Quantcast
Channel: श्रध्दा-संस्कृती – Prahaar.in
Viewing all 1081 articles
Browse latest View live

तुळशी विवाह

$
0
0

त्रिपुरारी पौर्णिमेच्या तीन दिवस आधी म्हणजे द्वादशीला तुळशी विवाह केला जातो. प्राचीन कथेनुसार जालंधर नामक एका राक्षसाने मोठा उच्छाद मांडला होता. तो खूप मोठा पराक्रमी होता. त्याच्या वीरतेचे कारण म्हणजे त्याची पत्नी वृंदा. कारण ती निष्ठावान पतिव्रता होती. त्यामुळे त्याला सर्वत्र जय मिळत होता. जालंधराच्या या उच्छादाने हैराण असलेल्या देवगणांनी आणि ब्राह्मणांनी श्रीविष्णूंकडे धाव घेतली आणि भगवान विष्णूंकडे या राक्षसापासून मुक्तता मिळावी, म्हणून गाऱ्हाणे घातले. त्याप्रमाणे भगवान विष्णूंनी शेषशयन सोडून पाताळात धाव घेतली आणि वृंदाचा पतिव्रता धर्म भंग करण्यासाठी त्यांनी अनेक सायास केले. जालंधर हा देवांबरोबर लढत असताना, त्याच्या पत्नीचे सात्त्विकता कमी झाल्यामुळे त्याला युद्धभूमीवर मरण आले.

वृंदाचे पतिव्रतेचे सात्त्विकता कमी झाल्यामुळे त्याला मरण आले होते, असा समज तिचा झाला. तिने स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला पण स्वत:ला संपवू शकली नाही. शेवटी तिला समजले की, आपल्या पतिव्रतेच्या सात्त्विकतेमुळे नाही तर भगवान विष्णूने तिचं पावित्र्य भंग केल्यामुळे त्याला मरण पत्कारावे लागले. तेव्हा ती भयंकर क्रोधित झाली. तिने श्रीविष्णूला शाप दिला आणि ती म्हणाली, ज्याप्रकारे तू माझ्यापासून माझ्या पतीला हिरावून घेतलं आहेस, त्याप्रमाणे तुलादेखील पत्नीवियोग होईल आणि तुला ही मृत्यूलोकात जन्म घ्यावा लागेल. असं म्हणून ती पतीच्या चितेत सती गेली. ज्याठिकाणी ती सती गेली होती, त्याठिकाणीच तिच्या सात्त्विकतेचं प्रतीक म्हणून एक तुळशीचं रोप उगवलं.

यामागे अजून कथा सांगितली जाते ती म्हणजे, जेव्हा ती श्रीविष्णूंना म्हणाली की, तुलाही पत्नीवियोग होईल आणि तुला मृत्यूलोकात दगड व्हावे लागेल. तेव्हा भगवान विष्णूंनी तिला अतिशय चलाखीने मनवले आणि सांगितले की, मला तुझ्या सत्त्वाची परीक्षा घ्यायची नव्हती तर हे तुझ्या सतित्वाचं फळ आहे की, कलियुगात माझा तुझ्याशी विवाह होईल. कलियुगात जो मनुष्य तुळशी विवाह करेल त्याला परमधाम प्राप्त होईल, असाही वर विष्णूंनी दिला होता. त्यामुळे भगवान विष्णूंच्या पूजेत तुळशीदलाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

तुळशी विवाहामुळे ज्या लोकांना कन्या नाही, त्यांना कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते असा समज आहे. शापित विष्णू भगवानांचा या दिवशी महालक्ष्मी देवींशी विवाह होतो, असा समज असल्यामुळे लोक तुळशी विवाह करतात.


देवदिवाळी

$
0
0

दिवाळीचे पाच दिवस संपले की, सर्वसामान्यपणे दिवाळी संपते, पण दिवाळी ही केवळ पाच दिवसांची नसून हीच दिवाळी कार्तिक पौर्णिमेपर्यंत असते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला देवदिवाळी किंवा देवांची दिवाळी म्हणतात. पंचांगांमधून ‘देवदीपावली’ असा निर्देश असतो. माणसांचे सर्व व्यवहार देवांवर कल्पिण्याच्या प्रघातामुळे, माणसांप्रमाणे देवांच्या दिवाळीची कल्पना आली असावी. या दिवशी आपापल्या कुलदैवताला पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखविण्याची रूढी आहे. काही ठिकाणी या दिवशी बैलांच्या झुंजी लावण्याची चाल आहे. या दिवसापासून खंडोबाचा उत्सव सुरू होतो.

कार्तिक महिन्यात शिवशंकर आणि देवी पार्वतीचे पुत्र कार्तिकेय यांचा देखील जन्म झाला होता. त्यामुळे या मासाला शंकर भगवानांनी ह्यकार्तिक मास असे नाव दिले. कार्तिक महिन्यात कार्तिक पंचमी ते पौर्णिमेदरम्यान जो कोणी स्वामी कार्तिकेय महाराजांची भक्ती करतो, त्याची भक्ती कार्तिक स्वामींपर्यंत पोहोचते, असा समज आहे.

देवदिवाळी आणि त्रिपुरारीचा संबंध
त्रिपुरासुराच्या कथेप्रमाणे त्रिपुरासुराने जो उच्छाद मांडला होता, त्याला श्रीशंकर भगवानांनी शह दिला. त्यामुळे त्रिपुरासुराच्या जाचातून सर्व देवतांची सुटका झाली. अनेक वर्ष त्रिपुरासुराच्या जाचात असलेल्या देवतांनी कार्तिक पौर्णिमेला या जाचातून मोकळा श्वास सोडला आणि स्वर्गलोकात आपले आसनस्थान ग्रहण केले. तो दिवस देवतांसाठी दिवाळीपेक्षा कमी नव्हता. त्यामुळे स्वर्गात आणि देवलोकात हा दिवस ‘देवदिवाळी’ म्हणून साजरा केला जाऊ लागला. त्यामुळे हिंदू संस्कृतीत त्रिपुरारी पौर्णिमेदिवशी देवदिवाळी साजरी केली जाते.

त्रिपुरासुराचा वध हे केवळ एक निमित्त होतं, पण त्यांच्या नावामुळे देवांनाही दिवाळी काय असते, ते समजले. याचदिवशी श्रीविष्णूचा विवाहदेखील झाला होता, असा समज असल्यामुळे ही या तिथीला ‘देवदिवाळी’असे नामाभिधान प्राप्त झाले असावे.

त्रिपुरारी पौर्णिमा
कार्तिक मासात येणा-या पौर्णिमेच्या तिथीला ‘त्रिपुरारी पौर्णिमा’ असंही संबोधलं जाते. या त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शंकरांनी त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून देखील ओळखले जाते. त्रिपुरासुराची कथा सांगायची तर, त्रिपुरासुर हा राक्षसांचा राजा तारकासूर याच्या तीन मुलांपैकी एक. या त्रिपुरासुराने पाताळ, पृथ्वी आणि आकाश लोकामध्ये धुमाकूळ घातला होता.

तिन्ही लोकांवर राज्य केल्यामुळे त्याला त्रिपुरासुर हे नामाभिधान प्राप्त झाले. त्रिपुरासुर हा ब्रह्मदेवांचा भक्त होता. त्याने बारा वर्षे तपश्चार्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतले होते. ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यावर त्याने अनोखा वर मागितला. ज्यामुळे भूतलावर त्याचा कोणीही वध करू शकत नव्हते. त्रिपुरासुराने सामान्य लोकांपासून ते राजे-महाराजे आणि देवांना पळताभुई थोडी केली होती. यज्ञ याग बंद झाले. देवांना स्वर्गातही स्वछंद फिरण्याची भीती वाटू लागली. त्रिपुरासुराच्या कचाटय़ात सर्व देव सापडले होते. पण विष्णू भगवान आणि शिवशंकर देवांना हात लावण्याचा त्याने प्रयत्न केला नाही. त्रिपुरासुराचा उच्छाद कोणीही थांबवू शकत नव्हतं. त्यामुळे तो मनाला येईल, तसं तसं वागत होता. मग शंकर भगवानांनी त्याचा वध करायचं ठरवलं त्याप्रमाणे त्यांनी सूक्ष्मरूप धारण करून त्रिपुरासुराचा वध केला.

पौर्णिमेला त्रिपुरासुराचा वध केल्यामुळे शंकर भगवानांना त्रिपुरांटका असे नामाभिधान प्राप्त झाले तर या कार्तिक पौर्णिमेला या उच्छाद करणा-या राक्षसाचा वध झाला त्यामुळे अशा विनाशकारी राक्षसाचे स्मरण लोकांना राहावे, म्हणून देवांनीच या तिथीला त्रिपुरासुराचे नाव दिले. त्यामुळे वाईटाचा नाश करत ज्ञानाचे दिवे प्रज्वलित करत आपण ही त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करतो.

खंडोबा

$
0
0

महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यांतील एक प्रसिद्ध दैवत. मल्लारी (मल्हारी) मरतड, मरतडभैरव, म्हाळसाकांत, मैलार इत्यादी नावांनीही खंडोबा प्रसिद्ध आहे. ब्राह्मणांपासून तो धनगरापर्यंत खंडोबाचे उपासक आढळतात. तो अनेकांचे कुलदैवतही आहे. मणी आणि मल्ल या दैत्यांच्या नाशासाठी शंकराने मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीस (चंपाषष्ठी), मरतडभैरवाचा अवतार धारण केला. अशी कथा मल्लारि-माहात्म्ये या संस्कृत ग्रंथात आहे. प्रस्तुत ग्रंथ १२६० ते १५४० च्या दरम्यान, अज्ञात महाराष्ट्रीय कवीने रचिला असावा. या ग्रंथामुळेच खंडोबाला महाराष्ट्र-कर्नाटकांत विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली. अश्वारूढ, उभ्या व बैठय़ा अशा त्रिविध स्वरूपात खंडोबाच्या मूर्ती आढळतात. चतुर्भुज कपाळाला भंडार, हातात डमरू, त्रिशूळ, खड्ग व पानपात्र, वाहन घोडा आणि म्हाळसा व बाणाई या भार्या असे त्याचे वर्णन आढळते. खंडोबाच्या परिवारात म्हाळसा, बाणाई, हेगडे प्रधान (बाणाईचा भाऊ व खंडोबाचा प्रधान), घोडा व कुत्रा यांचा समावेश होतो. मुले होण्यासाठी लोक खंडोबास नवस करतात आणि मुलगा झाल्यास ‘वाघ्या’ व मुलगी झाल्यास ‘मुरळी’ म्हणून खंडोबाच्या सेवेस अर्पण करण्याची प्रथा आहे.

महाराष्ट्रात व कर्नाटकात खंडोबाची अनेक पवित्र क्षेत्रे प्रसिद्ध असून तेथे दिनविशेषपरत्वे यात्रा-उत्सवही साजरे केले जातात. महाराष्ट्रात जेजुरी (जि. पुणे), पाली (जि. सातारा) इत्यादी क्षेत्रे, तर कर्नाटकात मंगसुळी (जि. बेळगाव), मैलारलिंग (जि. धारवाड), मैलार (जि. बेल्लारी) इत्यादी क्षेत्रे विशेष प्रसिद्ध आहेत. रविवार सोमवती अमावस्या चैत्री, श्रावणी व माघी पौर्णिमा तसेच चंपाषष्ठी हे दिनविशेष खंडोबाच्या उपासनेत महत्त्वाचे मानले जातात. बेल, भंडार व दवणा या वस्तूंना त्याच्या पूजेत विशेष महत्त्व असून कांदा त्याला प्रिय आहे. त्याला मांसाचाही नैवेद्य दाखवितात.
खंडोबाच्या स्वरूपाविषयी शं. बा. जोशी, पांडुरंग देसाई, ग. ह. खरे, रा. चिं. ढेरे प्रभृती विद्वानांनी संशोधनपूर्वक विविध मते मांडली आहेत.

चंपाषष्ठी : मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीस चंपाषष्ठी म्हणतात. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून मार्तंडभैरवाच्या म्हणजे खंडोबाच्या उत्सवास प्रारंभ होतो. जेजुरी येथे हा उत्सव मोठय़ा प्रमाणावर होतो. उत्सवकालास खंडोबाचे नवरात्रही म्हणतात. चंपाषष्ठीच्या दिवशी मार्तंडभैरवाचे उत्थापन होते. कुलाचाराप्रमाणे पूजेमध्ये कुंभ अथवा टाक ठेवतात. पहिल्या दिवशी एक, दुस-या दिवशी दोन याप्रमाणे वाढवीत सहाव्या दिवशी सहा फुलांच्या माळा त्याला घालतात. षष्ठीला तळई व आरती करतात व हे नवरात्र उठवितात. महानैवेद्यात वांग्याचे भरीत, रोडगा आणि कांद्याची पात यांचा अंतर्भाव आवश्यक असतो. खंडोबावरून नारळ ओवाळून फोडतात व त्याचा प्रसाद आणि भंडारा सर्वाना देतात. तळी भरताना व आरतीच्या वेळी ‘खंडोबाचा येळकोट’ असे म्हणतात. चातुर्मास्यात निषिद्ध मानलेले कांदे, वांगी इ. पदार्थ या दिवसापासून खाणे विहित मानले जाते.

भाद्रपद शुद्ध षष्ठीस मंगळवार, विशाखा नक्षत्र व वैधृतियोग येत असेल, तर तिलाही चंपाषष्ठी म्हणतात. सुमारे तीस वर्षानी एकदा अशी चंपाषष्ठी येते. या दिवशी उपवास, सूर्यपूजा व शिवलिंगदर्शन करावे, असे सांगितले आहे.

