीक्षण ह्या नावाने एक परिशिष्ट-प्रकरणही ह्या ग्रंथात अंतर्भूत केलेले आहे. गीतारहस्यातील पंधरा प्रकरणे अशी : (१) विषयप्रवेश, (२) कर्मजिज्ञासा, (३) कर्मयोगशास्त्र, (४) आधिभौतिक सुखवाद, (५) सुख-दु:खविवेक, (६) आधिदैवतपक्ष आणि क्षेत्रक्षेत्रज्ञविचार, (७) कापिल-सांख्यशास्त्र किंवा क्षराक्षरविचार, (८) विश्वाची उभारणी व संहारणी, (९) अध्यात्म, (१०) कर्मविपाक व आत्मस्वातंत्र्य, (११) संन्यास व कर्मयोग, (१२) सिद्धावस्था व व्यवहार, (१३) भक्तिमार्ग, (१४) गीताध्यायसंगती, (१५) उपसंहार.

गीता आणि महाभारत ह्यांचे कर्तृत्व, गीता आणि उपनिषदे ह्यांचा काळ, गीता आणि बह्मसूत्रे ह्यांची पूर्वापरता, भागवत धर्माचा उदय व गीता, आपल्यासमोर आज असलेल्या गीतेचा काळ, गीता आणि बौद्ध ग्रंथ, गीता आणि ख्रिस्ती बायबल असे विषय गीतेच्या बहिरंग परीक्षणात आलेले आहेत.

ज्या अनेक वादांच्या आणि प्रमेयांच्या आधारे गीते त कर्मयोगाचे प्रतिपादन केलेले आहे व ज्यांचा निर्देश कधी कधी फारच संक्षिप्तरीत्या केलेला असतो, त्या सिद्धांतांची आधी माहिती असल्याखेरिज गीतेतील विवेचनाचे पूर्ण मर्म लक्षात येत नाही. म्हणून गीतेत जे जे विषय किंवा सिद्धांत आले आहेत, त्यांचे प्रकरणश: विभाग पाडून त्यांतील प्रमुख युक्तिवादांसह गीतारहस्यात त्यांचे थोडक्यात निरूपण करण्याचा हेतू उपयुक्त प्रकरणे पाडण्यामागे असल्याचे टिळकांनी ह्या ग्रंथाच्या प्रस्तावनेतच स्पष्ट केलेले आहे. शिवाय गीतेच्या प्रमुख सिद्धांतांची इतर धर्मातील व तत्त्वज्ञानातील सिद्धांतांशी आवश्यक तेथे थोडक्यात तुलना करून दाखविली आहे. अखेरीस गीतेचे श्लोकश: भाषांतर दिले आहे. तसेच त्याबरोबर टीकेच्या रूपाने अनेक टीपा दिल्या आहेत.

हा ग्रंथ बराच मोठा असला, तरी टिळकांचे मुख्य विवेचन संन्यास व कर्मयोग आणि सिद्धावस्था व व्यवहार ह्या एकामागोमाग एक अशा आलेल्या प्रकरणांत सविस्तरपणे आलेले आहे. कर्मयोग श्रेष्ठ का, याबद्दल प्रत्यक्ष गीतेत सांगितलेली कारणे ह्या प्रकरणांत नमूद केलेली आहेत. ज्ञानप्राप्तीनंतर ज्ञान्याला स्वत:चे असे काही कर्तव्य राहिले नाही आणि त्याचा पूर्ण वासनाक्षय झाला, तरीही त्याला कर्म सुटत नाही म्हणून नि:स्वार्थ बुद्धीने फलाशा सोडून कर्म करणे आवश्यक आहे, हे टिळकांनी दाखवून दिले आहे. शंकराचार्यानी ज्ञाननिष्ठा वा संन्यासनिष्ठा ही अंतिम निष्ठा मानली आणि चित्तशुद्धीचे बाह्यसाधन म्हणूनच कर्मयोग स्वीकारला. चित्त शुद्ध झाल्यानंतर कर्ममार्गाचा त्याग केला पाहिजे. संन्यास स्वीकारला पाहिजे. संन्यासावस्थेतच ब्रह्मज्ञान प्राप्त होते व ते सतत टिकविता येते, असे शंकराचार्याचे प्रतिपादन आहे. ह्या खेरिज दुसरीही एक मतप्रणाली भारतीय परंपरेत आहे ती अशी : चित्तशुद्धी झाल्यानंतर फलाशा न धरता, निष्काम बुद्धीने कर्मयोग आचरणे शक्य होईल. त्यामुळे चित्तशुद्धी झालेल्याने संन्यासच घ्यायला हवा, असे नाही. संन्यास वा कर्मयोग यांपैकी कोणताही पर्याय स्वीकारावा आणि अखेपर्यंत टिकवावा. टिळकांनी ह्या दोन मतप्रणालींपेक्षा वेगळा विचार मांडलेला आहे. साधकावस्थेपासून सिद्धावस्था प्राप्त झाल्यानंतरही म्हणजे आमरण-कर्ममार्गाचे अनुकरण करणे प्रशस्त, असा गीतेचा अभिप्राय असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

माणूस सिद्धावस्थेला पोहोचला त्याला स्वत:साठी काहीही प्राप्त करून घेणे राहिलेले नसले तरी, समाजधारणेसाठी त्याने कर्मे केली पाहिजेत. माणूस जेव्हा सिद्धावस्थेला पोहोचतो, तेव्हा त्याचे मन शुद्ध, निर्मळ झालेले असते. वासनांवर, विकारांवर त्याने विजय मिळविलेला असतो. समाजधारणेसाठी करावयाच्या कर्तव्यांची त्याला नेमकी जाण असते. त्यामुळे लोकांसाठी तो आचरणाचा उत्तम आदर्श निर्माण करू शकतो. त्याची जबाबदारी मोठी असते आणि जगाचा व्यवहार चालविण्यासाठी कर्मे आवश्यकच आहेत. निव्वळ चित्तशुद्धी एवढाच कर्माचा उपयोग नाही, असा गीतार्थ टिळकांनी सांगितला आहे.

ब्रिटिशांची भारतावर सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर आपल्या पराभूतपणाचा विचार ब्रिटिश राजवटीतील भारतीय नवशिक्षितांपैकी काही थोडय़ा व्यक्तींनी केला आणि पराभवाच्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी त्यांना नवसंस्कृतीच्या निर्मितीची आणि नव्या भारताचा वैचारिक पाया घालण्याची आवश्यकता जाणवू लागली. भारताच्या मौलिक परिवर्तनाच्या दिशेने वैचारिक अंगाने त्यांनी प्रयत्न केले. लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य हा अशाच प्रयत्नांचा एक महत्त्वाचा भाग होय. टिळक हे स्वत: हिंदू धर्मग्रंथांचे प्रामाण्य मानणारे होते. हे प्रामाण्य गीतेच्या संदर्भातही पूर्णपणे मान्य करून त्याचे एक उत्कृष्ट नवे भाष्य गीतारहस्याच्या रूपाने टिळकांनी निर्माण केले, अशा आशयाचे विचार तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ह्यांनी मांडले आहेत.

चिश्ती, ख्वाजा मुईनुद्दीन (सु. ११४२ –१२३६)

$
0
0

‘चिश्तिया’ नावाच्या सूफी पंथाचे संस्थापक व प्रसिद्ध सूफी संत. संपूर्ण नाव मुईन अल् -दीन हसन चिश्ती. जन्म अरबस्तानात सेस्तान येथे. वयाच्या पंधराव्या वर्षी वडील वारल्यावर खोरासानमध्ये काही काळ भटकून ते बगदादला गेले. तेथे त्यांची नज्म अल् -दीन कुब्रा, सुऱ्हावर्दी, औहद अल्-दीन किरमानी इत्यादी तत्कालीन प्रख्यात सूफी संतांशी गाठ पडली.

११९३ मध्ये ते दिल्लीस आले आणि नंतर थोडय़ाच अवधीत अजमीर येथे गेले. तेथेच ते शेवटपर्यंत होते. अजमीर येथे त्यांची कबर असून रजब महिन्याच्या एक तारखेपासून सहा तारखेपर्यंत दरवर्षी त्यानिमित्त मोठा उरूस भरतो. तेथे त्यांचा सुंदर दर्गा उभारला असून अकबर बादशाह (१५४२ – १६०५) तेथपर्यंत दर्शनासाठी चालत गेल्याचे सांगतात. आजही भारत-पाकिस्तानातीलच नव्हे, तर ब्रह्मदेश, श्रीलंका, आफ्रिका आदी ठिकाणचे अनेक हिंदू-मुस्लीम या उरूसासाठी तेथे येतात.

सलीम चिश्ती हा सूफी संत अकबरकालीन असून त्यांचा दर्गा फतेपूर सिक्री येथे आहे. तेही मोठी मान्यता पावलेला सूफी संत होते. इतरही अनेक चिश्ती संत वंदनीय मानले जातात.

ख्वाजा मुईनुद्दीन हे भारतातील पहिले सूफी संत म्हणून प्रसिद्धीस आले. घोरी राजवट स्थापन करण्यास त्यांनी खूप मदत केली होती. त्यांना ‘आफताब-इ मुल्क-इ हिंद’ (हिंदुस्थानचा सूर्य) असा किताब होता.

(संदर्भ : मराठी विश्वकोश)

आदिमाता

$
0
0

ईश्वर स्त्रीरूपाने किंवा पुरुषरूपाने निरनिराळ्या समाजांत व धर्मात कल्पिलेला आहे. स्त्रीरूपाचा ईश्वर म्हणजे आदिमाता होय व पुरुषरूपाचा ईश्वर म्हणजे आदिपिता होय. जगातील अनेक ख्रि. पू. धर्मामध्ये व समाजांमध्ये आदिमातेची पूजा प्रचलित होती.

