व्यक्ती ज्या भावनेच्या योगाने ईश्वराला सर्वथा शरण जाते, ती भावना म्हणजे भक्ती होय. ईश्वराविषयीचे आत्यंतिक व अनन्य प्रेम म्हणजे ईश्वराची भक्ती, असेही म्हणता येईल. ईश्वराचा अनुग्रह करून देण्याचे सामर्थ्य असलेली आचारपद्धती म्हणजे ईश्वरप्राप्तीचा मार्ग होय. वेगवेगळ्या तत्त्वचिंतकांनी ईश्वराचा अनुग्रह मिळविण्याचे जे मार्ग सांगितले आहेत, त्यापैकी ईश्वरभक्ती हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. ईश्वराच्या अस्तित्वाविषयीची व्यक्तीच्या मनातील श्रद्धा, सेवाभाव, समर्पणवृत्ती, भीती, ईश्वराचा अनुग्रह वा साक्षात्कार मिळविण्याची उत्कट इच्छा इत्यादींमधून व्यक्तीच्या मनात भक्तीची भावना स्फुरते. ईश्वर हा सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सुर्वगुणसंपन्न, सृष्टीचा निर्माता आणि आपला उद्धारकर्ता आहे, हा विश्वासच या भावनेच्या निर्मितीला कारणीभूत होतो. या व्यापक अर्थाने जगातील सर्व समाजांतून भक्तिभावना आढळते.
भारतात भक्तीचा विशिष्ट संप्रदाय असून त्याची स्वत:ची अशी काही खास वैशिष्टय़े आहेत. या संप्रदायालाच ‘भक्तिमार्ग’ असे म्हणतात. विविध देवता, माता, पिता, गुरू इत्यादी विषयीच्या आदरभावालाही लक्षणेने भक्ती असे म्हटले. जाते. भक्ती हा शब्द ‘भज्’ (सेवा करणे) या संस्कृत धातूपांसून बनला आहे. भक्त, भगवान, भागवत इत्यादी शब्द त्याच धातूपासून बनले असून अर्थदृष्टय़ा ते ‘भक्ती’ या शब्दाशी संबद्ध आहेत.
भक्तीचा उगम :
तसे पाहावयास गेले, तर जगातील सर्व मानवसमूह फार प्राचीन काळापासूनच कोणत्या ना कोणत्या अतिमानवी शक्तीची भक्ती करीत आले आहेत. परंतु अनेक पाश्चात्त्य विद्वान मात्र जगातील भक्तीचा पहिला आविष्कार ख्रिस्ती धर्मातच झाला, असे मानतात. भारतीय लोकांनी भक्तीची संकल्पना ख्रिस्ती धर्मातूनच घेतली, असेही त्याचे मत आहे; परंतु भारतीय विद्वानांनी हे मत नाकारले आहे. काही विद्वानांनी भारतीय भक्तिसंप्रदायावर इस्लामचा प्रभाव असल्याचे मतही व्यक्त केले आहे; परंतु इतर अनेक जणांच्या मते भारतातील भक्तीचा उगम हा स्वतंत्रपणे भारतीय भूमीतच झाला आहे. वेदसंहितांमध्ये भक्तीची संकल्पना होती की नाही, याबाबतीतही विद्वानांत मतभेद आढळतात. वेदसंहिता व ब्राह्मणग्रंथ यांमध्ये ‘भक्ती’ हा शब्द आढळत नाही. हा शब्द पहिल्यांदा श्वेताश्वतर उपनिषदात आढळतो; परंतु आचार्य बलदेव उपाध्यांच्या मते एखाद्या कालखंडात नसला, तरी त्या शब्दातून व्यक्त होणारी संकल्पना मात्र अस्तित्वात असू शकते. काही पाश्चात्त्य पंडितांच्या मते ऋग्वेदातील वरुणसुक्तांतून भक्ती ही भीतीवर आधारलेली आढळते.
भक्ती ही मूळची वैदिक परंपरेतून आलेली नसून ती अवैदिक आहे, असेही एक मत आढळते. भक्तीचा उगम द्रविड देशात झाला, हे भागवत पुराणातील विधान भक्तीच्या अवैदिकतेचे सूचक आहे. तामिळनाडूमधील आळवारनामक वैष्णव संतांनी (इ. स. सु. ५००-८५०) भारतातील भक्तिपंथांचा प्रारंभ केला आणि त्यानंतर या पंथाचा भारतभर प्रसार झाला, असे काही विद्वानांचे मत आहे. आळवाराचा प्रबंधम् नावाचा ग्रंथच भक्तिपंथाचा मूलस्रेत आहे, असे ते मानतात.
महाभारतामध्ये भक्तीची परंपरा पुढीलप्रमाणे सांगितली आहे : जगाच्या प्रारंभी ब्रह्मदेवाने दक्ष प्रजापतीला भक्तीचा उपदेश केला आणि त्यानंतर आदित्य, विवस्वान्, मनू व इक्ष्वाकू या क्रमाने प्राप्त झालेली भक्ती सर्व लोकांमध्ये पसरली.