मोरया गोसावी (१३७५-१४६१)

$
0
0

महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध गणेशभक्त साधुपुरुष. त्यांना गणेशभक्तीचा वारसा वडिलांकडून मिळाला. त्यांच्या वडिलांचे नाव वामनभट्ट शाळिग्राम आणि आईचे नाव पार्वतीबाई. मूळचे कर्नाटकातील शाली या गावचे वामनभट्ट पुण्याजवळील मोरगावी येऊन स्थायिक झाले. उतारवयात मोरगाव येथे मयूरेश्वराच्या (गणेशाच्या) कृपेमुळे पुत्र झाला, या श्रद्धेमुळे वामनभट्टांनी मुलाचे नाव मोरया असे ठेवले.

लहानपणीच वेदाध्ययन पूर्ण केल्यावर सिद्ध योगिराज नावाच्या सत्पुरुषाच्या उपदेशानुसार मोरया यांनी थेऊरला जाऊन तपश्चार्या केली. तेथे त्यांना गणेशाचा साक्षात्कार झाला आणि तेव्हापासून ते ‘मोरया गोसावी’ बनले, असे म्हणतात. आई-वडिलांच्या निधनानंतर ते पुण्याजवळ चिंचवड येथे पवना नदीच्या काठी आश्रमात राहू लागले. तेथेच गोविंदराव कुलकर्णी यांची मुलगी उमाबाई हिच्याशी त्यांचे लग्न झाले. त्यांनी आपल्या मुलाचे नाव चिंतामणी असे ठेवले.

गणेशाच्या साक्षात्कारानुसार त्यांनी कर्हा नदीतून गणेशाची मूर्ती बाहेर काढली आणि चिंचवड येथे तिची स्थापना केली. त्यांनी गणपतीविषयीच्या भक्तिभावाने अनेक प्रसादिक पदांची रचना केली. १४६१ वा १६५५ मध्ये त्यांनी चिंचवड येथे जिवंत समाधी घेतली अशी मते आहेत. पुढे त्यांच्या मुलाने समाधीवर मंदिर उभारले. दरवर्षी मार्गशीर्ष वद्य तृतीया ते षष्ठी (षष्ठी ही समाधीची तिथी) या काळात चिंचवड येथे त्यांच्या पुण्यतिथीचा उत्सव साजरा होतो.

पुढे त्यांच्या घराण्यात अनेक सत्पुरुष निर्माण झाल्यामुळे या घराण्यास ‘देव’ असे नाव प्राप्त झाले. त्यांच्या वंशजांना आदिलशहा, संभाजी, राजाराम, शाहू इत्यादींनी इनामे दिली होती.

(संदर्भ : मराठी विश्वकोश)

दत्तात्रेय

$
0
0

एक हिंदू देवता. पुराणांनुसार तो अनसूयेस अत्री ऋषीपासून झालेला पुत्र होय. त्याच्या जन्माबाबत पुराणांत विविध कथा आल्या आहेत. महाभारतात मात्र त्याला अत्रिपुत्र न म्हणता अत्रिवंशात जन्मलेला गृहस्थ म्हटले आहे. सर्वसाधारणपणे तो विष्णूचा अवतार मानला जातो. वेद, कर्मकांड व चातुर्वण्र्य यांचे विष्णूने दत्तावतारात पुनरुज्जीवन केल्याचे ब्रह्मपुराणात म्हटले आहे. शंकर हा दत्ताचा गुरू असल्याचाही तेथे निर्देश आहे. भागवतात अवधुतांचे २४ गुरू सांगितले आहेत. पुढे हेच २४ गुरू दत्तात्रेयाचेही गुरू म्हणून ओळखले जाऊ लागले व दत्तचरित्रातही ते कायमचे प्रविष्ट झाले. शांडिल्योपनिषद, जाबालदर्शनोपनिषद व दत्तात्रेयोपनिषद यांतही दत्तात्रयाचे माहात्म्य वर्णिले आहे.

माहूर, कोल्हापूर व औदुंबर ही दत्तात्रेयाशी निगडित असलेली स्थाने मुळात प्राचीन शक्तिपीठेच होत. ‘दत्तात्रेयतंत्र’ नावाचे एक तंत्रही आहे. रूद्रयामल या प्रसिद्ध तंत्रग्रंथात तसेच तंत्रमहोदधी या मंत्रविद्येवरील ग्रंथात दत्तात्रेयास महत्त्वाचे स्थान आहे. यावरून इ. सनाच्या प्रारंभी त्रिपुरोपासक शाक्त उपासनेत दत्तात्रेयाची निर्मिती होऊन पुढे त्याला देवतास्वरूप आले असावे. पुराणांत भार्गव, परशुराम, अलर्क, कार्तवीर्य सहस्र्जुन, प्रल्हाद, यदू व आयू हे दत्तात्रेयाचे शिष्य असल्याचे म्हटले आहे. माहूर, कोल्हापूर व पांचाळेश्वर ही दत्तात्रेयाची विहारस्थाने मानली जातात. दत्तात्रेयाने विविध कारणांस्तव सोळा अवतार घेतले, अशी समजूत आहे. वासुदेवानंद सरस्वतींनी श्रीदत्तात्रेयषोडशावतारा: या संस्कृत ग्रंथात या सोळा अवतारांची नावे, कथा आणि माहात्म्य वर्णिले आहे. दासोपंत, श्रीपाद श्रीवल्लभ, नरसिंह सरस्वती, अक्कलकोटकर स्वामी आणि माणिक प्रभू या सत्पुरुषांनाही दत्तात्रेयाचेचे अवतार मानले जाते.

दत्तात्रेयाच्या स्वरूपाबाबत विविध वर्णने आढळतात. एकमुखी व चतुर्भुज एकमुखी द्विभुज व मांडीवर लक्ष्मी त्रिमुख व षङभुज इत्यादी स्वरूपांत दत्तात्रेय वर्णिला आहे. त्रिमुख व षङभुज दत्तात्रेयाचे हल्ली प्रचलित असलेले स्वरूप प्राचीन साहित्यात मात्र आढळत नाही. १००० च्या सुमारास ब्रह्मा, विष्णू व महेश यांच्या अंशात्मक स्वरूपात दत्तात्रेयाची उपासना होऊ लागली असावी व तेच स्वरूप आजही रूढ आहे. या त्रिमुख-षङभुज दत्तात्रेयामागे एक गाय व आजूबाजूस चार श्वान आहेत. गाय हे पृथ्वीचे, तर चार श्वान वेदांची प्रतीके मानली जातात. या स्वरूपातील दत्तात्रेयाचे ध्यान लोकप्रिय असले, तरी प्रसिद्ध दत्तोपासकांनी आपल्या उपासनेत एकमुखी दत्तात्रेयासच स्थान दिले. औदुंबर वृक्षाखाली दत्तात्रेयाचा वास असतो ह्या समजुतीमुळे हा वृक्ष पवित्र मानतात.

दत्तात्रेयाविषयी नाथ, महानुभाव व वारकरी या संप्रदायांत नितान्त आदर व श्रद्धाभाव आहे. दत्तात्रेय हा योग व तंत्रमार्गातील आचार्य वा योगीराज मानला जातो. अवधुतोपनिषद व जाबालदर्शनोपनिषद या ग्रंथांतील बोध प्रत्यक्ष दत्तप्रणीत असल्याचे ह्या उपनिषदांत म्हटले आहे. अवधूतगीता, त्रिपुरोपास्ती पद्धती व परशुरामकल्पसूत्र हे ग्रंथ दत्तप्रणीत मानले जातात. यांतील पहिला ग्रंथ सांप्रदायिक असून उर्वरित दोन ग्रंथ तंत्रविषयक आहेत. दत्तात्रेयाचे एकाक्षरी, षडक्षरी अष्टाक्षरी, द्वादशाक्षरी व षोडशाक्षरी मंत्र असून ‘दत्तगायत्री’ नावाचाही एक मंत्र आहे.

चौदा रत्ने

$
0
0

एकदा युद्धामध्ये दैत्यांच्या तीक्ष्ण शस्त्रांनी देवांचा संहार होऊ लागला, तसेच दुर्वास ऋषींच्या शापामुळे इंद्रासह सर्व देव हतबल झाले. त्यावेळी ब्रह्मदेवासह सर्व देव विष्णूकडे गेले. विष्णूने त्यांना प्रथम दैत्यांशी सख्य करावयास तसेच त्यांच्या मदतीने अमृत उत्पन्न करावयास सांगितले. त्यानंतर देवांनी व दैत्यांनी एकत्र येऊन समुद्रमंथन केले, तेव्हा समुद्रातून चौदा रत्ने निघाली, अशी कथा पुराणांत आहे.

त्यांची नावे अशी : (१) हालाहल विष, (२) कामधेनू, (३) उच्चै:श्रवानामक अश्व, (४) ऐरावतनामक हत्ती, (५) कौस्तुभ रत्न, (६) पारिजातक वृक्ष, (७) रंभादी अप्सरा, (८) सुरा, (९) चंद्र, (१०) शंख, (११) धनुष्य, (१२) लक्ष्मी, (१३) धन्वंतरी व (१४) अमृत. हालाहल विष शंकराने प्राशन केले. त्यामुळे शंकर नीलकंठ झाले. कामधेनूचा ऋषींनी अग्निहोत्राकरिता स्वीकार केला. उच्चै:श्रवा अश्व दैत्यराज बलीने घेतला. ऐरावत हत्ती इंद्राने घेतला. कौस्तुभ रत्नाचा स्वीकार विष्णूने केला व ते गळ्यात धारण केले.

पारिजातक वृक्षाने स्वर्गाला शोभा आणली. अप्सरा स्वर्गात राहून देवांचे मनोरंजन करू लागल्या. सुरा ह्या मादक पेयाचा स्वीकार असुरांनी केला. लक्ष्मीने पती म्हणून विष्णूचा स्वीकार केला. शंख व धनुष्य यांचा विष्णूने स्वीकार केल्याचा उल्लेख पुराणांतून आढळतो. धन्वंतरीला देवांचा वैद्य म्हणतात. अमृत देवांनी मिळविले.

आदिनाथ

$
0
0

जैनांचे पहिले र्तीथकर, वृषभनाथ (किंवा ऋषभनाथ) हे त्यांचे दुसरे नाव, जन्मस्थळ अयोध्यानगरी, मरुदेवी व नाभिराज हे माता-पिता. त्यांनी तत्कालीन समाजाला असि(शस्त्र), मषि (लेखन), कृषि, विद्या, शिल्प व वाणिज्य या सहा व्यवहारांचा उपदेश देऊन मार्गदर्शन केले. आदिनाथ व महावीर यांनीच छेदोपस्थापन नावाच्या (म्हणजे प्राक्तन पापाचे छेदन करण्याकरिता प्रायश्चित्ते घेऊन आत्म्याला आत्यंतिक संयमात स्थापन करणे) तपाला महत्त्व दिले.

चक्रवर्ती भरत व वीरशिरोमणी बाहुबली हे त्यांचे प्रसिद्ध पुत्र. वैराग्यप्राप्तीनंतर राज्याचा त्याग करून आदिनाथांनी दीक्षा घेतली व घोर तप केले. केवलज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांनी जैन धर्माचा उपदेश केला. आदिनाथांच्या योगाने जैन धर्म व वैदिक धर्म यांचा विभक्त असलेला सांधा एकरूप होतो.

वायू, ब्रह्मांड, अग्नि, विष्णू, मरकडेय, कूर्म, लिंग, वराह, स्कंदव भागवत या वैदिक मार्गीय पुराणांमध्ये परमहंस, अवधूत, योगी जटाधारी म्हणून आदिनाथांचा निर्देश आला आहे. कैलास पर्वतावर त्यांना मोक्षप्राप्ती झाली.

पंचाचार्य

$
0
0

वीरशैव (लिंगायत) पंथातील एक संकल्पना. भगवान शंकराच्या पाच मुखांतून उत्पन्न झालेले वीरशैवांचे हे पाच मूळ आचार्य असल्याचे मानतात. त्यांनीच वीरशैव धर्माची स्थापना केल्याचेही काही वीरशैव अनुयायी मानतात.

त्यांची नावे रेवणाराध्य, मरुळाराध्य, एकोरामाराध्य, पंडिताराध्य व विश्वाराध्य अशी आहेत. त्यापैकी रेवणाराध्य तथा रेणुकाचार्यानी अगस्त्य ऋषींना शिवाद्वैत सिद्धांताचा उपदेश केला. या उपदेशावरच आधारित सिद्धांत-शिखामणी हा ग्रंथ आपण रचिला, असे शिवयोगी शिवाचार्यानी आपल्या ग्रंथात प्रतिपादिले आहे. ह्या पंचाचार्यानी अनुक्रमे बाळेहळ्ळी (रंभापुरी-कर्नाटक), उज्जिनी (कर्नाटक), ऊखीमठ (केदारक्षेत्र-उत्तर प्रदेश), श्रीशैलम क्षेत्र (आंध्र प्रदेश) व जंगमवाडी (काशीक्षेत्र) ही पाच धर्मपीठे स्थापिली. ही धर्मपीठे सांप्रतही अस्तित्वात आहेत.

ह्या धर्मपीठांचे अधिपती ‘जगद्गुरू’ उपाधीने संबोधिले जातात. या पंचाचार्यानी उपनिषदादी ग्रंथांवर भाष्ये लिहिली होती, असे म्हणतात. पण, ती आजतरी उपलब्ध नाहीत.


दशावतार

$
0
0

दुष्टांचा नाश, सज्जनांचे रक्षण आणि धर्माची स्थापना यांसाठी परमेश्वर युगायुगांत निरनिराळे अवतार घेतो, असे भगवद्गीतेत म्हटले आहे. हे दहा अवतार विष्णूचे आहेत. शिव, गणपती, देवी इ. देवतांनीही अवतार घेतले असल्याच्या अनेक कथा पुराणांत आहेत. विष्णूच्या दहा अवतारांपैकी मत्स्य, कूर्म, वराह, वामन व परशुराम या अवतारांची कथाबीजे वैदिक वाङ्मयात मिळतात. पुराणांनी विष्णूचे प्रमुख दहा अवतार मानले असले, तरी भागवतपुराणात विष्णूचे चोवीस अवतारही सांगितले आहेत.