भारतात आदिमातेची म्हणजे देवीची पूजा वेदपूर्व काळापासून चालत आलेली असावी. मोहें-जो-दडो व हडप्पा येथील उत्खननात मातृदेवतेची प्रतीके सापडलेली आहेत. ऋग्वेद हा सर्वात प्राचीन धर्मग्रंथ होय. त्यात पुरुषरूप देवाचीच स्तोत्रे प्राधान्याने दिसतात हे जरी खरे असले, तरी सर्व देवांची माता म्हणून अदितीचा वारंवार निर्देश आढळतो. वेदोत्तरकालीन हिंदू धर्मात काली, लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा, महादेवी, पार्वती, अंबा, भवानी, जगदंबा इ. नामाभिधानांनी देवीची आदिमाता म्हणून पूजा भारतातील आसेतुहिमाचल प्रदेशांमध्ये हजारो वर्षे प्रचलित असलेली दिसते.

पुरुषरूप ईश्वरापेक्षा स्त्रीरूप ईश्वराची कल्पना माणसांमध्ये अगोदर आलेली असण्याचा फार संभव आहे. कारण मानवजन्मास पुरुष कारण आहे की नाही, याबाबत आदिमानवांमध्ये अज्ञान किंवा शंका होती. त्या काळी स्त्री हीच जननी हे निश्चित माहीत असल्यामुळे, तिच्याबद्दलच्या आदर व ममता या भावना, विश्वाच्या किंवा जगातील जीवनोपयुक्त पदार्थाच्या उत्पत्तीस कारण म्हणून मानलेल्या किंवा कल्पिलेल्या शक्तीवर स्थानांतरित होणे, अत्यंत स्वाभाविक आहे. मातृभक्तीचे उन्नयन आदिमातेच्या भक्तीत होण्याची प्रक्रिया पित्याबाबतच्या अज्ञानाच्या काळात मातृसत्ताक समाजसंस्थेत झाली.

सर्वच आदिम, अर्धसंस्कृत व पूर्णसंस्कृत जागतिक धर्मामध्ये प्रजा, पशू व धान्य यांच्या समृद्धीकरिता आवश्यक असलेले सुफलताविधी सापडतात.

शिवाची अर्धागी पार्वती किंवा देवी हिचा निर्देश केवळ ‘शक्ती’ या पदानेच धर्मशास्त्रात केलेला दिसतो. देवीपूजेच्या संप्रदायाला म्हणूनच शाक्तपंथ म्हणतात. पुरुषरूप ईश्वराच्या भक्तीला, विशेषत: वारंवार युद्धाची गरज असलेल्या, युयुत्सू समाजातच महती प्राप्त झाली असावी. वैदिक आर्याचा समाज हा युद्धरत व युद्धप्रिय समाज होता, ही गोष्ट इंद्र या युद्धरत, सशस्त्र व शूर देवाच्या प्राधान्यावरून लक्षात येते. प्राचीन ग्रीक समाजातही झूस हा पराक्रमी देव, सर्व देवाधिदेव म्हणून मानला गेला, याचे हेच कारण होय. युद्धात विजय प्राप्त करून देणारा देव, असे इंद्राचे व इतर वैदिक देवांचे वर्णन शेकडो वेळा वेदांत केलेले आहे. त्यामुळे वैदिक वाङ्मयात आदिमाता किंवा देवी हिचा महिमा ग्रथित केलेला दिसत नाही. परंतु हिंदूंच्या धार्मिक विधींमध्ये आणि देवतोत्सवांमध्ये देवीचे माहात्म्य सर्वत्र आढळते. ज्या प्रदेशांत युद्धमानतेची आवश्यकता वर्षानुवर्षे तेथील स्थानिक समाजांना भासली नाही, तेथे देवीपूजा स्थिरावली. ही स्थिरावलेली देवी पुरुषदेवाला मागे सारून कालांतराने युद्धसंस्था आवश्यक झाल्यावर, स्वत:च युद्धाची देवता बनली.

मरकडेय पुराणातील ‘सप्तशती’ हे प्रकरण दुर्गा ही युद्धदेवता कशी आहे, याचे सुस्पष्ट दर्शन घडविते. महाराष्ट्रातील लढाऊ व सत्ताधारी जमातींची दुर्गा किंवा भवानी ही कुलदेवता युद्धसंस्थेमुळे युद्धदेवताही बनली.

(संदर्भ : मराठी विश्वकोश)

वासुदेव

$
0
0

महाराष्ट्रातील एक वैशिष्टय़पूर्ण जात. वृत्तीने हे धार्मिक भिक्षेकरी आहेत. एका ब्राह्मण ज्योतिषास कुणबी स्त्रीपासून सहदेव नावाचा पुत्र झाला आणि या सहदेवापासून आपली जात उत्पन्न झाली, असे या जातीचे लोक सांगतात. भिक्षा मागून ते उदरनिर्वाह करतात आणि घरातल्या मुलाला योग्य वेळी भिक्षा मागण्याची दीक्षाही समारंभपूर्वक दिली जाते. काही वासुदेव शेतीचा व्यवसायही करतात.

वासुदेव जरी भिक्षेकरी असले, तरी ते भिकारी गणले जात नाहीत, कारण त्यांना भिक्षा वाढणे हा धर्माचरणाचा भाग मानला जातो. पहाटेच्या वेळी रामकृष्णांचा नामघोष करीत ते येतात. त्यांचा पोषाख वैशिष्टय़पूर्ण असतो. घोळदार अंगरखा, सरवार, गळ्यात तांबडा शेला आणि डोक्यावर शंकूच्या आकाराची मोरपिसांची टोपी, कंबरेला बांधलेल्या शेल्यात बासरी खोचलेली असते. पायात घुंगरू असतात. वासुदेवाच्या उजव्या हातात चिपळ्या आणि डाव्या हातात टाळ असतो. त्यांच्या तालावर तो सुंदर धार्मिक गाणी म्हणतो आणि नाचतो. गृहिणी त्याला धान्य, पैसे देतात. हे दानही वासुदेव विशिष्ट पद्धतीने स्वीकारतो.

दान देणा-याला तो त्याच्या वाडवडिलांचे नाव विचारतो आणि त्यांची नावे घेऊन महाराष्ट्रातील विविध देवतांना व संतांना ते दान ‘दान पावलं दान पावलं’ असे एक गाणे म्हणून पोचते करतो. पंढरपूरचा ‘इट्टोबाराया’, कोंढणपूरची ‘तुक्काबाई’, जेजुरीचा ‘खंडोबा’, सासवडचा ‘सोपानदेव’, आळंदीचा ‘ग्यानुबादेव’, देहूचा ‘तुकारामबाबा’, शिंगणापूरचा ‘महादेव’, मुंगीपैठणातला ‘नाथमहाराज’ अशा सर्वाना वासुदेव दान पावल्याचे सांगतो. म्हणजे हे दान वासुदेवाच्या हातात पडत असले, तरी वासुदेवाची भावना ते दान देवदेवतांना व संतांना पोहोचविण्याचे असते. दाताही दान आपल्या वाडवडिलांच्या नावे देत असल्यामुळे दान देऊन स्वत:साठी नव्हे, तर आपल्या वाडवडिलांच्या पुण्याईत भर पडावी, अशीच त्याची भावना असते. दान पावल्यानंतर वासुदेव बासरी वाजवतो आणि स्वत:भोवती गिरक्या घेतो.

वासुदेव हा कृष्णभक्त असल्यामुळे त्याने श्रीकृष्णाचा वेष घेतला, असे वासुदेवाच्या पोषाखाचे स्पष्टीकरण प्रा. श्री. म. माटे ह्यांनी दिले असून, ‘वासुदेव ही संस्था म्हणजे लोकसंस्कृतीच्या क्षेत्रातील भागवत संप्रदायच आहे,’ असे मत डॉ. रा. चिं. ढेरे यांनी मांडले आहे.

वासुदेवाच्या गाण्यांत कृष्णचरित्र, भक्तीची थोरवी, प्रपंचनीती असे विषय येतात. अनेकदा साध्या-सोप्या भाषेत ही गाणी वेदांताचाही बोध करतात. वासुदेव आणि त्यांचा व्यवसाय ह्यांना हजार-बाराशे वर्षाची तर परंपरा आहे. महानुभाव साहित्यात ‘भ्रीडी’ या नावाने वासुदेवाचा निर्देश आलेला दिसतो. ज्ञानदेवांनी तसेच नामदेवांनी वासुदेवावर रूपके केली आहेत.

गावोगावी भरणा-या जत्रांत वासुदेव दिसतात. काही लोक नदीच्या पात्रात उभे राहून वासुदेवाला दान देतात. वेगवेगळ्या वासुदेवांची हक्काची वेगवेगळी गावे असतात आणि त्या गावांत प्रत्येक वर्षी फेरी मारून ते दान घेतात. ज्या गावात त्यांचा हक्क नसतो, त्या गावात दान घेताना ते आपली मोरपिसांची टोपी घालीत नाहीत.

(संदर्भ : मराठी विश्वकोश)

तुळशी विवाह

$
0
0

तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे. हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळस ही भारताच्या सर्व प्रांतांत व सर्व भागांत उगवणारी वनस्पती आहे. बहुतेक हिंदू कुटुंबांच्या घरामागे किंवा घरासमोर अंगणात तुळशी वृंदावन असते. कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे. कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी असते. कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी होय. अशी श्रद्धा आहे की, या दिवशी श्रीविष्णू झोपेतून जागे होतात आणि चतुर्मास संपतो. विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात. हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे.

तुळशी विवाह म्हणजे तुळशी (पवित्र तुळस) वनस्पतीच्या रोपाचे शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार श्रीकृष्ण याच्याशी विवाह प्रबोधिनी एकादशीपासून करण्याची पूजोत्सव प्रथा आहे. भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात, तेव्हा तुळशीशी लग्न लावतात. भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहेत, तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते. विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव कार्तिक द्वादशीपासून पौणिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात, पण मुख्यत: द्वादशीला करतात. तुळशी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे. हे व्रत केल्याने कर्त्यांला कन्यादानाचे फल मिळते असे मानले जाते.