विविध धर्मातील भक्तीचे स्थान
विविध समाजातून व देशांतून वेगवेगळया स्वरूपात भक्तिभावनेचा आविष्कार झाल्याने आढळून येते. यहुदी वा ज्यू धर्मामध्ये भक्तीच्या काही प्रभावी चळचळी होऊन गेल्या आहेत. ख्रिस्ती धर्म हा भक्तिप्रधानच आहे. इस्लाममध्ये ईश्वराविषयी आत्यंतिक श्रद्धा बाळगली जाते व या दृष्टीने इस्लाममध्येही भक्तीचे माहात्म्य असल्याचे दिसून येते. जैन व बौद्ध हे धर्म निरीश्वरवादी असले, तरी त्या धर्मामध्ये अनुक्रमे र्तीथकर व बुद्ध यांच्याविषयी असलेला पूज्यभाव भक्तीच्या स्वरूपाचाच असतो.
भक्तीचा आविष्कार विविध स्वरूपांत हिंदू धर्मात झाला आहे. वेद व उपनिषदे यांमध्ये भक्तीचे स्वरूप अस्पष्ट होते. पाणिनीच्या (इ. स. पू. सु. ४थे शतक) सूत्रांवरून असे दिसते, की त्याच्यापूर्वीच वासुदेवभक्ती रूढ झाली होती. कृष्णाच्या अवतारापूर्वी भक्तीला ऐकांतिक, नारायणी, पांचरात्र, सात्वत इत्यादी नावे होती. कृष्णानंतर भक्तीला भागवत धर्माचे स्वरूप प्राप्त झाले. प्राचीन काळातील सनक, नारद, प्रल्हाद इत्यादींची नावे भक्त म्हणून विख्यात आहेत.
दक्षिण भारतातील आळवारांनी वैष्णव भक्तीचा संप्रदाय निर्माण केला. दक्षिणेतच नायन्मार नावाचे त्रेसष्ट तमिळ संत शैव भक्त म्हणून विख्यात झाले (इ. स. सु. ५व्या शतकानंतर). भगवद्गीता व भागवत पुराण या ग्रंथानी भारतातील भक्तिमार्गाला असाधारण प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. रामानुजाचार्य, मध्वाचार्य, वल्लभाचार्य व निवार्क या वेदान्ती आचार्यानी मोक्षप्राप्तीचे साधन म्हणून भक्तीचे माहात्म्य प्रस्थापित केले. रामानुजांच्या परंपरेतील स्वामी रामानंद यांनी उत्तर आणि मध्य भारतात रामभक्तीचे एक अत्यंत प्रभावी आंदोलन निर्माण केले. तुलसीदास हे महान रामभक्त होऊन गेले. चैतन्य संप्रदायाने भक्तीला साधन न मानता पाचवा पुरुषार्थ म्हणजेच सर्वश्रेष्ठ साध्य मानले, कबिरांनी निर्गुण भक्तीचा पुरस्कार केला. सुरदास, मीराबाई इत्यादी असंख्य भक्तांनी भक्तिमार्गामध्ये आपले महान योगदान दिले.
महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाने वैष्णव भक्तीचा प्रचंड प्रभाव निर्माण केला. ज्ञानेश्वर, नामदेव, जनाबाई, एकनाथ, तुकाराम, रामदास इत्यादी विख्यात संत महाराष्ट्रातच होऊन गेले. शिव, विष्णू, गणपती, दत्तात्रेय, काली, सूर्य इत्यादी विविध देवदेवता व त्यांचे अवतार यांची भक्ती करणारे अनेक संप्रदाय भारतात होऊन गेले असून त्यांचा समाजजीवनावर मोठा प्रभाव पडलेला आहे. (माध्व संप्रदाय, वैष्णव संप्रदाय, शैव संप्रदाय).
भक्तीचे कर्मकांड :
भक्तिमार्गामध्ये श्रद्धेला व भावनेला अधिक महत्त्व असल्यामुळे कर्मकांडाचे स्थान तत्त्वत: गौण असते. किंबहुना भक्तिमार्गामध्ये काटेकोर कर्मकांडाविरुद्ध एक प्रकारची बंडखोरीच आढळून येते. तत्त्वत: असे असले, तरी प्रत्यक्षात श्रद्धेचा आविष्कार होण्यासाठी कोणत्या ना कोणत्या कर्मकांडाची गरज भासतेच. त्यामुळे भक्तीचेही विशिष्ट असे एक कर्मकांड आढळून येते. पूजा, प्रार्थना, तीर्थयात्रा, तीर्थ व प्रसाद यांचे सेवन, नामस्मरण, भजन-कीर्तन, चिंतन-मनन इत्यादींचा या कर्मकांडात अंतर्भाव होतो.
हिंदू भक्त ईश्वरी अवतार व मूर्तिपूजा यांना विशेष महत्त्व देतात. भक्तिमार्गामध्ये गुरूचे माहात्म्य विशेष असून त्याच्या उपदेशानुसार त्याचे अनुयायी आपला आचार ठेवतात. साधुसंत व भक्त यांच्याविषयाही विशेष आदरभाव व्यक्त केला जातो आणि त्यांच्या सहवासाची अपेक्षा केली जाते.