पुराणांत दशावतारांच्या जन्मतिथी सांगितल्या आहेत. त्या अशा (१) मत्स्य-चैत्र शुद्ध तृतीया, (२) कूर्म-वैशाख पौर्णिमा, (३) वराह-भाद्रपद शुद्ध तृतीया, (४) नरसिंह-वैशाख शुद्ध चतुर्दशी, (५) वामन-भाद्रपद शुद्ध द्वादशी, (६) परशुराम-वैशाख शुद्ध तृतीया, (७) राम-चैत्र शुद्ध नवमी, (८) कृष्ण-श्रावण वद्य अष्टमी, (९) बुद्ध-आश्विन शुद्ध दशमी, (१०) कल्की-श्रावण शुद्ध षष्ठी.

विष्णूने हे दहा अवतार कशासाठी घेतले यासंबंधी पुराणांत अनेक कथा आढळतात. मत्स्यावतार-शंखासुराला मारण्यासाठी आणि प्रलयकाळी मनूचे रक्षण करण्यासाठी, कूर्मावतार-देव व दैत्य मंथन करीत असता, मंदार पर्वताला आधार देण्यासाठी, वराहावतार-हिरण्याक्ष राक्षसाचा वध करून पाण्यात बुडणा-या पृथ्वीला वर काढण्यासाठी, नरसिंहावतार-हिरण्यकशिपूचा वध करून प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी, वामनावतार-तीन पावलात बळीचे सर्वस्व हरण करून बळिराजाला पाताळात लोटून पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी, परशुरामावतार-सहस्र्जुनाला मारण्यासाठी आणि दुष्ट क्षत्रियांचा नाश करण्यासाठी, रामावतार-रावणादी राक्षसांचा नाश करण्यासाठी, कृष्णावतार-कंसादी दुष्टांचा वध करण्यासाठी, बुद्धावतार-यज्ञहिंसेचा अतिरेक थांबवून अहिंसेचे तत्त्व प्रतिपादन करण्यासाठी व कल्कीचा अवतार-म्लेंच्छांदी दुष्टशक्तींचा नाश करून धर्म स्थापना करण्यासाठी. हा शेवटचा कलियुगाच्या शेवटी होणार आहे, असे कल्कीपुराणात म्हटले आहे.

दशावतारांची ही कल्पना उत्क्रांतिवादावर आधारित आहे, असे एक मत आहे, तर अ‍ॅनी बेझंट यांनी आपल्या अवताराज (१९२५) या पुस्तकात अवतारानुसार वेगवेगळी युगे मानली आहेत. गीतगोविंदकार जयदेवाने श्रीकृष्ण हा श्रेष्ठ देव मानून त्याचे दहा अवतार सांगितले आहेत. कृष्णाऐवजी तो बलराम हा आठवा अवतार मानतो.

दशावतार नावाचे एक व्रतही सांगितले आहे. अवतार ज्या दिवशी झाला, त्या दिवशी त्या अवताराची मूर्ती तयार करून तिची पूजा, तीस खाद्यपदार्थाचा नैवेद्य असा याचा विधी आहे. या पदार्थापैकी दहा देवाला, दहा ब्राह्मणाला देऊन दहा स्वत:साठी ठेवतात.

तुकडोजी महाराज (२९ एप्रिल १९०९-१० नोव्हेंबर १९६८)

$
0
0

महाराष्ट्रातील एक आधुनिक संत, भक्त, कवी व समाजसुधारक. मूळ नाव माणिक बंडोजी ठाकूर. विदर्भात यावली (जि. अमरावती) येथे जन्म. ठाकूर घराण्याचे कुलदैवत पंढरपूरचा विठोबा असल्याने लहानपणापासूनच त्यांना ध्यान, भजन, पूजन या गोष्टींची आवड निर्माण झाली. मराठी तिसरीपर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी शाळा सोडली. वरखेडला (जि. अमरावती) आजोळी असताना आडकूजी महाराजांना त्यांनी गुरू केले. पुढे कीर्तन, भजनासाठी ते स्वत:च कविता रचू लागले. एके दिवशी गुरुमहाराजांनी माणिकला तुकडय़ा म्हणून हाक मारली व म्हटले की, ‘तुका म्हणे’ असे किती दिवस म्हणशील? ‘तुकडय़ा म्हणे’ असे म्हणत जा. ‘तुकडय़ा म्हणे’ या वाक्याने संपणारे असंख्य अभंग त्यांनी लिहिले. यामुळे ते तुकडोजी महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले. ईश्वरभक्ती, सद्गुणांचा उपदेश, सामाजिक जागृती इ. विषय त्यांनी आपल्या कीर्तनांतून हाताळले, म्हणूनच त्यांना जनतेने ‘राष्ट्रसंत’ अशी उपाधी देऊन गौरविले.

तुकडोजी महाराजांचे कवित्व अस्सल आहे. कीर्तने व खंजिरी भजने यांच्या माध्यमातून समाजसेवा हेच तुकडोजींचे ध्येय होते. त्यासाठी परंपरागत अनिष्ट रूढी, जाती-धर्म-पंथभेद, अंधश्रद्धा इ. समाजघातक गोष्टींवर कठोर प्रहार करून ईश्वराचे विशुद्ध स्वरूप त्यांनी लोकांसमोर मांडले. त्यामुळे सर्व धर्माचे, सर्व पंथांचे लोक त्यांच्याकडे आकृष्ट झाले. आत्मसंयमाचा आणि देशभक्तीचा प्रचार करण्यासाठी त्यांनी अविश्रांत श्रम केले. गावोगावी ‘गुरुदेव सेवा मंडळे’ स्थापली. व्यायामाचे महत्त्व सांगण्यासाठी आदेशरचना हा ग्रंथ त्यांनी लिहिला.

राष्ट्रीय विचारांचा पुरस्कार त्यांनी १९३० सालच्या सत्याग्रहात भाग घेऊन केला. गांधीजींसारख्या राष्ट्रनेत्यांबरोबर त्यांचा संबंध आला. तुकडोजी महाराजांनी राष्ट्रकार्याकरिताच आपले जीवन समर्पित केले. १९३६ साली गांधीजींच्या सहवासात राजेंद्र बाबू, पं. नेहरू, मौलाना आझादप्रभूती राष्ट्रनेत्यांशी त्यांचा परिचय झाला. भारत सेवक समाजात त्यांनी गुलझारीलाल नंदाजींबरोबर काम केले. आपल्या मतांच्या प्रचारार्थ त्यांनी विपुल ग्रंथरचना केली. त्यांची सु. चाळीस पुस्तके प्रसिद्ध आहेत. ४१ अध्यायांचे ४,६७५ ओवीसंख्या असलेले ग्रामग्रंथ हे त्यांचे प्रसिद्ध काव्य होय. त्यांनी हिंदी व मराठी अशा दोन्ही भाषांत काव्यरचना केली. त्यांचे कवित्व जातिवंत असून, ते आधुनिक संतप्रवृत्तीचे निदर्शक आहे. १९४२ च्या आंदोलनात भाग घेतल्याने त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगात त्यांनी सुविचारस्मरणी हा ग्रंथ लिहिला. स्वातंत्र्यानंतर भूदान, अस्पृश्योद्धार, जातिनिर्मूलन इ. कार्याकडे त्यांनी विशेष लक्ष पुरविले.

विश्वधर्म व विश्वशांती परिषदेसाठी १९५५ मध्ये ते जपानला गेले. त्यांच्या भजनाने अनेक पाश्चात्त्य व पौर्वात्य विद्वान मोहित झाले. १९६६ मध्ये प्रयाग येथे विश्वहिंदू परिषदेचे ते अध्यक्ष होते. सर्व धर्म, पंथ, जाती यांच्या पलीकडे असलेल्या ईश्वराचे स्वरूप ते आपल्या भजनांतून प्रकट करीत.

ईश्वराचे ज्ञान करून घेऊन व्यक्तिविकास व समाजजागृती केली पाहिजे, असे ते म्हणत. धार्मिक एकात्मता निर्माण करण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. गुरुकुंज आश्रमात (मोझरी, जि. अमरावती) त्यांचे निधन झाले. तेथेच त्यांची समाधी आहे. गुरुकुंज आश्रमाच्या वतीने अनेक प्रकारचे समाजोपयोगी कार्य चालू आहे.

कुबेर

$
0
0

अष्टदिक्पालांपैकी उत्तर दिशेचा अधिपती. त्याचा पिता विश्रवस पितामह पुलस्त्य व प्रपितामह ब्रह्मदेव. भरद्वाजाची मुलगी देववर्णिनी ही त्याची माता. इडविडा आणि पुलस्त्य अशीही त्याच्या मातापित्यांची नावे आढळतात. त्याचे पुत्र नलकूबर व मणिग्रीव. पत्नी ॠद्वी, यक्षराज, वैश्रवण, पौलस्त्य, ऐडविड, धनद, निधिपती इ. नावांनीही त्याचे उल्लेख आहेत. तो रावणाचा सावत्र भाऊ. कुबेराच्या तश्चार्येमुळे संतुष्ट होऊन ब्रह्मदेवाने त्याला अमरत्व, लोकपालत्व, धनेशत्व, रुद्राचे मित्रत्व आणि पुष्पक विमान दिले. मेरू पर्वतावरील लंकानगरीत राहात असता, रावणाने लंकानगरी त्याच्यापासून हिरावून घेतली. त्यामुळे त्याने कैलास पर्वतावर विश्वकम्र्याकडून अलकानगरी वसविली. अलकानगरीचे कालिदासादी कवींच्या काव्यांत सुंदर वर्णन आढळते. त्याच्या उपवनाचे नाव ‘चैत्ररथ’. कुबेर मुळात फारच सुंदर होता तथापि पार्वतीकडे साभिलाष दृष्टीने पाहिल्यामुळे त्याचा डावा डोळा गेला, उजवा पिंगट झाला व त्याला कुरूपता आली. नर अथवा मेष हे त्याचे वाहन तथापि हत्ती, घोडा सिंह, रथादींचाही त्याचे वाहन म्हणून उल्लेख आढळतो.

ऐश्वर्य आणि विलास यांची प्रातिनिधिक देवता म्हणून त्याचे अनेक उल्लेख साहित्यातून येतात. यक्षांचा अधिपती म्हणून तसेच शक्ती, समृद्धी आणि कल्याण प्रदान करणा-या लोकदेवतेच्या स्वरूपातही त्याची उपासना उत्तर भारतात विशेष प्रचलित होती. नगररचनेत इतर प्रमुख देवतांसोबतच कुबेराच्या मंदिराचाही समावेश असे.

त्याच्या अनेक मूर्ती सापडल्या असून, भारहूत येथे सापडलेली त्याची अर्धमूर्ती सर्वात प्राचीन (इ.स.पू.सु.१००) मानली जाते. मथुरा, पद्मावती, पाटलिपुत्र, विदिशा इ. प्राचीन नगरे त्याच्या उपासनेची महत्त्वाची केंद्रे होती. ह्या ठिकाणी हातात मदिरापात्र असलेल्या तुंदिलतनू कुबेराच्या विविध मूर्ती सापडल्या आहेत. त्याच्या कुशाण व गुप्तकालीन काही मूर्तीत एका हातात मदिरापात्र व दुस-या हातात द्रव्याची थैली धारण केलेल्या मूर्ती आहेत तर इतर काही मूर्तीत तो पर्वतावर अथवा धनराशीवर विराजमान झालेला आढळतो. बौद्ध धर्मात आणि कलेत जंभाल म्हणून त्याचा उल्लेख व मूर्ती आढळतात. महायान पंथात त्याची भार्या ‘वसुधारा’, तर वज्रयान पंथात ‘मारीची’ असा उल्लेख आहे. जैन धर्मात त्याला मल्लिनाथ र्तीथकराचा यक्ष आहे.

अविस्मरणीय मानसरोवर यात्रा

$
0
0

रामचंद्र सावंत

देवाधिदेव शंकर आणि आदिशक्ती पार्वती यांच्या विश्रांतीचे, एकांताचे स्थान म्हणजे कैलास. ब्रह्मदेवाने मनातून निर्मिलेले पवित्र मानसरोवर. येथील वातावरण गूढ, रम्य, गहन आणि तितकेच आनंददायक आहे. इथे यायचे तर भक्ती, श्रद्धा, मनाची तरलता, सजगता आणि ईश्वर प्राप्तीची इच्छा हवी.

कैलास – मानसरोवर भारतात होते, १९६२च्या युद्धानंतर ते चीनमध्ये गेले. १९८२पासून ही यात्रा सुरू झाली. भारत सरकारतर्फे होणारी यात्रा एक महिन्यापेक्षा जास्त काळ चालणारी आणि कठीण आहे. मैत्री ग्रुपतर्फे आम्ही मानसरोवरचा कार्यक्रम आखला. लखनऊ-नेपालगंज-सिमीकोट-हीलसा हा मार्ग आम्ही निवडला. मुंबई- लखनऊ – नेपालगंज अशा पहिल्या टप्प्याच्या (१६८ किमी) विमान प्रवासाने आम्ही सुरुवात केली. रात्री आम्ही भारताची सीमा ओलांडून नेपाळमध्ये प्रवेश केला. तिथे शेर्पा टीम आणि पर्यटन मार्गदर्शक यांच्याद्वारे संपूर्ण यात्रेचे मार्गदर्शन व परिचय सत्र झाले. दुस-या दिवशी छोटय़ा विमानातून सीमिकोटकरिता निघालो. हा संपूर्ण प्रवास हिमालयाच्या मुख्य रेंजमधला असल्यामुळे हे विहंगम दृष्य खूपच मनोहारी होते. सीमिकोट येथून हेलिकॉप्टरने हिलसाला गेलो. तिथेच आमचा मुक्काम होता. खराब हवामानामुळे पुढचे दोन दिवस तिथेच थांबलो.