घरातीलच कन्या मानून, घरातील तुळशी वृंदावनाची-तुळशीचे रोप असलेल्या कुंडीची-गेरू व चुन्याने रंगरंगोटी करतात, सजवितात. त्यावर बोर चिंच आवळा, कृष्णदेव सावळा असे लिहितात. बोर, चिंच, आवळा, सीताफळ, कांद्याची पात त्यात ठेवतात. कुटुंबातील कर्ता माणूस स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा करतो. नंतर त्यांना हळद व तेल लावून मंगल स्नान घालतो. तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात व त्यावर मांडव म्हणून उसाची वा धांडय़ाची खोपटी ठेवतात. पूजेचे उपचार समर्पण करून विष्णूला जागे करतात व त्यानंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो. कर्त्यांने यानंतर तुळशीचे कन्यादान करावे व नंतर मंत्रपुष्प आणि आरती करावी, असा संकेत आहे. घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू आहे. या विधीच्या वेळी तुळशीभोवती दीप आराधना करण्याची पद्धती आहे.

गोवा, दीव आणि दमण येथे तुळशी विवाह सार्वजनिकरीत्या साजरा होतो. तुळशीची व बाळकृष्णाची वाद्यांच्या आणि फटाक्यांच्या दणदणाटात सरकारी इतमामात मिरवणूक निघते. सन २०१७ मध्ये गोव्यात तुळशी विवाहाचे पौरोहित्य महिलांनी केले आणि गोव्याच्या राज्यपालांनी तुळशीचे कन्यादान केले.

आख्यायिका
कांचीनगरीत कनक नावाचा राजा होता. त्याला नवसाने एक मुलगी झाली, तिचे नांव किशोरी होते. तिची पत्रिका पाहून ज्योतिषाने सांगितले, जो तिच्याशी विवाह करेल त्याच्या अंगावर वीज पडून तो मरेल. एका ब्राह्मणाने किशोरीला द्वादशाक्षरी विष्णू मंत्र सांगितला; त्या मंत्राचा जप करावा, तुळशीची पूजा व कार्तिक शुद्ध नवमीला तिचा विष्णूशी विवाह लावावा, असे व्रत त्यांनी सांगितले व ती त्याप्रमाणे करू लागली.

एकदा एका तरुणाने तिला पाहिले व तो तिच्यावर मोहित झाला. माळिणीच्या मदतीने स्त्री वेष घेऊन त्या माळिणीबरोबर तो किशोरीकडे आला. ती माळीण म्हणाली, ही माझी मुलगी आहे. फुलांची रचना करण्यात तरबेज आहे. तुला देवासाठी फुलांच्या नाना प्रकारच्या रचना करून देत जाईल. तो तरुण किशोरीकडे दासी म्हणून राहू लागला. कांची राजाचा पुत्र मुकुंद हाही किशोरीवर मोहित झाला होता. तो सूर्याची खूप उपासना करायचा. सूर्याने स्वप्नात दृष्टांत देऊन त्याला सांगितले की, तू किशोरीचा नाद सोडून दे, तिच्याशी विवाह करणारा वीज पडून मरेल. मुकुंद सूर्याला म्हणाला, तुझ्यासारख्या देवाला तिचे वैधव्य टाळता येईल. किशोरी मला लाभली नाही तर, मी अन्न-पाणी वज्र्य करून मरून जाईन.

सूर्याने किशोरीच्या वडिलांना दृष्टांत देऊन सांगितले की राजपुत्र मुकुंदाला तू आपली मुलगी दे. कनक राजाला हा विवाह मान्य करणे भाग पडले. कार्तिक द्वादशी ही लग्नाची तिथी ठरली. तरुणाला हे सर्व कळले. तो खूप दु:खी झाला व त्याने ठरवले की, लग्न मंडपात जाण्याआधी तिचा हात धरायचा त्याच वेळी मेघगर्जनांसह विजा कडकडल्या. किशोरीही भांबावून गेली, ती बाहेर आली व तरुणाने तिचा हात धरला व त्याच क्षणी त्या तरुणाच्या डोक्यावर वीज कोसळली आणि तो मरण पावला. नंतर राजपुत्र मुकुंद याच्याशी तिचा विवाह झाला. तुळशी व्रताच्या प्रभावाने किशोरीचे वैधव्य टळले. अशी आख्यायिका आहे.

पोतराज

$
0
0

‘मरिआई’ या ग्रामदेवतेचा उपासक. पोतराज हा शब्द म्हणजे ‘पोत्तुराजू’ या तमिळ शब्दाचे रूपांतर होय. शब्दाप्रमाणेच पोतराजाचे आचरण, पूजापद्धती, नृत्य इत्यादींवरही द्रविड संस्कृतीचा प्रभाव दिसतो. दक्षिणेत ‘सात बहिणी’ या नावाच्या ग्रामदेवी प्रसिद्ध आहेत. त्यांचा भाऊ असलेल्या एका ग्रामदेवाला ‘पोत्तुराजू’ म्हणतात. मरिआईला लक्ष्मीआई असेही म्हणतात. त्यामुळेच पोतराजाला ‘मरिआईवाला’ व ‘लक्ष्मीआईवाला’ अशीही नावे आहेत. पोतराज व त्याचा परिवार गावात येतात, तेव्हा ‘कडकलक्ष्मी’ आली असे म्हटले जाते. मरिआई ही कडक देवी असल्यामुळे तिला कडकलक्ष्मी म्हणतात. पोतराजाच्या हातातील कोरडय़ाला ‘कडक’ असे नाव असल्यामुळे तिला ‘कडकलक्ष्मी’ हे नाव मिळाले, असे सरोजिनी बाबर यांचे मत आहे. लक्ष्मी हा शब्द येथे विष्णुपत्नी या अर्थाने आलेला नसून, अंबाबाई या अर्थाने आला आहे.

पोतराज पुरुष असूनही तो बहुतांशी स्त्रीवेषात असतो. त्याच्या कंबरेभोवती असलेला हिरव्या खणांचा घागरा हा लिंबाचा पाला नेसण्याच्या प्रथेचा अवशेष असण्याची शक्यता आहे. त्याच्या कंबरेच्या वरचा भाग उघडा असतो, दाढी राखलेली नसते, पण मिशा मात्र असतात. त्याने स्त्रियांप्रमाणे वाढविलेल्या केसांचा बहुदा अंबाडा बांधलेला असतो व कपाळावर हळद व कुंकू यांचा मळवट असतो. डोक्यावर मरिआईचा देव्हारा व हातात मोरपिसांचा कुंचा घेतलेली त्याची पत्नीही त्याच्याबरोबर असते.

पोतराज मंगळवारी वा शुक्रवारी गावात येतो, तेव्हा डफडे व क्वचित ढोलके वाजवत असतो. गावात मरिआईचा फेरा आल्याची घोषणा तो करतो. अंगाला डावी-उजवीकडे डोल देत तो नाचतो, तेव्हा त्याची पत्नीही नाचत असते. तो ‘आलीया मरिबाई’, ‘बया! दार उघड’ ही गीते म्हणतो. ओवी छंदातील या गीतांतून प्रामुख्याने मरिआई, लक्ष्मीआई, कोल्हापूर इत्यादींचे महात्म्य असते. एकनाथांचे ‘बया! दार उघड’ हे प्रसिद्ध भारूड पोतराजाच्या भूमिकेतून लिहिलेले आहे. मरिआईच्या देव्हा-याचे दार उघडावे आणि तिने प्रसन्न व्हावे, यासाठी पोतराज आत्मपीडनाचा मार्ग पत्करतो. नाचत असतानाच शेंदूर फासलेला कोरडा हातात घेऊन त्याचे फटके स्वत:च्या अंगाभोवती मारणे, दंडाला दोरी बांधून दंडात दाभण खुपसणे, दातांनी स्वत:च्या मनगटाचा चावा घेणे इत्यादी प्रकारे तो आत्मक्लेश करून घेतो. त्यानंतर देव्हा-याचे दार उघडते. मग त्याच्या अंगात आलेली देवी तिला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पोतराजाच्या तोंडून देते. मग स्त्रिया देवीची पूजा करून तिची ओटी भरतात.

पोतराजाला पैसे व सुपातून धान्य दिले जाते. महाराष्ट्रातील पोतराजांपेक्षा दक्षिणेतील पोतराज अधिक उग्र असतात, असे दिसते. मरिआईच्या कोपाने पटकी, देवी इत्यादी साथी येतात आणि पोतराजाने तिला प्रसन्न केले की, त्या नाहीशा होतात, अशी लोकांची समजूत असते. प्रत्येक गावात पोतराज नसतो; परंतु पटकीची साथ आली असता मरिआईचा गाडा बाहेर नेण्यासाठी त्याला बोलावले जाते. या विधीचे पौरोहित्य तोच करतो. गाडय़ावर देवीची मूर्ती ठेवून गाडा गावाच्या वेशीबाहेर नेला जातो आणि तो नेताना देवीने पुन्हा कोणीकडूनही गावात येऊ नये, यासाठी पोतराज सगळीकडून ‘गाव बांधण्या’चा एक विधी करतो.

सरस्वती

$
0
0

भारतीय संस्कृतीतील एक श्रेष्ठ देवता. प्राचीन वाङ्मयातून वाक् , वाणी, वाग्देवता, वागीश्वरी, शारदा, भारती, वीणापाणी, ब्रह्मी, भाषा, गीर, वर्णमाला, विशाला, मेघा, कुटीला इत्यादी भिन्न नावांनी तिचा उल्लेख आढळतो. सरस्वती या शब्दाची व्युत्पत्ती सृ = वाहणे, हलणे या धातूपासून झाली असून त्याचा अर्थ गतिमती असा आहे. आध्यात्मिक अर्थाने ती निष्क्रिय ब्रह्माचे सक्रिय रूप असून तिला ब्रह्मा-विष्णू-महेश या त्रिवर्गाना गती देणारी शक्ती म्हटले आहे.