मोक्षाचा मार्ग :
भारतात स्थूलमानाने मोक्षप्राप्तीचे ज्ञान, कर्म व भक्ती असे तीन मार्ग मानले जातात. योग हा स्वतंत्र मार्ग मानणारे लोकही आहेत. या विविध मार्गापैकी कोणत्या मार्गाला किती महत्त्व द्यावयाचे, याबाबतीत आणि हे मार्ग एकमेकांना पूरक, पर्यायी की बाधक आहेत, याबाबतीत विविध संप्रदाय, भक्त इत्यादींमध्ये मतभेद आहेत. भक्तिमार्गी संतांच्या मते भक्ती हाच यापैकी सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. याउलट, भक्ती हे मोक्षाचे साधन नसून ती मोक्षापेक्षाही श्रेष्ठ असा पाचवा पुरुषार्थ म्हणजेच साध्य आहे, असे मानणारे भक्तही आहेत.
भक्तीचे प्रकार :
भक्तीचे वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून वेगवेगळे प्रकार मानण्यात आले आहेत. सगुण भक्ती व निर्गुण भक्ती असे दोन प्रमुख प्रकार होतात. शांत, दास्य, सख्य, वात्सल्य व माधुर्य असे पाच प्रकारही मानण्यात आले आहेत. मनात काहीतरी हेतू बाळगून केली जाणारी ती हैतुकी भक्ती आणि निहेर्तुकपणे केली जाणारी ती अहैतुकी भक्ती होय. हैतुकी ही ‘गौणी’ व अहैतुकी ही ‘मुख्या’ वा ‘परा’ भक्ती मानली जाते. यापैकी हैतुकीचे सात्त्विकी, राजसी व तामसी असे तीन पोटप्रकारही सांगण्यात आले आहेत.
शास्त्रांना अनुसरून केली जाणारी व गौण असलेली वैघी भक्ती आणि ईश्वरावरील नितान्त प्रेम दर्शविणारी व प्रमुख असलेली रागात्मिका भक्ती, असेही दोन प्रकार आहेत. गौणी भक्ती करणा-या भक्ताचे आर्त, जिज्ञासू आणि अर्थार्था असे तीन प्रकार पाडण्यात आले आहेत. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य व आत्मनिवेदन हे भागवतपुराणाने सांगितलेले भक्तीचे नऊ प्रकार आहेत. या प्रकारांची संख्या नऊ असल्यामुळेच या भक्तीला ‘नवविधा’ भक्ती असे नाव रूढ झाले आहे. नारदाने गुणमाहात्म्य, रूप, पूजा, स्मरण, दास्य, सख्य, कांताभाव, वात्सल्य, आत्मनिवेदन, तन्मयता व परमविरह अशा अकरा आसक्तींमध्ये भक्तीचे वर्गीकरण केले आहे.
ईश्वर व भक्त यांचे नाते :
ईश्वर व भक्त यांच्या नात्याविषयी विविध धर्म, संप्रदाय व भक्त यांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. ईश्वर हा स्वामी, पिता, माता, बंधू, गुरू, सखा, आत्मा इत्यादी विविध नात्यांनी निर्दिष्ट करण्यात आला आहे. खरे म्हणजे, याबाबतीत नाती दर्शविणारे लिंगवाचक शब्द हे लाक्षणिक असतात. ईश्वर परमप्रेमास्पद आहे, हेच या शब्दांतून सूचित करावयाचे असते. म्हणूनच ज्ञानेश्वरांनी वेगवेगळ्या संदर्भात ईश्वराबरोबर भक्ताची वेगवेगळी नाती मानली आहेत. ईश्वर हा सर्व आणि सर्वस्व आहे. इतर संतांनीही अशीच विविध नाती मानल्याचे आढळते.
इस्लाम धर्मात ईश्वर हा स्वामी व भक्त हा त्याचा दास, असे मानले आहे. ख्रिस्ती धर्मात ईश्वराला पिता मानले आहे. ईश्वराला आई मानणारे अनेक संत, विशेषत: महाराष्ट्रात, होऊन गेले. काही शाक्त पंथीय उपासकांनी स्वत:ला आई व देवाला पुत्र मानल्याचेही सांगितले जाते. मधुराभक्तिनामक भक्तीच्या विख्यात प्रकारात ईश्वराला पती वा प्रियकर आणि स्वत:ला पत्नी वा प्रेयसी मानले जाते. स्वत: स्त्री असलेल्या मीराबाईसारख्या भक्तांनी तर, हे नाते मानले आहेच; परंतु चैतन्य महाप्रभू, गुलाबराव महाराज इत्यादी पुरुषभक्तांनीही स्वत:ला ईश्वराची प्रियतमा मानले आहे. सूफी पंथाच्या भक्तांनी ईश्वराला प्रेयसी आणि स्वत:ला प्रियकर मानून ईश्वरभक्ती केल्याचे आढळते. अर्जुन, सुदामा इत्यादी भक्त हे ईश्वराला सखा मानणारे होते.