दुस-या दिवशी हवामान बदलल्याने आम्ही सॅक आणि साईड बॅग घेऊन नेपाळ ‘इमिग्रेशन’ ऑफिस गाठले. तेथील कार्यपूर्तता करून, कर्णाली नदी ओलांडून चीनच्या प्रदेशात प्रवेश केला. हा प्रदेश मूळचा तिबेट. दुस-या दिवशी बसमधून यमद्वारनजीकच्या (४७५० मीटर) घोडे स्टँडजवळ आम्ही गेलो. इथे कैलासचे प्रथम दर्शन झाले. समोर कैलासची दक्षिण बाजू स्पष्टपणे दिसणारा ओम आणि त्रिनेत्र आम्ही सर्व डोळ्यात, मनात आणि अंत:करणात साठवून ठेवत होतो. जे चित्र आजपर्यंत फक्त फोटोत बघितले होते, ते भान विसरून पाहत होतो. भरभरून फोटो काढत होतो. यमद्वार तेथून साधारण अर्धा किमी दूर होते. तिथपर्यंत चालत जायची प्रथा आहे. मी यमद्वापर्यंत चालत गेलो. एका वेळेस २ माणसे आत जाऊ शकतील, एवढा दरवाजा होता. दरवाजा उंचीला साधारण ५.६ फुटी माणसास वाकून आत जावे लागेल असा. यमद्वाराची संपूर्ण उंची साधारण १० फूट असावी. कैलास यात्रीचे एक विशेष ते म्हणजे हे यात्रेकरू स्वत: या द्वाराने स्वर्गात प्रवेश करतात. यमद्वाराची अलीकडची बाजू मृत्यू लोक भूमी आणि पलीकडची बाजू म्हणजे देव लोक भूमी.

पुढचा मुक्काम डेराफुक ( ४८९० मी.) येथे केला. दुस-या दिवशी डेराफुकवरून दारचेनला (४६०० मीटर) परत आलो. रात्रीचा मुक्काम करून सकाळी दारचेन सोडले आणि मानासरोवर परिक्रमेसाठी निघालो. मानससरोवरचा परीघ १६० किमीचा आहे. ही परिक्रमा बसने होते. हा प्रदेश ‘‘इको सेन्सिटिव्ह झोन’’ म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे येथील रस्ते कच्चे आहेत. येथे चालणा-या बससुद्धा विशेष दर्जाच्या आहेत. ही परिक्रमा पूर्ण करण्यास साधारण ४ तास लागतात. काही वेळातच सरोवर दिसू लागले. निळेशार, पारदर्शक सुंदर पाणी पाहून मन अगदी हरखून गेले. एका छानशा ठिकाणी बस थांबली. आम्ही बसमधून उतरलो आणि सरोवराच्या काठावर गेलो. पाणी अगदी स्फटिकासारखे स्वच्छ, निर्मळ पाणी आणि भिंगासारखे स्वच्छ पारदर्शक होते. खालचा तळ स्पष्ट दिसत होता. माधांता पर्वत आणि कैलास पर्वत यांच्या रांगांमध्ये हे भव्य सौंदर्य वैभव होते. आम्ही आमच्या तीर्थाच्या बाटल्या येथे भरून घेतल्या. पवित्र गोटे घेतले. हे पाणी परम-पवित्र मानले जाते. ब्रह्मदेवाने मनाने निर्मिलेले हे सरोवर आहे. या सरोवरात ब्रह्म मुहूर्तावर (सकाळी ३ वाजता) देव स्नानाकरिता येतात, अशी श्रद्धा आहे. या परिक्रमेदरम्यान सरोवराची विविध रूपे न्याहाळता आली. वाटेत एका उंच ठिकाणावरून राक्षस ताल दिसू लागला. पुढे तो अगदी जवळ आला. अगदी रस्त्याच्या बाजूला बस थांबली. राक्षस तालविषयी असा समज आहे की, येथे अशुभ शक्तींचा वावर आहे. हे पाणी खारट आहे. या पाण्यात कोणतीही जीवसृष्टी नाही. इतकेच नव्हे, तर या पाण्यावरून पक्षीसुद्धा उडत नाहीत.

मानासरोवर येथे महादेवाची पूजा हा विशेष समाधान देणारा कार्यक्रम असतो. त्यासाठी काही पूजेचे सामान जवळजवळ सर्वजण खास मुंबईवरून घेऊन आले होते. जवळपास २ तास पूजा चालली होती. अगदी मनाचे समाधान होईल, अशी पूजा झाली. रात्रीचा मुक्काम करून सकाळी आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.

दयानंद सरस्वती

$
0
0

आधुनिक वेदमहर्षी, निर्भय धर्मसुधारक, महापंडित, कुशल संघटक व आर्यसमाजाचे संस्थापक. काठेवाडमधील मोरवी राज्यातील टंकारा या गावी दयानंदांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करसनजी तिवारी असे होते. हे पिढीजात सावकार व जमीनदार होते. तसेच ते महसूल खात्यात मोठे सरकारी अधिकारीही होते. करसनजी हे सामवेदी औदिच्य ब्राह्मण होते. ते शैवपंथी होते. समाजात त्यांना बराच मान होता. अशा कुलीन कुळात दयानंद जन्मले. त्याचे नाव मूलशंकर असे ठेवण्यात आले. वयाच्या पाचव्या वर्षीच त्यांनी संस्कृत ग्रंथांच्या अभ्यासास सुरुवात केली. आठव्या वर्षी मुंज झाल्यावर त्यांनी वेदाध्ययनास प्रारंभ केला. सामवेदी असूनही त्यांनी प्रथम शुक्ल यजुर्वेदाचे अध्ययन केले. चौदाव्या वर्षी त्यांनी वेदाध्ययन पूर्ण केले. मुंजीनंतर त्यांनी शैल पंथाची दीक्षा घेऊन पार्थिवपूजा स्वीकारली. अथर्व वेदांतील काही भाग आणि संस्कृत व्याकरणाचे ग्रंथ यांचेही अध्ययन केले.

वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांच्या जीवनात क्रांतिकारक बदल होण्याचा काळ आला. शिवरात्रीच्या दिवशी रात्री शिवमंदिरात जागरण करीत असता, शिवाच्या पिंडीवर उंदीर फिरताना त्यांनी पाहिला व देव म्हणजे मूर्ती नाही, हे त्यांना उमगले. वडिलांना त्यांनी हा प्रश्न विचारला, पण समाधानकारक उत्तर मिळाले नाही. देव आणि धर्म यांच्यासंबंधी विचारांना मात्र चालना मिळाली. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांची धाकटी बहीण व प्रेमळ चुलते अंबाशंकर यांचा मृत्यू त्यांनी डोळ्यांनी पाहिला. मृत्यूच्या भीतीतून सोडविणारा मोक्ष कसा मिळेल, याचाच मूलशंकर सतत विचार करू लागले. अनेकांना त्यांनी यासंबंधी प्रश्न विचारले. योगाभ्यास केल्याशिवाय याचे उत्तर मिळणार नाही, हे त्यांना समजले. मुलाच्या मनात वेगळेच विचार चालले आहेत, हे लक्षात येताच वडिलांनी त्यांच्या विवाहाचा घाट घातला; परंतु हे समजताच मूलशंकरांनी १८४५ मध्ये गृहत्याग केला, तो कायमचाच.

मूलशंकर संन्याशांच्या समूहात दाखल झाले. तेथे ब्रह्मचर्याची दीक्षा घेऊन त्यांनी शुद्ध चैतन्य हे नाव धारण केले. यानंतर त्यांनी सु. पंधरा वर्षे हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत पर्यटन केले. अनेक संन्याशांची, ज्ञानी पुरुषांची त्यांनी भेट घेतली तसेच अनेक शास्त्रांचे सखोल ज्ञान संपादन केले आणि ते त्यांनी तपासूनही पाहिले. तांत्रिक आचार, कर्मकांड, मूर्तिपूजा, अज्ञानमूलक धर्माचरण, अंधश्रद्धा इ. अनेक गोष्टींचे त्यांनी बारकाईने अवलोकन केले. पूर्णानंद नावाच्या स्वामींपासून त्यांनी संन्यास धर्माची दीक्षा घेतली व दयानंद सरस्वती हे नाव धारण केले. १८६० साली मथुरेस अत्यंत चिकित्सक व ज्ञानी असलेल्या स्वामीविरजानंद या अंध गुरूकडे ते आले. विरदानंदांजवळ ते तीन वर्षे राहिले. याच काळात त्यांच्या धार्मिक व सामाजिक सुधारणेच्या विचारांचा पाया विरजानंदांशी विचारविनिमय होऊन घातला गेला व पुढील अनेकविध सुधारकीय कार्याची मुहूर्तमेढ रोवली गेली.

यानंतर दयानंदांनी पुन्हा भारतभर परिभ्रमण केले. यावेळी त्यांनी मूर्तिपूजा, रूढिप्रियता, जन्मत: जातिभेद, हिंसात्मक यज्ञ इ. गोष्टींवर टीका करणारी अनेक व्याख्याने दिली. दयानंद हे केवळ संहिता ग्रंथांनाच वेद मानत. कारण त्यांत जन्मसिद्ध जातिभेदास आधार नाही. वेदांचा आधार घेऊन त्यांनी नवे विचार मांडण्यास सुरुवात केली. अस्खलित संस्कृतात शास्त्री पंडितांबरोबर त्यांनी वादविवाद केले. १८६९ साली काशीला पंडितांबरोबर शास्त्रार्थ केला. दयानंदांचा उदात्त हेतू लक्षात न घेता पंडितांनी केवळ शब्दप्रामाण्याच्या आधारावर त्यांना उत्तरे दिली. यानंतर दयानंदांनी प्रयाग, कलकत्ता, मुंबई, पुणे इ. ठिकाणी व्याख्याने देऊन आपले नवे धर्मसुधारणेचे विचार प्रभावीपणे मांडले. त्यामुळे केशवचंद्र सेन, लोकहितवादी, न्या. रानडे यांसारख्यांनी त्यांची स्तुती केली. आपल्या विचारांना मूर्तस्वरूप देण्यासाठी १८७५ साली मुंबई येथे त्यांनी आर्यसमाजाची स्थापना केली. आपल्या वैदिक धर्मविचारांचा प्रचार करण्यासाठी त्यांनी उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, बिहार, मध्य प्रदेश इ. प्रांतात दौरे केले व हिंदीभाषेत व्याख्याने देऊन धर्मजागृती केली.

आर्यसमाजाच्या प्रचारासाठी त्यांनी ग्रंथलेखनास प्रारंभ केला. दयानंद हे कट्टर वेदनिष्ठ होते. त्यांनी यजुर्वेद व ऋग्वेद यांवर संस्कृतात भाष्ये लिहिली. ऋग्वेदाच्या काही भागावर भाष्यही केले. पण त्यांचा सर्वात महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे सत्यार्थप्रकाश हाच होय. यात त्यांनी वेदांतील ज्ञानभांडार हिंदी भाषेतून लोकांसमोर मांडले. सत्यार्थप्रकाश हा आर्यसमाजाचा प्रमाणग्रंथ समजला जाऊ लागला. दयानंदांनी याशीवाय संस्कारविधि, पंचमहायज्ञविधि, गोकरुणानिधि इ. ग्रंथ लिहून आपले विचार जनतेसमोर मांडले. त्यांत त्यांनी शुद्ध वैदिक धर्माचे स्वरूप स्पष्ट केले, पाखंडी मतांचे खंडन केले, रूढीव भ्रममूलक कल्पनांचा निषेध केला, मूर्तिपूजेचा धिक्कार केला, स्त्रियांना व शूद्रांना वेदाध्ययनाचा अधिकार आहे हे सिद्ध केले, स्त्रीशिक्षणास प्रोत्साहन दिले, जातिभेदावर टीका केली व ख्रिस्ती, इस्लाम, यहुदी इ. धर्मातील दोष उघड करून दाखविले.

दयानंदांच्या धर्मविचारांनी प्रभावित झालेले ‘थिऑसॉफिकल सोसायटी’चे संस्थापक ऑलकट यांनी १८७९ मध्ये दयानंदांची सहारनपूर येथे भेट घेतली व एकत्र कार्य करण्याची योजना ठरली. थिऑसॉफिकल सोसायटीच्या श्रीमती ब्लाव्हॅट्स्की यांनीही दयानंदांसंबंधी प्रशंसोद्गार काढले. तथापि या दोन संस्थांचे एकीकरण होऊ शकले नाही. ब्राह्मोसमाज, प्रार्थना समाज यांतीलही कार्यकर्ते दयानंदांकडे आकृष्ट झाले पण तेही समाज आर्यसमाजात मिसळू शकले नाहीत. दयानंदांनी आपल्या आर्यसमाजाचे संघटन अत्यंत चिकाटीने व प्रभावीपणे केले. आर्यसमाजातर्फे त्यांनी वैदिक पाठशाळा काढल्या. फिरोजपूर येथे अनाथाश्रम उघडला. ठिकठिकाणी आर्यसमाजाच्या शाखा त्यांनी उघडल्या. जाती-पंथ-भाषा इ. कोणतेही भेद लक्षात न घेता कोणालाही आर्यसमाजाचे सदस्य होता येत असे. आर्यसमाजाच्या सदस्यांसाठी नियम तयार केले गेले. दर रविवारी सर्व सदस्यांनी एकत्र येऊन वेदाध्ययन केले पाहिजे. प्रत्येकाने रोज संध्या, होम, गायत्री जप व वेदपाठ या गोष्ठी आवश्यक केल्या पाहिजेत. या गोष्टी करण्यास पुरोहिताची आवश्यकता नसते. ब्रह्मचर्य, सत्य, भक्ती, तप इ. प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजेत. सर्व सत्यांचे मूळ परमेश्वर आहे, वेद हा सत्यमूलक ग्रंथ आहे, सत्याचा विचार करूनच धर्माचरण केले पाहिजे, सर्वाच्या उन्नतीसाठी झटले पाहिजे इ. विचार लक्षात घेऊन प्रत्येक आर्यसमाजी सदस्याने वागले पाहिजे असे दयानंदांनी म्हटले आहे.