ऋग्वेदात तिला नदीचे मानवी रूप मानले आहे आणि एके ठिकाणी देवतांची राणी म्हटले आहे. उपनिषदांत सरस्वतीची वाणीशी एकरूपता दर्शविली आहे. त्यामुळे तिचा पुढे वाग्देवी असा उल्लेख होऊ लागला. कालांतराने वाणीची ती स्फूर्तीदेवता आणि विज्ञान व साहित्य यांची अधिष्ठात्री बनली. शतपथ, ऐतरेय, तैत्तिरीय आदी ब्राह्मणग्रंथातही वाणीलाच सरस्वती म्हटले आहे, तर बृहदारण्यकात तिचा वाचारूपी धेनू म्हणून उल्लेख येतो. गंधर्व आणि देवांनी वाग्देवीला प्रसन्न करण्यासाठी संगीत व तंतूवाद्य यांचा मेळ घातला. त्यामुळे ललित कलांची अधिष्ठात्री ही उपाधी तिला मिळाली आणि चौसष्ट कलांची ती तज्ज्ञ मानण्यात येऊ लागली. पुराणांनी व तंत्रांनी तिची महती मातृदेवता म्हणून वर्तविली. पुढे मातृदेवतेतून तिचे शक्तिदेवतेत रूपांतर झाले. या सर्व संकल्पनांतून सर्वश्रेष्ठ माता, विद्यादेवता, शारदा अशी तिची प्रतिमा तयार झाली.

सर्व मंत्रांतील श्रेष्ठ गायत्री मंत्रात सरस्वती एकरूप झाली आणि नंतर ही गायत्री-वाग्देवी सरस्वतीच बनून राहिली. यावरून ऋग्वेद ते पुराणकाळी दीर्घ कालात सरस्वतीच्या नदी-नदीदेवता, वाक्वाणी आणि अखेर मातृदेवता-विद्यादेवता अशा तीन प्रमुख भूमिका आढळतात. पुराणांनी तिला पूर्ण मानवी रूप दिले आणि तिची प्रतिमा बहुविध विषयांची देवता म्हणून स्थिरावली व तिचे मूर्तिविधान निश्चित झाले.

सरस्वतीच्या उत्पत्तीविषयी पुराणांत अनेक कथा आढळतात. मूळात ही ब्रह्मदेवाची कन्या होय. देवी भागवतामध्ये सरस्वतीची उत्पत्ती राधेच्या जिव्हागापासून झाली, असे म्हटले असून, दुस-या एका कथेत ती श्रीकृष्णाच्या मुखातून बाहेर आली, असे सांगितले आहे. शिवाय ती दुर्गा व शिवदेवता यांपासून झालेली कन्या मानली जाते, सरस्वतीच्या वैवाहिक जीवनाविषयीही अनेक मनोरंजक कथा आढळतात. ती प्रसंगोपात्त अनेकांची पत्नी असल्याचे वाङ्मयीन दाखले मिळतात त्यावरून ती ब्रह्मदेव, विष्णू, शिव यांची पत्नी. एका कथेत विष्णूच्या लक्ष्मी, गंगा या दोन पत्नींबरोबर सरस्वती या तिस-या पत्नीची कथा आढळते. विष्णूने सरस्वती ब्रह्मदेवाला, गंगा शिवाला व लक्ष्मी आपल्या जवळ ठेवली. सरस्वतीला सुद्धा सरस्वतीचा पती मानले आहे. याशिवाय सरस्वती ही अश्विनीकुमारांची सहचारिणी असल्याचे उल्लेख वैदिक साहित्यात येतात. अश्विनीकुमारांकडून तिने आयुर्वेदीय ज्ञान संपादन केले. याव्यतिरिक्त इंद्र, अग्नी, धर्म मनू यांची ती पत्नी असल्याचे तुरळक उल्लेख वाङ्मयातून आढळतात. नंतरच्या साहित्यात ती गणपतीच्या पत्नींपैकी एक असल्याचा उल्लेख आढळतो. मंगलकार्यात शुभारंभापूर्वी गणपती-सरस्वती पूजन रूढ झाले.

वैदिक धर्माप्रमाणे जैन धर्म व बौद्ध धर्मातही सरस्वतीची पूजा प्रचलित असल्याचे लिखित दाखले मिळतात आणि तिचा कलात्मक आविष्कारही मूर्तिशिल्पात आढळतो. जैनदर्शनात ती श्रूतदेवी या नावाने, तर बौद्ध धर्मात प्रज्ञापारमिता या स्वरूपात आढळते. सरस्वती कल्प, शारदास्तवन, पठितसिद्धसारस्वतस्तव, सरस्वती स्तुती वगैरे ग्रंथातून -काव्यातून तिची महती जैनांनी वर्णिली असून बौद्धांच्या साधनमाला या ग्रंथात तिच्या अनेक साधना वर्णिलेल्या आहेत. मंजुश्री या ज्ञानदेवाबरोबर त्याची शक्ती वा सहचारिणी म्हणून ती शिल्पात दर्शवितात. तिचा उल्लेख बौद्ध वाङ्मयात महासरस्वती, आर्यवजा, वजवीणा, वजशारदा अशा भिन्न नावांनी करतात. मंजुश्रीचे साधम्र्य वैदिक धर्मातील बह्मदेवाशी करण्यात येते.

कुलदेवता वा कुलाचार याबाबतीत इतर देवांच्या तुलनेत सरस्वतीला दुय्यम दर्जा आहे. त्यामुळे या देवीचे पूजाविधान वा नित्यनैमित्तिक पूजा फारशी प्रचलित नाही. आश्विनी नवरात्रातील अखेरचे तीन दिवस (सप्तमी, अष्टमी व नवमी) सरस्वती पूजनाचे दिवस मानतात. तसेच या काळात ‘सरस्वती शयनसप्तमी’ नावाचे एक व्रत करण्याची प्रथा आहे. दस-याला श्रवण नक्षत्रावर तिचे विसर्जन करावे, असे धर्मशास्त्र सांगते. नवरात्राव्यतिरिक्त कार्तिक शुक्ल पंचमी आणि माघ शुक्ल पंचमी या दोन तिथींनाही सरस्वती-शारदेची पूजा करण्याची प्रथा बंगाल, बिहार, गुजरात, राजस्थान आदी राज्यांतून विशेषत:, जैन ज्ञातीतून आढळते. या तिथींना पाटीपूजन, पुस्तकांची पूजा, तसेच अध्ययनाच्या साहित्याची पूजा करण्याची रूढी आहेत. मुलांना मुळाक्षरांची ओळख व्हावी, म्हणून शाळेत प्रवेश देण्याची प्रक्रियाही या तिथींना करतात. कालीपूजनाबरोबर सरस्वतीच्या मूर्ती बनविण्याची प्रथा काही राज्यांत आढळते.

सरस्वतीची स्वतंत्र अशी थोडी मंदिरे आहेत. त्यांपैकी नवव्या शतकातील शृंगेरीचे शारदाम्बा, अकराव्या शतकातील गदगचे (कर्नाटक) सरस्वती मंदिर आणि बाराव्या शतकातील कुथनूर (तंजावर जिल्हा, तामिळनाडू) येथील सरस्वती मंदिर ही मंदिरे प्रसिद्ध आहेत. सरस्वतीचा आविष्कार मूर्तिशिल्पांतून आढळतो. तत्संबंधी अपराजितपृच्छा, विष्णुधर्मोत्तर, अंशुमद्भेदागम, पूर्णकारणागम, रूपमण्डन, शिल्पत्न आदी ग्रंथातून माहिती मिळते.

देवीच्या मूर्ती द्विभूजेपासून सोळा हातांपर्यंत आढळतात. पाषाण, काष्ठ, धातू, चुनेगच्ची वगैरे माध्यमांतील काही मूर्ती अवशिष्ट असून सर्वात प्राचीन मूर्ती भारत (इ. स. पू. पहिले शतक) व मथुरा (इ. स. दुसरे शतक) येथील उत्खननांत सापडल्या, त्यांपैकी अभिलिखित वीशीर्ष मथुरेची मूर्ती लक्षणीय आहे. याशिवाय राजस्थानातील परमारकालीन काही सुरेख मूर्ती दिल्लीच्या राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयात तसेच ब्रिटिश म्युझियममध्ये (लंडन) आहेत. या मूर्तिशिल्पांतून सरस्वतीच्या मूळ नदीदेवतेपासून उत्कांत झालेले विकसित शारदादेवीचे रूप दृग्गोचर होते. सरस्वती शुभ्रवर्ण, शुभ्रवस्त्रधारिणी, अलंकार-विभूषित, चुतुर्भुज, पुंडरिक, माला, वीणा व कमंडलू धारण करणारी असावी. पुस्तक व वीणा ही तिची प्रमुख आयुधे सर्वत्र दिसतात. तिचे मूर्तिशिल्पांतून कमळ, हंस, मोर, सिंह, मेंढा हे वाहन/आसन खोदलेले आढळते. क्वचित तिचे वाहन नंदीही दर्शवितात, मात्र हंस आणि मोर ही वाहने तिची पसंतीची असून, त्याचे शिल्पांकन अधिकतर आहे. शिल्पशास्त्रीय ग्रंथात ती कमलासनस्थ दाखवावी, असेही म्हटले आहे.


बसवेश्वर (११३१-६७)

$
0
0

वीरशैव धर्माचे पुनरुज्जीवन करणारी एक महान विभूती. कर्नाटक ही त्याची कर्मभूमी. धर्म, समाज, तत्त्वज्ञान, वाङ्मय, राजकारण आदी क्षेत्रांत त्यांनी केलेले कार्य क्रांतिकारक स्वरूपाचे आहे. त्यांचा जन्म बागेवाडी (जि. विजापूर) येथे एका शैव ब्राह्मण कुळात झाला. काहींच्या मते तो इंगळेश्र्वर (जि. विजापूर) या गावी झाला असावा. त्यांच्या जन्मकाळाविषयी मतभेद असले, तरी सामान्यत: त्यांचा जन्म वैशाखातील अक्षय्य तृतीयेला झाल्याचे मानले जाते. दरसाल त्याच दिवशी बसवजयंती साजरी केली जाते. त्यांच्या आईचे नाव मादलांबिके व वडिलांचे मादिराज.