दयानंद हे स्वत: शरीराने, मनाने व वाणीने दणकट होते. अत्यंत विरुद्ध वातावरणात आपली मते मांडण्यात ते कधीही माघार घेत नसत. काशीत जाऊन ‘मूर्तिपूजा सिद्ध करा, नाहीतर विश्वेश्वरांची मूर्ती फोडून टाका’ असे म्हणून ते वादास उभे राहिले. अनेक संकटे आली तरी त्यांनी ती तेजस्वीपणे स्वीकारली व त्यांवर मात केली. ख्रिस्ती, इस्लाम धर्माच्या पंडितांशी वाद घालून त्यांनी त्यांना नामोहरम केले. परधर्मात जाऊ पाहणा-या हिंदूना वैदिक धर्म पटवून दिला. परधर्मात गेलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेतले. वैदिक धर्माला त्यांनी पुन्हा तेजस्वी बनविले. शाहपूरचे महाराज नहरसिंग, जोधपूरचे महाराज जसवंतसिंग यांसारख्या अनेक राजेरजवाडय़ांना त्यांनी आर्यसमाजाची दीक्षा दिली. सहस्रवधी लोकांना समाजाच्या कार्याकडे प्रवृत्त केले. आर्यसमाजाचा परदेशातही प्रचार व्हावा, भारतातील अनाथ व गरीब लोकांस विद्या आणि आश्रय मिळावा या हेतूने दयानंदांनी उदेपूर येथे ‘परोपकारिणी सभा’ या नावाची आणखी एक संघटना उभारली.

दयानंद १८८३ साली जोधपूरास आले. तेथील महाराजांची त्यांच्यावर श्रद्धा बसली व ते त्यांचे अनुयायी बनले. तेथे त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आल्याचे सांगतात. विषप्रयोगामुळे दयानंदांची प्रकृती बिघडली व अजमेर येथे ते निधन पावले.

आधुनिक भारताच्या इतिहासात त्यांचे नाव अजरामर झाले. निष्प्रभ वैदिक धर्माला त्यांनी तेजस्वी बनविले. समाजाला समर्थपणे संघटित केले. परधर्मीयांचे आक्रमण परतवून लावले व हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचे स्थान दिले. आधुनिक भारताच्या सामाजिक परिवर्तनात त्यांचा वाटा फार मोठा आहे.

(संदर्भ : मराठी विश्वकोष)

गाणपत्य संप्रदाय

$
0
0

गणपती हे प्रमुख उपास्य दैवत असणा-या हिंदूंच्या एका संप्रदायास ही संज्ञा असून ह्या संप्रदायाच्या अनुयायांना गाणपत्य म्हणतात. हिंदूंच्या पाच प्राचीन प्रमुख संप्रदायांत ह्या संप्रदायाचा अंतर्भाव होतो. इसवी सनाच्या पाचव्या ते नवव्या शतकांच्या दरम्यान केव्हातरी हा संप्रदाय उदयास आला असावा, असे रा. गो. भांडारकरांचे मत आहे. ह्याच कालखंडात रचलेल्या भवभूतीच्या मालतीमाधव नाटकात गणपतीचे स्तवन आहे. सु. चौथ्या शतकातील याज्ञवल्क्यस्मृतीतही महागणपतीची पूजा करण्यास सांगितले आहे. आठव्या व नवव्या शतकांतील काही कोरीव लेखांतही गणपती व गाणपत्यांचे उल्लेख आढळतात. सर्वसाधारणत: याच काळात गाणपत्यांच्या सांप्रदायिक ग्रंथांचीही रचना झाली असावी. त्यांत गणेशपुराण, ब्रह्मवैवर्तपुराणातील गणेशखंड, मुद्गलपुराण, गणपत्युपनिषद, गणेशसंहिता, गणेशगीता, गणेशकल्प, गणपतिरहस्य, गणेशसहस्र्नाम, गणेशमाहात्म्य इत्यादींचा अंतर्भाव होतो.

गाणपत्य संप्रदायातील सहा भेद किंवा उपसंप्रदाय आनंदगिरीने आपल्या शंकरदिग्विजयामध्ये तसेच धनपतीने माधवाचार्याच्या शंकरदिग्विजयावरील भाष्यात नमूद केले आहेत. ते असे : (१) महागणपती, (२) हरिद्रागणपती, (३) उच्छिष्टगणपती, (४) नवनीतगणपती, (५) स्वर्णगणपती आणि (६) संतानगणपती आनंदगिरीने शेवटच्या तीन भेदांची नवनीत, स्वर्ण आणि संतानगणपती अशी जी नावे दिली आहेत, त्यांचे अनुक्रमे ऊध्र्व, पिंगल आणि लक्ष्मीगणपती असेही प्राचीन पर्याय आहेत तथापि आनंदगिरीने दिलेली नावेच विशेष रूढ आहेत. यातील काही गणपतिनामांचा संबंध ज्या द्रव्यांपासून गणपतीची मूर्ती बनवीत असत, त्या द्रव्यांशी असावा असे दिसते. उदा., हळद-हरिद्रा, लोणी-नवनीत, सुवर्ण-स्वर्ण.

गाणपत्य संप्रदायात गुप्त व प्रगट अशा दोन्हीही प्रकारे उपासना होत असे. संप्रदायात गणपती हा शिवाचा प्रतिस्पर्धी आणि इतर सर्व देवांहून श्रेष्ठ मानला जातो. संकटसमयी इतर देवही त्याचे साहाय्य घेऊ लागल्याच्या कथा सांप्रदायिक ग्रंथांत आहेत. सर्वश्रेष्ठ देवता म्हणून गणपतीच्या उपासनेची ही नवी लाट निर्माण होताच, संप्रदायातील सहा भेदांचे पुनरुज्जीवन झाले. टी. ए. गोपीनाथ राव आणि एच. डी. भट्टाचार्य यांनी आपल्या हिस्टरी अँड कल्चर ऑफ द इंडियन पीपल (खंड चौथा) या ग्रंथात पुढील पाच उपसंप्रदायांचा अंतर्भाव ‘शक्तिगणपती’ ह्या वर्गात केला असून, त्यांचे मूर्तिविशेषही प्रमाणभूत प्रतिमाविद्याविषयक ग्रंथांच्या आधारे तपशिलांसह दिले आहेत : (१) उच्छिष्टगणपती : लालवर्ण, चतुर्भुज. (२) महागणपती : रक्तवर्ण, दशभुज. (३) ऊध्र्वगणपती : सुवर्णपीतवर्ण, षड्भुज. (४) पिंगलगणपती : पिंगटवर्ण, षड्भुज. (५) लक्ष्मीगणपती : शुभ्रवर्ण, चतुर्भुज वा अष्टभुज. प्रतिमाविद्याविषयक विविध ग्रंथांत ह्या पाचही मूर्तीच्या तपशिलांबाबत थोडीफार तफावत आढळते. तथापि ह्या मूर्ती शक्तिदेवीसमवेत असल्याबाबत मात्र सर्वातच एकवाक्यता आढळते. यांव्यतिरिक्त हरिद्रागणपती नावाने ओळखला जाणारा (पीतवर्ण, चतुर्भुज) सहावा भेद असून त्यात गणपती हा सर्वश्रेष्ठ देव म्हणून उपास्य होता. या उपसंप्रदायाचे अनुयायी गणपतीचे मुख व एक दंत आपल्या दोन्ही दंडांवर गोंदवून घेत.

शिवापासून गूढ स्वरूपात गणपतीची उत्पत्ती झाली, असे दाखविण्याचे प्रयत्न देवोत्पत्तिशास्त्राच्या (थिऑगॉनी) सैद्धांतिक पातळीवर झाले, तर तंत्रमार्गात गणपतीची उत्पत्ती विविध फलप्राप्तीच्या यंत्रापासून आणि मंत्रापासून झाल्याचे म्हटले आहे. गणपतीच्या शक्तीची मूर्ती ‘श्री-अंगिनी’ ह्या नावाने संबोधिली जाते. त्याच्या उभ्या, बसलेल्या, नृत्यावस्थेतील तसेच एकमुखी ते पंचमुखी, द्विभुज ते दशभुज, द्विनेत्र वा त्रिनेत्र व शक्तिसमवेत आणि गणपरिवारासमवेत अशा विविध प्रकारच्या मूर्ती भारतात सापडल्या आहेत. जैन व बौद्ध धर्मात तसेच भारताबाहेरही पूर्वेकडील देशांत त्याची उपासना होत होती व तेथेही त्याच्या मूर्ती सापडल्या आहेत. रामपाल (डाक्का) येथील अवशेषांत सापडलेल्या एका मूर्तीच्या वरच्या बाजूस ज्या सहा गणपतींच्या लहान-लहान मूर्ती कोरलेल्या आहेत, त्या गाणपत्यातील वरील सहा उपसंप्रदायांच्या असाव्यात, असे मानले जाते.

गाणपत्यातील सहाही भेदांत उपास्य देवतेचे रूप, नाम, उपासनेचे शब्द व मंत्र तसेच अनुयायांना द्यावयाचा उपदेश यांबाबत भिन्नता आढळते. तथापि गणपती हाच सर्व देवांचे आणि सृष्टीचे आदिकारण आहे, शिव नव्हे तसेच तो अनादी-अनंत असून त्याच्या मायेनेच ब्रह्मादी सर्व देव व हे विश्व निर्माण झाले आहे, याबाबत मात्र ह्या सर्वाचेच एकमत आहे. डब्ल्यू. वॉर्ड यांच्या मते बंगालमधील ज्या हिंदूंनी गणपतीची ‘विघ्नकर्ता’ अशा रूपाऐवजी ‘विघ्नहर्ता’ अशा रूपात उपासना केली, तेच गाणपत्य म्हणून स्वतंत्र संप्रदायाने ओळखले जाऊ लागले.

उच्छिष्टगणपती ह्या संप्रदायभेदाचा विशेष म्हणजे त्यात वाममार्गी उपासनापद्धतीचा अवलंब केला जातो आणि देवी ही शिवाऐवजी गणेशाची शक्ती मानली जाते. ह्या भेदातील उपास्य गणपतीचे नाव हेरंब आहे. सर्वच कर्मकांड, जातिभेद आणि विवाहाची बंधने ह्या उपसंप्रदायास मान्य नाहीत. त्यांच्या मते स्त्री-पुरुषातील मुक्त व स्वैरसंभोग हाच उपासनेचा सर्वोत्तम प्रकार असून, पुरुष उपासक हे हेरंबरूपच होत. एच. टी. कोलब्रुकच्या मते ह्या संप्रदायाचे उपासक आपल्या कपाळावर शेंदराचा लाल टिळा लावतात, तसेच तोंडात तोबरा भरून उष्टय़ा तोंडाने अपल्या उपास्य देवतेची प्रार्थना करतात. यावरूनच ह्या भेदास ‘उच्छिष्टगणपती’ असे नाव पडले असावे. आज गाणपत्य संप्रदाय इतर काही वैष्णव व शैव पंथांप्रमाणेच फारसा प्रचारात असल्याचे दिसत नाही. सांप्रदायिक स्वरूपात नसली, तरी वैयक्तिक देवतास्वरूपात मात्र गणपतीची उपासना सर्व हिंदूंमध्ये भारतभर आजही प्रचलित आहे. विशेषत: दक्षिण भारतात व महाराष्ट्रात गणपतीची उपासना विशेष प्रमाणात केली जाते. गणपती हा मूळचा अनार्य द्रविड लोकांचा देव असावा व नंतर आर्यानी त्याला आपल्या दैवतसमूहात समाविष्ट करून घेतले असावे, असे काही विद्वान मानतात. केरळमध्ये गणपतीची अनेक स्थाने व मंदिरे असून त्यांना होमपुरे म्हणतात आणि तेथे गणपतीला नित्य होमही होतो. महाराष्ट्रातील अष्टविनायकांची स्थाने प्रख्यात आहेत तसेच इतर अनेक ठिकाणीही गणेशमंदिरे आहेत. पुण्याजवळील चिंचवड येथील गणेशस्थानही मोरया गोसावी ह्या गणेशोपासकामुळे विशेष प्रसिद्ध आहे. सांप्रदायिक ग्रंथांतून ऋग्वेदातींल सूक्ताचा एकद्रष्टा ऋषी गृत्समद हा आद्य गाणपत्य मानला जातो. तसेच मुद्गल, भृशुंडी, वरेण्य, गणेशयोगी हे महागाणपत्य मानले जातात.

श्रीपाद श्रीवल्लभ

$
0
0

दत्तात्रेयांचे पहिले अवतार मानले जाणारे महापुरुष. त्यांचा काळ १३२० ते १३५० असा असावा. ‘गुरुचरित्रा’च्या पाच ते दहा अध्यायांत त्यांची जीवनकथा सांगितलेली आहे. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील पीठापुरम् येथे झाला. पीठापुरी, पिष्टपुरम् अशी या ठिकाणाची नावे प्राचीन शिलालेखांत आढळतात.