लिंगायत लोक बसवेश्वरांना शिववाहन नंदीचा (काही वेळा स्वत: शिवाचाही) अवतार मानतात. वयाच्या आठव्या वर्षी मुंजीची तयारी झाल्यावर ‘मला आधीच लिंगदीक्षा मिळाली आहे,’ असे म्हणून त्यांनी मुंज करून घ्यावयाचे नाकारले आणि घर सोडून ते कुडलसंगम (जि. विजापूर) येथे निघून गेले. कुडलसंगम (कन्नड – कुडल = संगम) हे स्थान कृष्णा व मलप्रभा यांच्या संगमावर आहे. त्यांना लिंगदीक्षा कोणी दिली, याविषयी विद्वानांत मतभेद असून संगमेश्वर, जातवेदीमुनी इत्यादींची नावे या संदर्भात सांगितली जातात. जातवेदीमुनींनाच ईशान्य गुरू असेही म्हटलेले असून तेच कुडलसंगम या विद्याक्षेत्राचे स्थानपती होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बसवेश्वरांचे अध्ययन झाले, असे दिसते.

अक्कनागम्मा ही त्यांची वडील बहीण. त्यांना देवराज मुनिप नावाचा थोरला भाऊ असल्याचाही उल्लेख आढळतो. कुडलसंगम येथे त्यांनी वेगवेगळ्या भाषा, धर्म, तत्त्वज्ञाने इत्यादींचा अभ्यास केला. तसेच येथे त्यांना संतसहवास मिळाल्यामुळे व त्यांनी कुडलसंगमेश्वराची उत्कट भक्ती केल्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रगल्भ झाले. कुडलसंगम येथून ते मंगळवाड (सध्याचे मंगळवेढे, जि. सोलापूर) येथे बिज्जल नावाच्या महामंडलेश्वराकडे गेले, असे काही अभ्यासक मानतात. सांप्रदायिक पुराणांतून मात्र मंगळवाड या गावाचा निर्देश वगळलेला असून ते कल्याणसा (सध्या बसवकल्याण, जि. बीदर) गेल्याचे म्हटले आहे.

बिज्जल हा पुढे राजा बनला. बसवेश्वरांनी त्याच्याकडे कर्णिकाच्या (कारकुनाच्या) नोकरीपासून प्रारंभ केला व पुढे ते कोषागार-मंत्री बनले. ते बिज्जलाचे प्रधान मंत्री होते की नाही, याविषयी मतभेद आढळतात. त्यांचा मामा बलदेव हा बिज्जलाचा मंत्री होता. गंगांबिके ही बलदेवाची मुलगी व बसवेश्वरांची पत्नी होती. त्यांच्या दुस-या पत्नीच्या नीलांबिका नावाविषयी मतभेद आढळतात. बालसंगय्य हे त्यांच्या मुलाचे नाव होते, असाही उल्लेख आढळतो.

कल्याण येथे त्यांनी धर्मसुधारणेचे कार्य केले त्यांना यज्ञयागांतील पशुहत्या, वर्णभेद, वर्गभेद व जातीभेद मान्य नव्हते, त्यामुळे सनातनी लोकांनी त्यांच्याविषयी बिज्जलाचे मन कलुषित केले. शेवटी बिज्जलाचे सैन्य वबसवेश्वरांचे अनुयायी यांच्यात वादंग सुरू झाला. तेव्हा या हिंसाचाराला कंटाळून ते कुडलसंगम येथे गेले व त्यांनी तेथे समाधी घेतली. कुडलसंगम येथे त्यांची समाधी आहे. दरवर्षी श्रावण शु. प्रतिपदेला त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते.

बसवश्वरांचा उदय होण्यापूर्वी कर्नाटकात हिंदू, जैन, बैद्ध आदी धर्म व कापालिक, कालामुख, शाक्त आदी पंथ प्रचलित होते. या पार्श्वभूमीवर बसवेश्वरांनी ‘शिव’ हा एकमेव ईश्वर असल्याची घोषणा करून शिवोपासनेचा पुरस्कार केला. त्यांच्या उत्कट शिवभक्तीमुळे त्यांना ‘भक्तिभांडारी’ असे नाव प्राप्त झाले. ते कुडलसंगम येथील संगमेश्वराचे निष्ठावंत भक्त होते. त्यांनी ज्ञान, भक्ती व कर्म यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. ‘ओम नम: शिवाय’ हा षडाक्षरी मंत्र त्यांना अत्यंत प्रिय होता. त्यांनी दया, अहिंसा, सत्य, सदाचार, नीती, शील इत्यादींचा प्रचार केला. एकाच देवाची भक्ती करा, भूतदया बाळगा, प्रेमाने वागा, परोपकार करा अशी त्यांची शिकवण होती.

बसवेश्वर हे एक समर्थ योगी असल्यामुळे त्यांना ईश्वरी साक्षात्कार झाल्याचे व त्यांनी काही चमत्कार केल्याचेही उल्लेख आढळतात. उदा., पूर आलेला असताना त्यांना कृष्णेने वाट करून दिली, त्यांनी बिज्जलाला गुप्त खजिना दाखविला, धान्यकणांचे रत्नांमध्ये रूपांतर केले, आदी कथा सांगितल्या जातात. त्यांच्याकडे चोरी करण्यासाठी व दरोडे घालण्यासाठी आलेले लोकही त्यांचे शिष्य बनले, यावरून त्यांचा प्रभाव ध्यानात येतो.

बसवेश्वरांनी कल्याण येथे निर्माण केलेली शिवानुभवमंटप म्हणजेच अनुभवमंटप ही संस्था जागतिक धर्मेतिहासातील अनन्यसाधारण संस्था होय. वेगवेगळ्या जातींतील व व्यवसायातील भक्त म्हणजेच शिवशरण येथे एकत्र जमत आणि विविध विषयांवर चर्चा करीत असत. बसवेश्वरांनी धर्मप्रसारासाठी संन्यास घेतला नाही, भाष्ये लिहिली नाहीत वा प्रवासही केला नाही; परंतु मंटपातील चर्चेच्या माध्यमातून त्यांनी लोकांमध्ये जागृती केली. येथे परिसंवादाच्या स्वरूपाची जी चर्चा होत असे, तीच कन्नड साहित्यामध्ये वचनसाहित्याच्या रूपाने प्रसिद्ध झाली. या मंटपातील शून्यपीठाचे अध्यक्षपद अल्लमप्रभू (बारावे शतक) यांना देण्यात आले होते. येथे होणा-या चर्चेच्या माध्यमातून बसवेश्वरांनी वेगवेगळ्या जाती-जमातींच्या लोकांमध्ये बंधुभाव आणि विचार-स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण केली.

पारंपरिक भारतीय समाजातील वर्णजातिमूलक उच्चनीचता व विषमता यांची प्रखर जाणीव बसवेश्वरांना झाली होती. म्हणूनच त्यांनी चातुर्वण्र्याला आव्हान देऊन सर्व मानवांना समान मानले. परिणामत:, त्यांच्याभोवती सर्व वर्णातील व जातींतील अनुयायी जमा झाले. आंतरजातीय रोटीव्यवहार व बोटीव्यवहार करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. उदा. त्यांच्या अनुयायांमध्ये मधुवय्या नावाचा ब्राह्मण व हरळय्या नावाचा चांभार यांचा अंतर्भाव होता. त्यांनी मधुवय्याच्या मुलीचे हरळय्याच्या मुलाशी लग्न लावून दिले. त्यांनी शिवनागमय्या व ढोर कक्कय्य या अस्पृश्यांच्या घरी जाऊन भोजन केले होते. बाराव्या शतकात बसवेश्वरांनी सुरू केलेले हे कार्य निश्चित क्रांतिकारक होते.

त्यांनी बालविवाहाला विरोध केला तसेच विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता दिली. सर्व मानव समान आहेत, याचा अर्थ स्त्री व पुरुष हेही समान आहेत, असे त्यांचे मत होते. त्यांच्या अनुभवमंटपातील चर्चेत पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियाही भाग घेत. अक्कमहादेवी (बारावे शतक), सत्यक्का, नागम्मा यांच्या उदाहरणांवरून हे स्पष्ट होते. वीरशैव धर्मात स्त्री व पुरुष या दोघांनाही लिंगदीक्षा दिली जात होती. पुरुषभक्तांप्रमाणेच स्त्रीभक्तांनीही वचनसाहित्य निर्माण केले असून, त्यात तीस-चाळीस कवयित्रींची वचने आढळतात.

बसवेश्वरांनी स्वत:चा उपनयन-संस्कार करून घ्यावयाचे नाकारले, यावरून बालपणापासूनच त्यांचा भावहीन कर्मकांडाला विरोध असल्याचे दिसून येते. भव्य मंदिरे बांधण्यावर खर्च करू नये, तीर्थयात्रेला जाण्याची आवश्यकता नाही, यांसारख्या मतांवरूनही त्यांनी कृत्रिम कर्मकांडाला विरोध केल्याचे स्पष्ट होते.

आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी मठ स्थापन केले आणि तेथे योग्य व्यक्तींची नियुक्ती केली. काश्मीरपासून केरळपर्यंतच्या, राजापासून रंकापर्यंतच्या आणि ब्राह्मणापासून अस्पृश्यापर्यंतच्या अनुयायांचे एक मोहोळच त्यांच्याभोवती जमले होते, यावरून त्यांच्या समर्थ संघटनशक्तीची कल्पना येऊ शकते.