श्रीपाद श्रीवल्लभांच्या वडिलांचे नाव आपळराज, आईचे सुमता. आपळराज हे आपस्तंबशाखीय ब्राह्मण होते. श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्माविषयी असे सांगतात की, एका अमावास्येला त्यांच्या घरी श्राद्धविधी असताना ब्राह्मणभोजनापूर्वी एक अवधूत दारात आला. सुमता ही आतिथ्यधर्म भक्तिभावाने पाळणारी असल्यामुळे तिने त्याला भिक्षा घातली. त्यामुळे संतुष्ट झालेल्या त्या अवधुताने सुमतेला तिच्या मनात जी इच्छा असेल, ती तिने सांगावी, ती सफल होईल असे म्हटले. सुमतेला झालेल्या पुत्रांपैकी अनेक मरण पावले होते आणि जे जगले होते, ते ‘अक्षहीन, पादहीन’ म्हणजे आंधळे, पांगळे होते. त्यामुळे तिने तिला ज्ञानवंत व जगद्वंदय असा पुत्र मिळावा, अशी इच्छा व्यक्त केली. त्यावर तापसी, वंशाचा उद्धार करणारा, कलियुगात ख्यातिवंत होणारा, दैन्यहारक आणि ‘ज्ञानमार्गे अतुर्बळी’ असा पुत्र तुझ्या पोटी जन्माला येईल, असा आशीर्वाद देऊन तो अवधूत अदृश्य झाला.

या आशीर्वादानुसार सुमतेला पुत्र झाला. त्याचे नाव श्रीपाद असे ठेवण्यात आले. वयाच्या सातव्या वर्षापर्यंत त्यांचे वेदाध्ययन पूर्ण झाले होते. तत्कालीन परंपरेनुसार सोळाव्या वर्षी त्यांच्या लग्नाचा विचार सुरू झाला; पण विवाहबंधनात अडकण्यास नकार देऊन ते उत्तरयात्रेस निघाले. तत्पूर्वी, आपल्या दोन अपंग बंधूंना आपल्या अमृतदृष्टीने त्यांनी अव्यंग आणि प्रज्ञावंत करून आपल्या आई-वडिलांना त्यांच्या वृद्धापकाळी आधार मिळावा, अशी व्यवस्था केली.

पीठापूर सोडल्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभांनी जगन्नाथपुरी, काशी आणि बद्रीकेदार या तीर्थस्थानांना भेटी दिल्या. त्यानंतर ते दक्षिणेत गोकर्ण महाबळेश्वरी आले आणि तेथे गुप्तपणे तीन वर्षे राहिले. त्यानंतर ते श्रीशैलम् येथे चार महिने राहिल्यावर निवृत्तिसंगमावर कृष्णाकाठी असलेल्या कुरवपूर या गावी आले.

कुरवपूर येथे दोन घटना घडल्याचे गुरुचरित्रकार सांगतात. त्यांपैकी पहिली एका वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मणाची अंबिकानामक विधवा पत्नी आणि तिचा मूढ मुलगा यांची. या मुलाच्या मूढपणामुळे त्या स्त्रीला समाजात फार मानहानी सहन करावी लागत होती. त्यामुळे त्या मायलेकरांनी कृष्णेच्या प्रवाहात उडी मारून जीव देण्याचे ठरविले. त्या तयारीत असतानाच त्यांना श्रीपाद श्रीवल्लभ कृष्णेत स्नान करताना दिसले. त्यांना नमस्कार करून आत्महत्येच्या दोषातून मुक्त होण्यासाठी तिने त्यांचा आशीर्वाद मागितला. श्रीपाद श्रीवल्लभांनी तिला शनिप्रदोषवताचे माहात्म्य सांगून ते व्रत आचरल्यास तिच्या मनातील इच्छा पूर्ण होतील, असे सांगितले.

अंबिकेच्या दोन इच्छा होत्या. एक – या जन्मी आपल्याला झालेला मूढ पुत्र ज्ञानसंपन्न व्हावा आणि पुढील जन्मी श्रीपाद श्रीवल्लभांसारखाच जगत्रयाला पूज्य असा पुत्र व्हावा. श्रीपाद श्रीवल्लभांनी तिच्या दोन्ही इच्छा पूर्ण केल्या. ही अंबिका म्हणजेच लाडकारंजाची अंबाभवानी असून तिला उत्तरजन्मी झालेला पुत्र म्हणजेच दत्तात्रेयांचे दुसरे अवतार आणि श्रीपाद श्रीवल्लभांचे उत्तरावतार नरसिंहसरस्वती हे होत, अशी गुरुचरित्र कारांची श्रद्धा आहे.

दुसरी घटना अशी, श्रीपाद श्रीवल्ल्भ कुरवपूर येथे कृष्णेत स्नान करावयास जात, तेव्हा तेथे कपडे धुणारा एक धोबी त्यांना नेहमी वंदन करीत असे. त्याने एकदा एका म्लेंच्छ राजाला आपल्या परिवारासह नदीत नौकाविहार करताना पाहिले. या राजासारखे वैभव आपल्याला मिळावे, अशी इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. ती जाणून श्रीपाद श्रीवल्लभ त्याला म्हणाले, तुला असे राजवैभव मिळेल व पुढल्या जन्मी म्लेंच्छ होऊन तू ते भोगशील. पण वैभव मिळाले तरी, गुरूंचा वियोग होईल, या जाणिवेने त्या धोब्याला वाईट वाटले. त्यावर श्रीपादगुरूंनी त्याला आश्वासन दिले, की नरसिंहसरस्वती या नावाने आम्ही तुला भेटू. त्याप्रमाणे पुढील जन्मी हा धोबी बीदरचा मुसलमान बादशहा झाला आणि नरसिंहसरस्वतींचा तो उपासक बनला.

श्रीपाद श्रीवल्लभांनी संन्यास घेतलेला नव्हता, पण ते अवधूतवेषाने राहत असावेत. कुरवपूर येथेच त्यांनी निजानंदी गमन केले. आश्विन वद्य १२, मघा नक्षत्र, सिंहराशी). ही गुरुद्वादशी श्रद्धेने पाळली जाते.


भक्तिमार्ग

$
0
0

व्यक्ती ज्या भावनेच्या योगाने ईश्वराला सर्वथा शरण जाते, ती भावना म्हणजे भक्ती होय. ईश्वराविषयीचे आत्यंतिक व अनन्य प्रेम म्हणजे ईश्वराची भक्ती, असेही म्हणता येईल. ईश्वराचा अनुग्रह करून देण्याचे सामर्थ्य असलेली आचारपद्धती म्हणजे ईश्वरप्राप्तीचा मार्ग होय. वेगवेगळ्या तत्त्वचिंतकांनी ईश्वराचा अनुग्रह मिळविण्याचे जे मार्ग सांगितले आहेत, त्यापैकी ईश्वरभक्ती हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. ईश्वराच्या अस्तित्वाविषयीची व्यक्तीच्या मनातील श्रद्धा, सेवाभाव, समर्पणवृत्ती, भीती, ईश्वराचा अनुग्रह वा साक्षात्कार मिळविण्याची उत्कट इच्छा इत्यादींमधून व्यक्तीच्या मनात भक्तीची भावना स्फुरते. ईश्वर हा सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सुर्वगुणसंपन्न, सृष्टीचा निर्माता आणि आपला उद्धारकर्ता आहे, हा विश्वासच या भावनेच्या निर्मितीला कारणीभूत होतो. या व्यापक अर्थाने जगातील सर्व समाजांतून भक्तिभावना आढळते.

भारतात भक्तीचा विशिष्ट संप्रदाय असून त्याची स्वत:ची अशी काही खास वैशिष्टय़े आहेत. या संप्रदायालाच ‘भक्तिमार्ग’ असे म्हणतात. विविध देवता, माता, पिता, गुरू इत्यादी विषयीच्या आदरभावालाही लक्षणेने भक्ती असे म्हटले. जाते. भक्ती हा शब्द ‘भज्’ (सेवा करणे) या संस्कृत धातूपांसून बनला आहे. भक्त, भगवान, भागवत इत्यादी शब्द त्याच धातूपासून बनले असून अर्थदृष्टय़ा ते ‘भक्ती’ या शब्दाशी संबद्ध आहेत.

भक्तीचा उगम :
तसे पाहावयास गेले, तर जगातील सर्व मानवसमूह फार प्राचीन काळापासूनच कोणत्या ना कोणत्या अतिमानवी शक्तीची भक्ती करीत आले आहेत. परंतु अनेक पाश्चात्त्य विद्वान मात्र जगातील भक्तीचा पहिला आविष्कार ख्रिस्ती धर्मातच झाला, असे मानतात. भारतीय लोकांनी भक्तीची संकल्पना ख्रिस्ती धर्मातूनच घेतली, असेही त्याचे मत आहे; परंतु भारतीय विद्वानांनी हे मत नाकारले आहे. काही विद्वानांनी भारतीय भक्तिसंप्रदायावर इस्लामचा प्रभाव असल्याचे मतही व्यक्त केले आहे; परंतु इतर अनेक जणांच्या मते भारतातील भक्तीचा उगम हा स्वतंत्रपणे भारतीय भूमीतच झाला आहे. वेदसंहितांमध्ये भक्तीची संकल्पना होती की नाही, याबाबतीतही विद्वानांत मतभेद आढळतात. वेदसंहिता व ब्राह्मणग्रंथ यांमध्ये ‘भक्ती’ हा शब्द आढळत नाही. हा शब्द पहिल्यांदा श्वेताश्वतर उपनिषदात आढळतो; परंतु आचार्य बलदेव उपाध्यांच्या मते एखाद्या कालखंडात नसला, तरी त्या शब्दातून व्यक्त होणारी संकल्पना मात्र अस्तित्वात असू शकते. काही पाश्चात्त्य पंडितांच्या मते ऋग्वेदातील वरुणसुक्तांतून भक्ती ही भीतीवर आधारलेली आढळते.

भक्ती ही मूळची वैदिक परंपरेतून आलेली नसून ती अवैदिक आहे, असेही एक मत आढळते. भक्तीचा उगम द्रविड देशात झाला, हे भागवत पुराणातील विधान भक्तीच्या अवैदिकतेचे सूचक आहे. तामिळनाडूमधील आळवारनामक वैष्णव संतांनी (इ. स. सु. ५००-८५०) भारतातील भक्तिपंथांचा प्रारंभ केला आणि त्यानंतर या पंथाचा भारतभर प्रसार झाला, असे काही विद्वानांचे मत आहे. आळवाराचा प्रबंधम् नावाचा ग्रंथच भक्तिपंथाचा मूलस्रेत आहे, असे ते मानतात.

महाभारतामध्ये भक्तीची परंपरा पुढीलप्रमाणे सांगितली आहे : जगाच्या प्रारंभी ब्रह्मदेवाने दक्ष प्रजापतीला भक्तीचा उपदेश केला आणि त्यानंतर आदित्य, विवस्वान्, मनू व इक्ष्वाकू या क्रमाने प्राप्त झालेली भक्ती सर्व लोकांमध्ये पसरली.

विविध धर्मातील भक्तीचे स्थान
विविध समाजातून व देशांतून वेगवेगळया स्वरूपात भक्तिभावनेचा आविष्कार झाल्याने आढळून येते. यहुदी वा ज्यू धर्मामध्ये भक्तीच्या काही प्रभावी चळचळी होऊन गेल्या आहेत. ख्रिस्ती धर्म हा भक्तिप्रधानच आहे. इस्लाममध्ये ईश्वराविषयी आत्यंतिक श्रद्धा बाळगली जाते व या दृष्टीने इस्लाममध्येही भक्तीचे माहात्म्य असल्याचे दिसून येते. जैन व बौद्ध हे धर्म निरीश्वरवादी असले, तरी त्या धर्मामध्ये अनुक्रमे र्तीथकर व बुद्ध यांच्याविषयी असलेला पूज्यभाव भक्तीच्या स्वरूपाचाच असतो.

भक्तीचा आविष्कार विविध स्वरूपांत हिंदू धर्मात झाला आहे. वेद व उपनिषदे यांमध्ये भक्तीचे स्वरूप अस्पष्ट होते. पाणिनीच्या (इ. स. पू. सु. ४थे शतक) सूत्रांवरून असे दिसते, की त्याच्यापूर्वीच वासुदेवभक्ती रूढ झाली होती. कृष्णाच्या अवतारापूर्वी भक्तीला ऐकांतिक, नारायणी, पांचरात्र, सात्वत इत्यादी नावे होती. कृष्णानंतर भक्तीला भागवत धर्माचे स्वरूप प्राप्त झाले. प्राचीन काळातील सनक, नारद, प्रल्हाद इत्यादींची नावे भक्त म्हणून विख्यात आहेत.

दक्षिण भारतातील आळवारांनी वैष्णव भक्तीचा संप्रदाय निर्माण केला. दक्षिणेतच नायन्मार नावाचे त्रेसष्ट तमिळ संत शैव भक्त म्हणून विख्यात झाले (इ. स. सु. ५व्या शतकानंतर). भगवद्गीता व भागवत पुराण या ग्रंथानी भारतातील भक्तिमार्गाला असाधारण प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. रामानुजाचार्य, मध्वाचार्य, वल्लभाचार्य व निवार्क या वेदान्ती आचार्यानी मोक्षप्राप्तीचे साधन म्हणून भक्तीचे माहात्म्य प्रस्थापित केले. रामानुजांच्या परंपरेतील स्वामी रामानंद यांनी उत्तर आणि मध्य भारतात रामभक्तीचे एक अत्यंत प्रभावी आंदोलन निर्माण केले. तुलसीदास हे महान रामभक्त होऊन गेले. चैतन्य संप्रदायाने भक्तीला साधन न मानता पाचवा पुरुषार्थ म्हणजेच सर्वश्रेष्ठ साध्य मानले, कबिरांनी निर्गुण भक्तीचा पुरस्कार केला. सुरदास, मीराबाई इत्यादी असंख्य भक्तांनी भक्तिमार्गामध्ये आपले महान योगदान दिले.

महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाने वैष्णव भक्तीचा प्रचंड प्रभाव निर्माण केला. ज्ञानेश्वर, नामदेव, जनाबाई, एकनाथ, तुकाराम, रामदास इत्यादी विख्यात संत महाराष्ट्रातच होऊन गेले. शिव, विष्णू, गणपती, दत्तात्रेय, काली, सूर्य इत्यादी विविध देवदेवता व त्यांचे अवतार यांची भक्ती करणारे अनेक संप्रदाय भारतात होऊन गेले असून त्यांचा समाजजीवनावर मोठा प्रभाव पडलेला आहे. (माध्व संप्रदाय, वैष्णव संप्रदाय, शैव संप्रदाय).

भक्तीचे कर्मकांड :
भक्तिमार्गामध्ये श्रद्धेला व भावनेला अधिक महत्त्व असल्यामुळे कर्मकांडाचे स्थान तत्त्वत: गौण असते. किंबहुना भक्तिमार्गामध्ये काटेकोर कर्मकांडाविरुद्ध एक प्रकारची बंडखोरीच आढळून येते. तत्त्वत: असे असले, तरी प्रत्यक्षात श्रद्धेचा आविष्कार होण्यासाठी कोणत्या ना कोणत्या कर्मकांडाची गरज भासतेच. त्यामुळे भक्तीचेही विशिष्ट असे एक कर्मकांड आढळून येते. पूजा, प्रार्थना, तीर्थयात्रा, तीर्थ व प्रसाद यांचे सेवन, नामस्मरण, भजन-कीर्तन, चिंतन-मनन इत्यादींचा या कर्मकांडात अंतर्भाव होतो.

हिंदू भक्त ईश्वरी अवतार व मूर्तिपूजा यांना विशेष महत्त्व देतात. भक्तिमार्गामध्ये गुरूचे माहात्म्य विशेष असून त्याच्या उपदेशानुसार त्याचे अनुयायी आपला आचार ठेवतात. साधुसंत व भक्त यांच्याविषयाही विशेष आदरभाव व्यक्त केला जातो आणि त्यांच्या सहवासाची अपेक्षा केली जाते.

मोक्षाचा मार्ग :
भारतात स्थूलमानाने मोक्षप्राप्तीचे ज्ञान, कर्म व भक्ती असे तीन मार्ग मानले जातात. योग हा स्वतंत्र मार्ग मानणारे लोकही आहेत. या विविध मार्गापैकी कोणत्या मार्गाला किती महत्त्व द्यावयाचे, याबाबतीत आणि हे मार्ग एकमेकांना पूरक, पर्यायी की बाधक आहेत, याबाबतीत विविध संप्रदाय, भक्त इत्यादींमध्ये मतभेद आहेत. भक्तिमार्गी संतांच्या मते भक्ती हाच यापैकी सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. याउलट, भक्ती हे मोक्षाचे साधन नसून ती मोक्षापेक्षाही श्रेष्ठ असा पाचवा पुरुषार्थ म्हणजेच साध्य आहे, असे मानणारे भक्तही आहेत.

भक्तीचे प्रकार :
भक्तीचे वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून वेगवेगळे प्रकार मानण्यात आले आहेत. सगुण भक्ती व निर्गुण भक्ती असे दोन प्रमुख प्रकार होतात. शांत, दास्य, सख्य, वात्सल्य व माधुर्य असे पाच प्रकारही मानण्यात आले आहेत. मनात काहीतरी हेतू बाळगून केली जाणारी ती हैतुकी भक्ती आणि निहेर्तुकपणे केली जाणारी ती अहैतुकी भक्ती होय. हैतुकी ही ‘गौणी’ व अहैतुकी ही ‘मुख्या’ वा ‘परा’ भक्ती मानली जाते. यापैकी हैतुकीचे सात्त्विकी, राजसी व तामसी असे तीन पोटप्रकारही सांगण्यात आले आहेत.

शास्त्रांना अनुसरून केली जाणारी व गौण असलेली वैघी भक्ती आणि ईश्वरावरील नितान्त प्रेम दर्शविणारी व प्रमुख असलेली रागात्मिका भक्ती, असेही दोन प्रकार आहेत. गौणी भक्ती करणा-या भक्ताचे आर्त, जिज्ञासू आणि अर्थार्था असे तीन प्रकार पाडण्यात आले आहेत. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य व आत्मनिवेदन हे भागवतपुराणाने सांगितलेले भक्तीचे नऊ प्रकार आहेत. या प्रकारांची संख्या नऊ असल्यामुळेच या भक्तीला ‘नवविधा’ भक्ती असे नाव रूढ झाले आहे. नारदाने गुणमाहात्म्य, रूप, पूजा, स्मरण, दास्य, सख्य, कांताभाव, वात्सल्य, आत्मनिवेदन, तन्मयता व परमविरह अशा अकरा आसक्तींमध्ये भक्तीचे वर्गीकरण केले आहे.

ईश्वर व भक्त यांचे नाते :
ईश्वर व भक्त यांच्या नात्याविषयी विविध धर्म, संप्रदाय व भक्त यांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. ईश्वर हा स्वामी, पिता, माता, बंधू, गुरू, सखा, आत्मा इत्यादी विविध नात्यांनी निर्दिष्ट करण्यात आला आहे. खरे म्हणजे, याबाबतीत नाती दर्शविणारे लिंगवाचक शब्द हे लाक्षणिक असतात. ईश्वर परमप्रेमास्पद आहे, हेच या शब्दांतून सूचित करावयाचे असते. म्हणूनच ज्ञानेश्वरांनी वेगवेगळ्या संदर्भात ईश्वराबरोबर भक्ताची वेगवेगळी नाती मानली आहेत. ईश्वर हा सर्व आणि सर्वस्व आहे. इतर संतांनीही अशीच विविध नाती मानल्याचे आढळते.

इस्लाम धर्मात ईश्वर हा स्वामी व भक्त हा त्याचा दास, असे मानले आहे. ख्रिस्ती धर्मात ईश्वराला पिता मानले आहे. ईश्वराला आई मानणारे अनेक संत, विशेषत: महाराष्ट्रात, होऊन गेले. काही शाक्त पंथीय उपासकांनी स्वत:ला आई व देवाला पुत्र मानल्याचेही सांगितले जाते. मधुराभक्तिनामक भक्तीच्या विख्यात प्रकारात ईश्वराला पती वा प्रियकर आणि स्वत:ला पत्नी वा प्रेयसी मानले जाते. स्वत: स्त्री असलेल्या मीराबाईसारख्या भक्तांनी तर, हे नाते मानले आहेच; परंतु चैतन्य महाप्रभू, गुलाबराव महाराज इत्यादी पुरुषभक्तांनीही स्वत:ला ईश्वराची प्रियतमा मानले आहे. सूफी पंथाच्या भक्तांनी ईश्वराला प्रेयसी आणि स्वत:ला प्रियकर मानून ईश्वरभक्ती केल्याचे आढळते. अर्जुन, सुदामा इत्यादी भक्त हे ईश्वराला सखा मानणारे होते.

नवे वर्ष

$
0
0

नेहमीच्या व्यवहारांत वापरात असलेले ग्रेगरियन कॅलेंडरचे वर्ष हे सांपातिक वर्षच असून त्याचा कालावधी ३६५ दिवस, ५ तास, ४९ मिनिटे व १२ सेकंद म्हणजे ३६५.२४२५ माध्य सौर दिवस एवढा असतो. व्यवहारात त्याचे पूर्ण ३६५ दिवस धरतात. राहिलेला फरक भरून काढण्यासाठी चार वर्षानी येणा-या वर्षाचे ३६६ दिवस धरतात व त्याला लीप वर्ष म्हणतात. यामुळे (ज्यूलियन) कॅलेंडर वर्षाचा सरासरी कालावधी ३६५.२५ दिवसांचा होतो. परिणामी दर साली ११ मिनिटे १४ सेकंद (०.०३१२ दिवस) इतका कालावधी जास्त धरला जातो.

ही कसर वा फरक भरून काढण्याकरिता दर शतकाअखेर येणारे लीप वर्ष हे साध्या वर्षाप्रमाणे ३६५ दिवसांचे आणि प्रत्येक चौथ्या शतकातील शेवटचे वर्ष लीप वर्षाप्रमाणे ३६६ दिवसांचे (लीप शतक) धरतात. उदा. ४०० ने भाग न जाणारे साल (१९०० वा २१००) हे ३६५ दिवसांचे तर ४०० ने भाग जाणारे साल (२०००) ३६६ दिवसांचे मानतात. अशा प्रकारे ४०० कॅलेंडर वर्षे व ४०० सांपातिक वर्षे यांच्यातील तफावत तीन तासांपेक्षा कमी राहते आणि कित्येक हजारो वर्षाच्या बाबतीत ही तफावत १ दिवसापर्यंतच राहील.

दिवस : पृथ्वीला, स्वत:भोवती एक फेरी पूर्ण करण्यास लागणारा कालावधी. म्हणजे सूर्याचं उगवणे व मावळणे यातील नियमितपणा लक्षात आल्याने त्यांचा काळाचे एकक म्हणून माणूस वापर करू लागला. सामान्यत: दिवस २४ तासांत विभागतात.

महिना : दिवसापेक्षा मोठा, पण वर्षाहून कमी कालावधी मोजण्यासाठी दैनंदिन व्यवहारात वापरले जाणारे नैसर्गिक कालमापनाचे परिमाण. सर्वसाधारणपणे हा कालावधी चंद्राच्या गतीवरून ठरविला जात असतो व अशा कालावधीला चांद्रमास म्हणतात. संस्कृत मास व फारसी माह या महिना वाचक शब्दांचा अर्थ चंद्र असा आहे. तसेच इंग्रजीतील मंथ हा महिनावाचक शब्द मून (चंद्र) या शब्दावरूनच आला असून, तो वर्षाचा बारावा भाग दर्शवितो. सौर कालगणनेत मात्र महिन्याला सुलभ असा आविष्कार नाही.

चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास लागणारा काळ म्हणजे महिना, अशी महिन्याची ढोबळ व्याख्या करता येते; तथापि प्रदक्षिणा कशाच्या संदर्भात (एखाद्या स्थिर वा चल बिंदूच्या संदर्भात) केलेली आहे, यावर महिन्याचा कालावधी अवलंबून असतो.

पोप

$
0
0

‘पोप’ हा मूळ ग्रीक शब्द असून, त्याचा ‘वडील’ असा अर्थ आहे. ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्चच्या परंपरेनुसार ‘पोप’ म्हणजे चर्चचा प्रीस्ट वा धर्मगुरू. रोमन कॅथलिक चर्च व अँग्लिकन चर्चमध्ये प्रीस्टला ‘फादर’ म्हणतात. ‘पोप’ म्हणजे, रोमचा बिशप वा जागतिक रोमन कॅथलिक चर्चचा सर्वाधिकारी. अर्थात, ‘पोप’ व ‘फादर’ या दोन्ही संज्ञांचा अर्थ एकच आहे.

चर्चच्या इतिहासात प्रारंभी पोप आणि बिशप या संज्ञा समानार्थी वापरत असत; परंतु १०७६ साली सातव्या ग्रेगरीच्या सूचनेनुसार रोम शहरात भरवण्यात आलेल्या महत्त्वाच्या परिषदेत असे ठरवण्यात आले की, फक्त रोमच्या बिशपलाच ‘पोप’ ही संज्ञा देण्यात येऊन त्यास चर्चचा सर्वोच्च धर्माधिकारी मानण्यात यावे. त्या विचारसरणीनुसार ‘पोप’ हे जागतिक ऐहिक चर्चचे (चर्च युनिव्हर्सल अर्थली) मस्तक असून पर्यायाने येशू ख्रिस्ताचे या जगातील प्रतिनिधी आहेत, असे मानण्यात आले. पापक्षालन करणे. बायबलमधील विधांनाचा अंतिम अर्थ सांगणे, चालू समस्यांच्या बाबतीत देवाची इच्छा मानवाला सांगणे, इत्यादी हक्क पोपला असत.

रोमन कॅथलिक चर्चची रोम ही आध्यात्मिक राजधानी असून, रोममधील व्हॅटिकन सिटीच्या डोंगरावर पोपचे निवासस्थान आहे. म्हणूनच या राजधानीस ‘व्हॅटिकन’ असे नाव दिले आहे.

पोप पद हे सर्वोच्च असून, त्या पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीकडेच ते आमरण राहते. कार्डिनल्सची नियुक्ती पोपच करतो. त्यांची संख्या निश्चित नाही. कार्डिनल्स आपल्यामधून नव्या पोपची निवड चिठ्ठय़ा टाकून करतात. व्हॅटिकनच्या पटांगणात लाखो लोक निकालाची उत्सुकतेने वाट पाहत असतात. एका विशिष्ट धुराडय़ातून काळा धूर निघाल्यास निवड अनिर्णित वा पांढरा धूर निघाला तर निर्णायक झाली, असे समजतात. निवडून आलेला कार्डिनल पोपची वस्त्रे धारण करून एका ठरावीक सज्जात येतो वा लोकांना पहिले ‘पाँटिफिकल’ देतो. त्यात अभिष्टचिंतन व आशीर्वचन असते.