शारीरिक श्रम वा व्यवसाय हाच स्वर्ग (कैलास) आहे, अशी घोषणा करणारा ‘कायकवे कैलास’ हा बसवेश्वरांनी मांडलेला एक महान सिद्धांत आहे. कोणत्याही प्रकारचे शारीरिक श्रम हे हीन दर्जाचे नाहीत, असे सांगून त्यांनी श्रमप्रतिष्ठा वाढविली. प्रत्येक व्यक्तीने आपल्या श्रमावरच आपली उपजीविका चालवावी, या बाबतीत जंगमांचाही अपवाद करू नये, असे त्यांनी आग्रहपूर्वक सांगितल्यामुळे त्यांच्या तत्त्वज्ञानात भिक्षावृत्तीला वाव राहिला नाही; परंतु त्यांनी कायक हे केवळ पैशासाठी सांगितलेले नाही. तसेच ते कर्मसिद्धांतावर आधारलेले नसून त्यात व्यक्तीला व्यवसायस्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. मोक्षासाठी अरण्यात पलायन करण्याची गरज नाही, असे हा सिद्धांत मानतो.

श्रमप्रतिष्ठेबरोबरच गरजेनुसार संपत्तीची विभागणी करावी, ही विचारसरणी मांडल्यामुळे बसवेश्वरांची वृत्ती समाजवादी होती, असे काही अभ्यासक मानतात. बसवेश्वरांच्या उपदेशामुळे वेगवेगळ्या व्यवसायांना, विशेषत: ग्रामोद्योगांना, प्रोत्साहन मिळाले आणि सर्व व्यावसायिकांमध्ये समभाव निर्माण झाला. उदा. त्यांच्या अनुभवमंटपात वेगवेगळ्या जातींचे संत जमत असत. ब्राह्मण मधुवय्या, चांभार हरवळ्या, ढोर कक्कय्य, नावाडी चौंडय़ा, सुतार बसप्पा, मांग चन्नया, न्हावी आप्पाण्णा, रणशिंगधारी ढक्कद वोमण्णा, सोनार किन्नरी ब्रह्मय्या, गुराखी रामण्णा, दोरखंड करणारा चंद्या, पारधी संगय्या इत्यादींचा त्या संतांमध्ये अंतर्भाव होतो.

भगीरथ

$
0
0

हिंदू पुराणातील एक धर्मनिष्ठ व दानशूर राजा, सूर्यवंशातील म्हणजेच इक्ष्वाकुवंशातील या राजाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी कठोर तप करून गंगेला स्वर्गातून पृथ्वीवर आणले. सगर – असमंजस् – अंशूमत् (अंशुमान्)- दिलीप-भगीरथ असा त्याचा वंशक्रम आहे. काही पुराणांच्या मते तो अंशुमताचाच मुलगा होता, भगीरथ या शब्दाचा अर्थ ‘वैभवशाली रथ असलेला’, असा आहे. भग-वैभव भगी-वैभवशाली. वेदातील ‘भगीरथ ऐक्ष्वाक’ आणि हा भगीरथ हे दोघे एकच असण्याची तसेच भगीरथ हा ऐतिहासिक पुरुष असण्याचीही शक्यता आहे.

एकदा अयोध्येचा सगर राजा अश्वमेध करीत होता. त्यावेळी इंद्राने त्याच्या अश्वमेधाचा अश्व पळवून नेऊन कपिल ऋषींच्या मागे लपविला. या सगराला केशिनी व सुमती अशा दोन बायका होत्या. असमंजस् हा केशिनीचा मुलगा होता. सुमतीला ६० हजार पुत्र होते. या साठ हजार पुत्रांनी कपिल ऋषींच्या मागे घोडा पाहून त्यांचा अपमान केला, म्हणून त्या ऋषींनी त्या सर्वाना शापदग्ध केले, त्यांच्या रक्षेला गंगेच्या पाण्याचा स्पर्श झाला, तरच त्यांचा उद्धार होणे शक्य होते. अंशुमत् व दिलीप यांनी गंगेला पृथ्वीवर आणण्याचे केलेले प्रयत्न असफल झाल्यावर भगीरथाने तिला प्रसन्न करून घेतले. ती खाली उतरताना तिच्या प्रवाहाने पृथ्वीवर पृथ्वी खचू नये म्हणून तिला मस्तकावर धारण करण्यासाठी त्याने शंकरालाही प्रसन्न केले; परंतु ती शंकराच्या जटेत अडकल्यामुळे भगीरथाने पुन्हा तप केले व मग शंकराने जटेचे केस तोडून वाट करून दिली. म्हणून ती ‘अलकनंदा’ होय. नंतर तिने भगीरथामागोमाग जाऊन सगरपुत्रांचा उद्धार केला.

भगीरथाने तिला पृथ्वीवर आणले, म्हणून ती भगीरथाची कन्या म्हणजेच भागीरथी बनली (महाभारत – वनपर्व; वाल्मीकी रामायण – वालकांड पद्मपुराण – ४.२१, वायुपुराण ४७.३७ भागवतपुराण – नवमस्कंध ब्रह्मांड पुराण – ९७). भगीरथाच्या कठोर तपश्चर्येवरूनच ‘भगीरथ-प्रयत्न’ असा वाक्प्रयोग रूढ झाला आणि भगीरथ हा कठोर प्रयत्नवादाचे प्रतीक बनला.

भगीरथाने गंगेवर घाट बांधले, तो यमसभेचा सदस्य होता, त्याला शिवाकडून वर मिळाले, त्रितुल या गुरूच्या उपदेशावरून त्याने राज्यत्याग केला व दीर्घकालानंतर पुन्हा राज्यग्रहण केले, त्याच्या नभ (किंवा नाभाग) व श्रुत या दोन पुत्रांपैकी श्रुत हा त्याच्यानंतर गादीवर बसला इत्यादी प्रकारची माहिती पुराणांत मिळते. भगीरथाने उत्तरवाहिनी गंगेला दक्षिणवाहिनी बनवून उत्तर भारतावरचे दुष्काळाचे संकट दूर केले, असे काही अभ्यासक मानतात.

गाडगे महाराज (२३ फेब्रुवारी १८७६ –२० डिसेंबर १९५६)

$
0
0

एक थोर आधुनिक मराठी संत व समाजसुधारक. त्यांचा जन्म शेणगाव (जि. अमरावती) येथे परिट जातीत झाला. वडिलांचे नाव झिंगराजी व आईचे सखुबाई. आडनाव जाणोरकार. त्यांचे मूळ नाव डेबूजी असे होते. तथापि त्यांचा वेश म्हणजे अंगावर फाटकी गोधडी आणि हातात गाडगे असा असल्यामुळे लोक त्यांना ‘गोधडे महाराज’ किंवा ‘गाडगे महाराज’ म्हणूनच ओळखत. १९१२मध्ये त्यांचा कुंताबाईशी विवाह झाला; परंतु संसारात त्यांचे मन रमले नाही. पुढे काही वर्षानी घर सोडून तीर्थयात्रा करीत ते फिरू लागले. समाजातील कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष लोकसेवेचे व लोकशिक्षणाचे व्रत स्वीकारले.

लहानपणापासूनच त्यांना भजन-कीर्तनांची आवड होती आणि त्यांची वृत्तीही धार्मिक व परोपकारी होती. समाजसुधारणेसाठी व लोकशिक्षणासाठी त्यांनी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले. ते निरक्षर असले, तरी त्यांची भाषा सुबोध व सर्वसामान्यांच्या एकदम हृदयाला जाऊन भिडणारी होती. महाराष्ट्रात सर्वत्र तसेच गुजरात, कर्नाटक व आंध्र प्रदेशाच्या काही भागांत त्यांनी गावोगाव कीर्तने करून लोकजागृती केली. त्यांचा नैतिक उपदेश साधा व सर्वसामान्यांना उपयुक्त ठरावा असाच होता. ‘चोरी करू नये, कर्ज काढून चैन करू नये, दारू पिऊ नये, देवापुढे पशूंचा बळी देऊ नये’, अशा प्रकारचा उपदेश ते आपल्या कीर्तनांतून मार्मिक उदाहरणे देऊन करीत. पारंपरिक, पारमार्थिक विषयांसोबतच व्यावहारिक व नैतिक विषयांचाही त्यांनी आपल्या कीर्तनांतून लोकजागृतीसाठी चांगला उपयोग करून घेतला.

स्वच्छता, प्रमाणिकपणा व भूतदया यांवर त्यांचा विशेष भर असे. तीर्थयात्रेच्या ठिकाणी ते जात, परंतु देवदर्शन न घेता मंदिराच्या बाहेर थांबून यात्रेकरूंची सेवा करीत व तेथील परिसर स्वत:च्या हातांनी स्वच्छ करी. खाण्यापिण्याच्या बाबतीतही त्यांचा कमालीचा साधेपणा होता. श्रीमंत भक्तांनी दिलेले चांगले अन्न ते भिकाऱ्यांना वाटून टाकीत आणि स्वत: गरिबाच्या घरची चटणी-भाकरी मागून आणून खात.

लहानपणापासूनच ते जातिपंथभेदातीत होते. जातिभेद नष्ट करून एकजिनसी समाज निर्माण व्हावा, असे त्यांना मनापासून वाटे व त्या दृष्टीने यांचे आचरण आणि प्रयत्नही असत. पंढरपूर, नाशिक, त्र्यंबकेश्वर, आळंदी इत्यादी ठिकाणी यात्रेकरूंचे अत्यंत हाल होत, म्हणून त्यांनी त्यांच्या सोयीसाठी प्रशस्त धर्मशाळा बांधल्या. विदर्भातील ऋणमोचन येथे त्यांनी लक्ष्मीनारायणाचे मंदिर उभारले व नदीवर घाटही बांधला. अनेक ठिकाणी त्यांनी गोरक्षण संस्थाही उभारल्या तसेच अनाथांसाठी व अपंगांसाठी अनेक प्रकारे कार्य केले. समाजसेवा करणा-या अनेक संस्थांनाही त्यांनी उदारहस्ते देणग्या दिल्या. अनेक ठिकाणी देवाधर्माच्या नावावर चालणारी पशुहत्या त्यांनी बंद केली. अध्यात्माच्या जंजाळात न शिरताही, संसारातच राहून ईश्वरभक्ती करता येते, अशी साधी व सरळ शिकवण त्यांनी समाजास दिली.