ख्रिस्ती संत

$
0
0

‘संत’ हा शब्द इंग्रजीतील ‘सेंट’ या शब्दाचा मराठी पर्याय म्हणून वापरला आहे. ‘सेंट’ हा इंग्रजी शब्द sanctus (लॅटिन), haegio (ग्रीक) आणि qadosh (हिब्रू) या शब्दांशी संबंधित आहे. हे लॅटिन, ग्रीक व हिब्रू शब्द व्यक्तीप्रमाणेच समुदाय व वस्तू यांनाही विशेषण म्हणून लावले जातात आणि तेव्हा त्यांचा अर्थ ‘परमेश्वरासाठी पवित्र केलेले’ असा होतो. एखाद्या व्यक्तीला उद्देशून हे शब्द वापरल्यास त्या व्यक्तीच्या नैतिक आणि आध्यात्मिक जीवनाच्या उच्च पातळीचे ते द्योतक ठरतात.

ख्रिस्ती संताचे पावित्र्य, याचा अर्थ, येशू ख्रिस्ताच्या द्वारे परमेश्वराच्या सेवेस स्वत:ला वाहून घेणे, असा मानण्यात येतो. येशूच्या बारा शिष्यांपैकी (अपॉसल्स) ज्याने त्याला शेवटी पकडून दिले, त्या जूडसला सोडून, उरलेले अकरा शिष्य हे ख्रिस्ती चर्चचे पहिले संत होत. याशिवाय सेंट पॉल आणि बार्नाबस हे ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर त्याचे अनुयायी झाले. सर्व ख्रिस्ती पंथांत आद्य संत म्हणून या तेरा व्यक्तींना मान दिला जातो.

सेंट पॉलने समकालीन सर्व ख्रिस्ती व्यक्तींना ख्रिस्ताच्या नावाने परमेश्वराच्या व मानवाच्या सेवेला वाहून घेणारे, म्हणून संत असे संबोधिले. यामागे त्याचा उद्देश ख्रिस्ताच्या अनुयायांनी संताला शोभेल असे वागावे, हा होता. अर्थातच आरंभी संत ही संज्ञा समुदायाला उद्देशून वापरण्यास सुरुवात झाली. नंतर ज्या व्यक्तींना येशू ख्रिस्तावरील त्यांच्या विश्वासासाठी छळ सोसावा लागला आणि हौतात्म्य पत्करावे लागले तसेच ज्यांचे चारित्र्य संपूर्णपणे पवित्र असल्याचा अनुयायांना अनुभव आला, अशा व्यक्तींना अनुलक्षूनही बहुधा त्यांच्या मृत्यूनंतर, ख्रिस्ती चर्चने ही संज्ञा त्यांना विधीपूर्वक बहाल करण्यास सुरुवात केली.

येशूचे पवित्र जीवन व विशुद्ध चारित्र्य, त्याचा शांत स्वभाव, इतर मानवांविषयीची त्याची कळकळ, छळ सोसण्याची त्याची आत्यंतिक सहनशक्ती, आध्यात्मिक विश्वासासाठी मृत्यू स्वीकारण्याची त्याची तयारी यांचा आदर्श समोर ठेवून, त्या कसोटीला उतरणा-या व्यक्तींनाच संतांच्या मालिकेत स्थान देण्याची दक्षता चर्चने घेतल्याचे आढळते.

रोमन बादशहा कॉन्स्टंटीनने ३१३ मध्ये एका वटहुकुमान्वये ख्रिस्ती जनांचा छळ थांबविला व ख्रिस्ती धर्माला महत्त्वाचे स्थान दिले; परंतु या नव्या घटनेमुळे चर्चच्या आध्यात्मिक जीवनात निराळ्या प्रकारची संकटे निर्माण झाल्याचा दावा काही धर्मोपदेशकांनी केला. राजकीय सत्ता आणि महत्त्वाकांक्षा यांमुळे आध्यात्मिक जीवनाची पातळी खालावेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे ख्रिस्ती धर्मतत्त्वे, धर्माचरण इत्यादींचे सनातनी भूमिकेतून पालन करणा-या व्यक्तींनाही चर्चच्या संमतीने संत म्हणून चौथ्या शतकापासून ओळखण्यात येऊ लागले. त्यांना ‘कन्फेसर’ म्हटले जाई. कन्फेसरचे जीवन म्हणजे एक प्रकारचे हौतात्म्यच मानण्यात येईल.

संतपदासाठी स्थानिक चर्चची अथवा जागतिक चर्चची मान्यता असावी लागते. संबंधित व्यक्तीचे नैतिक आणि आध्यात्मिक जीवन ख्रिस्ती परंपरेला धरून आदर्शभूत असणे व त्याचा इतरांवर प्रभाव पडणे आवश्यक असते. अशा व्यक्तींच्या कर्तृत्वाचे मूल्यमापन त्यांच्या मृत्यूनंतर अनेक वर्षानी होते. अशी मान्यता मिळाल्याचा जाहीरनामा (ईडिक्ट) चर्चचा सर्वश्रेष्ठ धर्मोपदेशक पोप किंवा आर्चबिशप काढतो व त्यात त्या व्यक्तीचे गुणवर्णन (सायटेशन) करण्यात येते. हे सर्व ठरावीक धार्मिक विधींनी जगाच्या निदर्शनास आणण्यात येते. यास ‘कॅननायझेशन’ म्हणतात.

धर्मसुधारणेनंतर (सोळावे शतक) रोमन कॅथलिक पंथ आणि प्रॉटेस्टंट परंपरेतील फक्त अँग्लिकन चर्च यांच्यातच संतपद बहाल करण्याची पद्धत चालू राहिली. इतर ख्रिस्ती पंथांत संतपरंपरा विहित नसल्यामुळे त्यांत पारंपरिक संतांच्या तोडीचे कर्तृत्व असणा-या काही थोर व्यक्ती जरी होऊन गेल्या, तरी त्यांचा अंतर्भाव संतमालिकेत झाला नाही. पारंपरिक संतांचे स्मृतिदिन पाळले जातात.

सर्व ख्रिस्ती संतांची विस्तृत माहिती सी. पी. एस. क्लार्कच्या एव्हरीमन्स बुक ऑफ सेंट्स या ग्रंथात दिलेली आहे.

येशूची शिकवण
येशूने दिलेली शिकवण अद्वितीय होती. त्या दिवसांतील लोक त्यांची शिकवण ऐकून आश्चर्यचकित झाले होते आणि आजही होत आहे. तेव्हापासून आजतागायत अनेकजण त्यांच्या शिकवणीमुळे प्रेरित होऊन चांगले जीवन जगत आहे. अनेक जण त्यांची शिकवण घेऊन इतरांना प्रोत्साहन देत आहेत. त्यांनी शिकवले, इतरांना क्षमा करा. कोणी तुमच्या उजव्या गालावर मारतो, त्याच्याकडे दुसरा गाल पुढे करा. तुम्ही आपल्या वै-यांवर प्रेम करा आणि जे तुमचा छळ करतात, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका, एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो, त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. त्यांची पूर्ण शिकवण नवीन करारात पाहायला मिळते.

भेटवस्तू आणि शुभेच्छापत्रे देण्याची प्रथा!
येशूच्या जन्माचा स्मरण उत्सव साजरा करण्याच्या विविध प्रथा-पद्धती स्वतंत्रपणे विकसित झाल्याचे दिसून येते. या प्रथांना येशू जन्म पूर्वकाळातील साज-या होणा-या पगान संस्कृतीच्या शीतकाळातील अयन दिवसांच्या उत्सव साजरे करण्याचे संदर्भ जोडलेले दिसतात. भेटवस्तूंची देवाण-घेवाण हा त्यातीलच एक भाग.

नाताळ सणामध्ये भेटवस्तू देण्याची प्रथा अत्यंत महत्त्वाची आहे. विशेषत: लहान मुलांना या सणाची खूप हौस असते. महाराष्ट्रातील ख्रिस्ती लोक दिवाळीप्रमाणे या दिवशी करंज्या व अन्य खाद्यपदार्थाचे एकमेकांस आदान-प्रदान करतात. लहान मुलांना सांताक्लॉजच्या वेषात येऊन भेटवस्तू देण्यात येतात. नाताळची शुभेच्छापत्रे कुटुंबातील सदस्य आणि आप्त, स्नेही यांना पाठवली जातात. पारंपरिक पत्रांमध्ये नाताळ आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिलेल्या असतात. काही पत्रांमध्ये बायबलमधील विचार, कविता इत्यादींचा समावेश असतो. बर्फाने व्यापलेला प्रदेश, नाताळबाबा, त्याची गाडी, ख्रिसमस ट्री अशी विविध चित्रे यामध्ये असतात. पहिले व्यावसायिक नाताळ शुभेच्छापत्र इ. स. १८४३ मध्ये सर हेन्री कोल यांनी बनवले. आता ही पद्धत जगभरात मोठय़ा प्रमाणावर लोकप्रिय झालेली दिसून येते.

नाताळ

$
0
0

नाताळ किंवा ख्रिसमस हा सण दरवर्षी मुख्यत्वे २५ डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. काही ठिकाणी या सणाऐवजी एपीफनी सण ६, ७ किंवा १९ जानेवारीला साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण १२ दिवसांच्या ‘ख्रिसमस्टाईड’ नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ. स. ३४५मध्ये त्यावेळच्या पोप पहिल्या ज्युलियसने ‘२५ डिसेंबर’ हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा, असा निर्णय घेतला. त्या वेळेपासून नाताळ हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला. जगाच्या ब-याच मोठय़ा भागात हा सण मध्यरात्री साजरा केला जातो, तर काही ख्रिश्चन अनुयायी व काही ख्रिस्ती पंथ मात्र सायंकाळी हा सण साजरा करतात. भगवान येशूंच्या जन्माची सुवार्ता विशद करणा-या मॅथ्यू आणि ल्यूक यांच्या ज्या कथा आहेत, त्यामध्ये तसेच प्राचीन ख्रिस्ती लेखकांनी सुचविलेल्या तारखांमध्ये काही तफावत दिसून येते. सर्वात प्रथम इ. स. पूर्व ३३६ मध्ये रोम येथे ख्रिसमस हा सण साजरा झाला, असे मानले जाते.

येशू म्हणजे मूळ यहोशवा या हिब्रू शब्दाचा अर्थ तारणारा असा होतो आणि ख्रिस्त हा शब्द ख्रिस्तोस या ग्रीक शब्दापासून बनला असून, त्याचा अर्थ परमेश्वराने अभिषिक्त केलेला असा होतो. येशूचा मूळ धर्म यहुदी होता. शुभवर्तमानात १२ वर्षापर्यंत त्याचा उल्लेख होतो, तर ३० वर्षाचा झाल्यावर त्याने शिकवणुकीला सुरुवात केली. तीन वर्षे गालीली प्रांतात व आजूबाजूच्या परिसरात त्याने आपली शिकवण प्रसारित केली.

नाताळ हा शब्द ‘नातालिस’ या लॅटिन शब्दाच्या अपभ्रंशातून आलेला आहे. नातालिस म्हणजे जन्म, इथे मात्र हा शब्द येशूचा जन्म या अर्थाने वापरला जातो. पूर्वी या दिवशी फक्त सामूहिक प्रार्थना होत असे. पुढे एकोणिसाव्या शतकापासून नाताळ सण म्हणून मोठय़ा प्रमाणात, झगमगाटात आणि हर्षोल्हासात साजरा होऊ लागला.

या दिवशी ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध भेटवस्तू, शुभेच्छापत्रे देऊन परस्परांचे अभिनंदन करतात. तसेच आपापल्या घरांना रोषणाई करून घर सजवले जाते. याच दिवशी रात्री सांताक्लॉज लहान मुलांसाठी भेटवस्तू वाटतो, असे मानले जाते. यामध्ये चॉकलेट, केक, इत्यादी वेगवेगळे पदार्थ बनविले जातात.

‘ख्रिसमस ट्री सजावट’ (नाताळसाठी सजवलेले सूचिपर्णी झाड) हा या सणाचा एक अविभाज्य भाग आहे. सूचिपर्णी वृक्ष हा पगान संस्कृतीचा वृक्षपूजेचा एक भाग मानला जातो. त्याचा संबंध हिवाळ्यातील संक्रमणाशी आहे. ख्रिसमस ट्री असे संबोधन प्रथम इ. स. १८३५ मध्ये झालेले आढळते. आधुनिक काळातील या वृक्षाची सजावट हा भाग जर्मनीत उदय पावल्याचे समजतात. हे वृक्ष दिव्यांच्या माळा आणि अन्य सजावट साहित्यांनी सुशोभित केले जातात. लहान मुलांचे मोजे, छोटय़ा प्रतीकात्मक काठय़ा, छोटय़ा घंटा, भेटवस्तू अशा गोष्टी लावून हा वृक्ष सजवितात. काही ठिकाणी विशेषत: प्रार्थनास्थळी येशूच्या जन्माचा देखावा मांडला जातो.

सांताक्लॉज
सांताक्लॉज किंवा संत निकोलस हे नाताळ सणाचे प्रमुख वैशिष्टय़ होय. सांताक्लॉज ही एक काल्पनिक व्यक्तिरेखा असून त्याला मराठीत नाताळबाबा असे म्हणतात. पाश्चिमात्य ख्रिश्चन संस्कृतीत मानले जाते की, चांगली वर्तणूक असलेल्या लहान मुलांना नाताळच्या आदल्या रात्री सांताक्लॉज भेटवस्तू देऊन जातात.

सांताक्लॉजचे चित्रण सामान्यत: बुटकी, वृद्ध, पांढ-या दाढीची, लाल अंगरखा घातलेली, चष्मा लावलेली व्यक्ती असे केले जाते. लहान मुलांसाठी भरपूर भेटवस्तू भरलेली एक मोठी पिशवीही याच्यासोबत असते. अमेरिका आणि कॅनडा या देशांत ही व्यक्तिरेखा १९व्या शतकापासून विशेष लोकप्रिय आहे.

Viewing all 1081 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>