‘संत तुकाराम महाराज आमचे गुरू आहेत व माझा कोणीही शिष्य नाही’, असे ते म्हणत. त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांची गादी अथवा मठ कोठेही निर्माण झाला नाही. समाजात शिक्षणप्रसार करून अनेक शिक्षण संस्थांना त्यांनी मदत केली. लोकांची त्यांच्यावर नितांत श्रद्धा होती, त्यामुळे लोकांनी त्यांना विपुल पैसा दिला. तो सर्व त्यांनी लोकोपयोगी कार्यात वेचला. त्यांनी उभारलेल्या सर्वच संस्थांचा कारभार विश्वस्त मंडळेच पाहतात. गाडगे महाराजांविषयी बहुजन समाजात कमालीचा आदरभाव आहे. त्यांनी महाराष्ट्रात केलेले लोकजागृतीचे व लोकसेवेचे कार्य अत्यंत मोलाचे आहे. प्रवास करीत असता अमरावतीजवळ त्यांचे अचानक निधन झाले. त्यांची समाधी अमरावती येथे आहे.

पाशुपत पंथ

$
0
0

अनेक माहेश्वर शैव पंथांपैकी एक पंथ. रुद्रशिव वा पशुपतीस आपले उपास्य दैवत मानणारा हा पंथ आहे. यजुर्वेदात स्वतंत्र ‘रुद्राध्याय’च आहे. त्यात पशुपती म्हणून रुद्र-शिवाचा उल्लेख आहे. यजुर्वेदकालापासून शिवाची परमेश्वर म्हणून उपासना सुरू झाली असावी, असे त्यातील शिवाच्या माहात्म्यावरून दिसते. यावरून शिवोपासक पंथाचे प्राचीनत्व लक्षात येते. श्वेताश्वतरोपनिषदात (३.४) रुद्रास विश्वाचा एकमेव शास्ता म्हटले आहे. महाभारतातही पशुपतीस उपास्य दैवत मानणा-या पाशुपत पंथाचा उल्लेख आढळतो. पौराणिक कालात ईश्वर म्हणजे पती, हा त्याने निर्माण केलेल्या जीवांना म्हणजे ‘पशूं’ना या ‘संसार पाशा’तून मुक्त करतो, असा विचार निर्माण झाला.

प्रत्यक्ष भगवान शिवाने पाशुपत पंथ स्थापन केला आणि पंथाची तत्त्वे विशिष्ट ऋषींना शिवाने गुप्तपणे उपदेशिली, असे या संप्रदायाच्या आगम ग्रंथात म्हटले आहे. दुस-या एका कथेनुसार ब्रह्मचारी शिवाने स्मशानात जाऊन एका अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहात प्रवेश करून नवा अवतार धारण केला (लिंगपुराण २४ वायूपुराण २३). या मृतदेहाशेजारी त्याचे लकुल (लाकुड) पडले होते. शिवाने मृतदेहात प्रवेश करताच, तो मृतदेह जिवंत झाला. हाच शिवाच्या अठरा अवतारांपैकी आद्य असा ‘लकुलीश’ वा ‘नकुलीश’ अवतार होय. लकुलीश वा नकुलीश (इ.स. सुमारे २००) हा गुजरातमध्ये कायारोहण (भडोचजवळील कारवान म्हणून प्रसिद्ध) क्षेत्रांत होऊन गेलेला पाशुपत मताचा अध्वर्यू असून त्यानेच प्रथम या पंथाचे तत्त्वज्ञान सुसूत्रपणे मांडले व त्याला दार्शनिक रूप दिले. लकुलीश वा नकुलीश हा या पंथाचा आद्य प्रवर्तक मानला जातो. पाशुपत पंथ गुजरात व राजस्थानमध्ये मुख्यत: पसरला. पाशुपत सूत्राच्या संपादकांनी नकुलीशाची शिष्यपरंपरा नकुलीश, कौशिक, गाग्र्य, मैत्रेय, कौरुष, ईशान, परगाग्र्य, कपिलांड, मनुष्यक, कुशिक, अत्री, पिंगल, पुष्पक, बृहदार्य, अगस्ती, संतान, राशीकर वा कौंडिण्य विद्यागुरू अशी दिली आहे.

परंपरेतील सतरावे शिष्य राशीकर म्हणजेच कौंडिण्य असल्याचे संपादकांनी निश्चित केले. त्यांनी पाशुपतातील उपपंथ स्थापिले. माधवाचार्य (सुमारे चौदावे शतक) यांनी आपल्या सर्वदर्शनसंग्रहात पाशुपत पंथाचे तत्त्वज्ञान ‘नकुलीश दर्शन’ नावाने विस्ताराने मांडले आहे. गुणरत्न (सुमारे चौदावे शतक) याने तर वैशेषिकांना ‘पाशुपत’ म्हटले आहे. न्यायवार्तिककार उद्योतकराने स्वत:स ‘पाशुपताचार्य’ म्हटले आहे. पाशुपतांचा मूळ सूत्रग्रंथ माहेश्वररचित म्हणजेच आद्य शिवावतार नकुलीशरचित पाशुपत सूत्र हा असून, त्यावर कौंडिण्य (सुमारे चौथे ते सहावे शतक या दरम्यान) याने रचलेले पंचार्थीभाष्य आहे. ते राशीकरभाष्य वा कौंडिण्यमाष्य म्हणूनही ओळखले जाते. पाशुपत सूत्र हा ग्रंथ त्यावरील कौंडिण्यभाष्यासह संपादून १९४०मध्ये त्रिवेंद्रम विद्यापीठाने ‘ओरिएंटल मॅन्युस्क्रिप्ट लायब्ररी’च्या वतीने प्रकाशित केला आहे. उत्तर भारतात प्रचलित असणा-या शैव पंथांत पाशुपत पंथ सर्वात प्राचीन आहे. यालाच ‘आगमान्त संप्रदाय’ असेही म्हणतात.

मूळ पाशुपत सूत्रे व त्यावरील कौंडिण्यभाष्य यांत शैव पंथाच्या तत्त्वज्ञानापेक्षा विधीसंबंधीचाच अधिक ऊहापोह आहे. कदाचित शैव म्हणून समजल्या जाणा-या नैयायिकांनी शैव पंथाला तात्त्विक अधिष्ठान दिले व पाशुपतांनी पंथाच्या विधियुक्त बाजूकडे विशेष लक्ष दिले असणे संभवते.

पाशुपतांचे तत्त्वज्ञान भेदाभेदवाद म्हणून ओळखले जाते. त्यात कार्य, कारण, भोग, विधी व दु:खान्त असे पाच पदार्थप्रकार मानले आहेत. कार्य म्हणजे सुख-दु:खयुक्त संसार, कारण म्हणजे ईश्वर. पाशुपतांच्या मते योग म्हणजे पातंजल योगाप्रमाणे चित्तवृत्तिनिरोध नसून, जीव व ईश्वर यांचे ऐक्य (आत्मेश्वर-संयोगो योग:) होय. चित्तशुद्धी घडवून आणणारा विधी म्हणून त्यांनी योग मानला आहे. योगाने घडवून आणलेले म्हणजे जीवाने आपले कार्य सोडून ईश्वरभिमुख होणे किंवा ईश्वर व जीव यांनी एकमेकांकडे येणे. ज्ञान, वैराग्यादींमुळे दु:खान्त होत नसून तो फक्त शिवाच्या प्रसादामुळेच होतो, असे कौंडिण्याने म्हटले आहे. ईश्वर सर्वतंत्र स्वतंत्र आहे. त्याची संकल्पशक्ती सर्वश्रेष्ठ असून तीमुळे तो कोणताही बदल घडवून आणू शकतो; तथापि त्याच्या या क्रियेला एक मर्यादाही आहे. ती म्हणजे, दु:खापासून कायम मुक्त झालेले मुक्तात्मे. शिव हाच जगाची उत्पत्ती, स्थिती व लय घडवून आणतो. म्हणूनच ज्वाला दु:खान्त हवा, त्याने शिवाची उपासना करावी. शिव हा फक्त निमित्त कारण आहे. आद्य शंकराचार्यानी जो ईश्वरकारणवाद्यांचा निर्देश केला आहे, त्यात पाशुपतही त्यांना अभिप्रेत आहेत. मुक्तीच्या अवस्थेत जीव हा शिवात विलीन होत नसून, त्याच्या सतत संयोगात राहतो, हेच ‘शिव सायुज्य’ होय.

पाशुपतांच्या धार्मिक आचारात भस्माला विशेष महत्त्व आहे. त्यांच्या मते भस्मस्नान म्हणजे खरा यज्ञ. पाशुपत साधूंना सिद्धी प्राप्त झाल्या तरी त्यांचा उपयोग करण्याने समाधीस व्यत्यय येतो. म्हणून सिद्धींच्या मागे लागणे, अयोग्य मानले आहे. साधे संन्यस्त जीवन जगणे, लोभ व क्रोधत्याग करणे, क्षमाशील असणे, ओंकाराचा उच्चार करून व योग आचरून शिवाशी एकरूप होणे, अशी या पंथाची सुरुवातीची शिकवण होती. मोहें-जो-दडो येथेही पशुपतीच्या मूर्ती सापडल्या आहेत.

पंथाची ही मूळ शिकवण व आचार पुढे अधोगतीस जाऊन अघोरी पंथ व कापालिक पंथ उत्पन्न झाले. पंथात अधिकाधिक बीभत्सपणा आणि अश्लीलता प्रविष्ट झाली. त्यामुळेच पुढे तो हेटाळणीस पात्र ठरला.

आर्यसमाज

$
0
0

हा एक अर्वाचीन धर्मपंथ असून, या पंथाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी चैत्र शु. प्रतिपदा, संवत १९३२ म्हणजे १० एप्रिल १८७५ रोजी मुंबईस केली. हाच दिवस स्थापना दिन म्हणून आर्यसमाजी लोक प्रतिवर्षी साजरा करतात. स्वामी दयानंद हे काठेवाडातील टंकारा नामक खेडेगावी १८२४ साली जन्मले. त्यांचे नाव मूलशंकर अंबाशंकर.

या पंथाची मुख्य दहा तत्त्वे असून, त्यांतील पहिली तीन तत्त्वे धार्मिक दृष्टय़ा अत्यंत महत्त्वाची आहेत. ती अशी : (१) सर्व यथार्थ ज्ञानाचा उगम व सर्व वस्तूंचे आदिकारण परमेश्वर आहे. (२) ईश्वर हा सच्चिदानंदस्वरूप असून तो अनादी, अनंत, निराकार, निष्कलंक, सर्वशक्तिमान, सर्वसाक्षी, परमन्यायी, कनवाळू सर्व जगाचा निर्माता, शास्ता व पालक आहे. त्याचे भजन-पूजन करावे. (३) वेद हे त्या ईश्वराचीच नि:श्वसिते होत. सर्व यथार्थ ज्ञानांचा उगम वेदांतच असल्यामुळे वेदांचे अध्ययन करणे व करविणे, हे प्रत्येक आर्याचे पवित्र कर्तव्य आहे. वेद प्रमाण मानतो तो आर्य.

बाकीच्या सात तत्त्वाचा सारांश असा : प्रत्येकाने सत्याचा स्वीकार करून धर्मानुसार वागावे. मानवाची आधिभौतिक, सामाजिक, आध्यात्मिक इत्यादी प्रत्येक बाबतीत उन्नती करून मनुष्यजातीचे सर्वागिण कल्याण साधावे, प्रेमाने व न्यायाने वागावे, ज्ञानाचा प्रसार करावा, दुस-यांच्या उत्कर्षातच आपला उत्कर्ष आहे, असे मानावे. प्रत्येकाला स्वत:च्या मताप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य असले, तरी सामाजिक कल्याणासाठी प्रत्येकाने आपसातील मतभेद व हेवेदावे विसरून वागावे.

स्वामी दयानंदांनी वेद शब्दाचा अर्थ ज्ञान असा केला. ईश्वरप्रणीत अशा या ग्रंथात सर्व शास्त्रांची मूलतत्त्वे ग्रंथिक आहेत. ते स्वयंसिद्ध सत्यस्वरूप आहेत. मानवजातीच्या वैज्ञानिक व पारमार्थिक विचारांचा उगम वेदांत आहे. म्हणून त्यांनी चार वेदांच्या मंत्रसंहिताच प्रमाण मानल्या, ब्राह्मणग्रंथ नव्हे. सहा शास्त्रे, स्मृती वा अठरा पुराणे त्यांनी प्रमाण म्हणून मान्य केली नाहीत.

भारताला पुन्हा वैदिक मार्गावर नेणे व सर्व जगाला वैदिक धर्म शिकविणे ही आर्यसमाजाने आपली परमश्रेष्ठ कर्तव्ये ठरविली व वेदांच्या उद्धाराचे व प्रचाराचे कार्य हिरिरीने चालू केले. समाजाच्या आज्ञेप्रमाणे प्रत्येकाने पंचमहायज्ञ रोज केले पाहिजेत. ब्रह्मयज्ञ, देवयज्ञ, पितृयज्ञ, अतिथियज्ञ व बलियज्ञ हे पंचमहायज्ञ होत.

स्वामी दयानंदांनी ‘सत्यार्थप्रकाश’ ग्रंथ लिहिला. आर्यसमाजात हा ग्रंथ प्रमाण मानला जातो. आर्यसमाज जन्मसिद्ध जातिभेद मानीत नाही; परंतु गुणकर्मानी बनलेले चातुर्वण्र्य मानतो. उदा., तप, विद्या, शांती हे गुण असलेला ब्राह्मण, वीरवृत्ती व नेतृत्व असलेला क्षत्रिय धनसंग्रहचतुर वैश्य व शरीरश्रमावर भर देणारा शूद्र.

मूळ वेदांत मूर्तिपूजा, अवतारवाद, तीर्थे, व्रते, पौराणिक अनुष्ठाने इत्यादींचा पुरस्कार नाही. त्यामुळे आर्यसमाजी प्रवर्तकांनी या सर्व गोष्टी त्याज्य ठरविल्या, श्राद्धे बंद केली व पुरोहितांनाही रजा दिली राम-कृष्ण हे ईश्वरी अवतार नसून श्रेष्ठ मानव होते, असे ते लोकांना समजावून सांगू लागले.

जातिभेद वा अस्पृश्यता आर्यसमाज मानीत नाही. वेदाध्ययनाचा अधिकार तो सर्वाना मानतो. सुरुवातीस समाजाच्या प्रवर्तकांनी आपली ही तत्त्वे लोकांच्या गळी उतरवण्याचा अटोकाट प्रयत्न केला. विरोधी मतांचे खंडन केले. त्यांनी विधायक कार्ये हाती घेतली. उत्तर भारतात प्रमुख ठिकाणी त्यांनी गुरुकुले, महाविद्यालये, हरद्वारजवळील कांगडी येथील गुरुकुल विश्वविद्यालय, माध्यमिक शाळा, अनाथालये, विधवाश्रम वगैरे संस्था स्थापन केल्या आणि सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांतही परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला.

त्यांच्या मतानुसार मोक्ष मिळविणे, हे प्रत्येक व्यक्तीचे ध्येय असले पाहिजे व ते प्रत्येकाने स्वप्रयत्नाने साध्य केले पाहिजे. त्यांचा पुनर्जन्मावर विश्वास आहे. काही आपत्तींपुरती नियोगपद्धतीही त्यांना मान्य आहे. हिंदूंचे सोळा संस्कार त्यांना मान्य असून, त्यांचे वेदकालीन साधे स्वरूप तेवढेच स्वीकारले आहे. स्वामी दयानंदांच्या निधनानंतर १८८३ मध्ये आर्यसमाजात फूट पडून त्याच्या दोन भिन्न-भिन्न शाखा झाल्या. एका शाखेने मांसाहार व आधुनिक पाश्चात्य उच्च शिक्षणाचा पुरस्कार केला, तर दुस-या शाखेने मांसाहार व पाश्चात्य उच्च शिक्षण निषिद्ध मानले. म्हणून महाविद्यालय पक्ष व पुराणमतवादी पक्ष अशी त्यांना दोन नावे पडली.

आर्यसमाजाच्या स्थानिक, प्रांतीय व अखिल भारतीय स्वरूपाच्या एकूण तीन सभा आहेत. आर्यसमाजी धार्मिक उपासना आठवडय़ातून एकदा दर रविवारी सकाळी करतात. उपासनेच्या प्रारंभी व्यासपीठाजवळील अग्नीत समंत्रक आहुती देऊन मग उपासनेस प्रारंभ होतो. ही उपासना तीन-चार तास चालते. समाजाची दीक्षा व मागासलेल्या जातींना शिक्षण देऊन त्यांचा उद्धार करणे, ही आर्यसमाजाची सर्वात मोठी कार्ये मानली जातात.

मलबारात १९२१मध्ये मोपला मुसलमानांनी मोठे बंड करून असंख्य हिंदूंना जबरदस्तीने बाटवून मुसलमान केले. या संकटकाळी आर्यसमाजी लोक धैर्याने मलबारात गेले व सुमारे अडीच हजार भ्रष्ट हिंदू कुटुंबांना त्यांनी पुन:श्च हिंदू धर्मात आणले. १९३७ साली हैदराबाद संस्थानात आर्यसमाजावर निजाम सरकारने बंदी घातली, त्या बंदीविरुद्ध आर्यसमाजी अनुयायांनी सत्याग्रहाचे शस्त्र उपसले. त्यावेळी बारा हजार आर्यसमाजी लोकांनी बंदिवास पत्करला.

आर्यसमाजाची स्थापना मुंबईस झाली, तरी त्याचा प्रसार महाराष्ट्रात फारसा झाला नाही. समाजाचे कार्यक्षेत्र मुख्यत: उत्तर भारत हेच ठरले. पंजाबात व उत्तर प्रदेशात समाजाच्या तीनशेच्या वर शाखा आहेत.

प्रार्थनासमाज व ब्राह्मोसमाज यांच्यापेक्षा जनमनावर आर्यसमाजाचा पगडा विशेष आहे. आर्यसमाजाला केवळ वेदप्रामाण्यच मान्य असल्याने तसेच त्याच्या सामाजिक व धार्मिक पुरोगामी मतांमुळे सुरुवातीस आर्यसमाजाला सनातन हिंदुधर्मीयांचा कसून विरोध झाला, पण त्या विरोधास न जुमानता समाजाच्या कार्यकर्त्यांनी धडाडीने प्रचार करून वेदप्रणीत धर्माच्या पुनरुत्थानाचे महान कार्य केले. प्रौढविवाह, पुनर्विवाह, जातिनाश, अस्पृश्योद्धार, गुणकर्मविभागश: वर्णरचना इत्यादी आर्यसमाजाची तत्त्वे अखिल हिंदूंना आज अधिकाधिक मान्य होऊ लागली आहेत.

उदयपूरचे महाराज, लाला मूलराज, लाला रामशरणदास रईस, मोहनलालजी विष्णुलालजी, लाला जगन्नाथ, गोपाळ हरी देशमुख (लोकहितवादी), पंडित श्यामजी कृष्णवर्मा इत्यादी आर्यसमाजाचे पदाधिकारी होते. ब्रह्मीभूत स्वामी श्रद्धानंद हे आर्यसमाजाचे थोर मार्गदर्शक झाले. महाराष्ट्रात आर्यसमाजाच्या तत्त्वांचा प्रचार करून त्याची स्थापना करण्याचे कार्य लोकहितवादी व न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी केले.

आजमितीस आर्यसमाज हा स्वतंत्र पंथ म्हणून उत्तर भारतात प्रचलित असला, तरी तो हिंदू धर्माहून वेगळा मानला जात नाही. आर्यसमाजाने एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांत मोठी कामगिरी केली असल्याने, भारताच्या अर्वाचीन पुनरुत्थानाच्या कार्यात आर्यसमाजाचा वाटा फार मोठा आहे.

Viewing all 1081 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>